मराठीत कलाकारांच्या जोडय़ा खूप प्रसिद्ध आहेत. कित्येकदा त्यांची पडद्यामागची मैत्री पडद्यावरची त्यांची जोडी खुलवण्यात हातभार लावते. अभिनेता अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव ही या जोडय़ांपैकी एक म्हणता येईल. ‘जत्रा’, ‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘धुरळा’सारख्या चित्रपटांतून एकत्र आलेली ही जोडी पुन्हा एकदा ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटातून एकत्र आली आहे. दोघेही विनोदी अभिनयासाठी ओळखले जातात, त्यामुळे त्यांची ही विनोदी जुगलबंदी पाहाणं रसिकांसाठी पर्वणी ठरली आहे. ‘मला मजा येते सिद्धार्थबरोबर काम करायला. आम्ही एकमेकांबरोबर बसून तयारी करतो, चर्चा करतो. आधीपासून आम्ही काम केलेलं असल्याने जुळवणूकही सहज होते. आता दोन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र ‘धुरळा’ चित्रपटात काम केलं होतं. त्यातही काम करताना तो माझा भाऊ होता, इथे तो माझा मित्र आहे. त्याच्याबरोबर आधी काम केलेलं असल्याने त्याचं विनोदाचं टायिमग, त्याची पद्धत मला चांगलं माहिती आहे. तो जेव्हा त्याची अभिनयाची तुफान फलंदाजी करत असतो तेव्हा मी त्याला साथ देतो आणि मी भरात असतो तेव्हा तो साथ देतो, या पातळीवर आमचं काम चालतं,’ असं अंकुश त्याच्या सिद्धार्थबरोबर असलेल्या केमिस्ट्रीबद्दल सांगतो. तर सिद्धार्थच्या मते अंकुशसारखा उत्तम, अनुभवी अभिनेता जेव्हा बरोबर असतो तेव्हा अभिनयाची देवाणघेवाण करण्यातही एक मजा असते. अंकुशने आपली एकांकिका स्पर्धेपासूनची वाटचाल पाहिलेली आहे. त्यामुळे कलाकार म्हणून माझी झालेली जडणघडण, कामाची पद्धत सगळंच त्यांना माहिती आहे. त्यामुळेच आमचे सूर चटकन जुळून येतात, असं सिद्धार्थने सांगितलं. एकमेकाला फार काही न सांगता समजून घेण्याचं त्यांचं हे कसब ‘लोच्या झाला रे’च्या चित्रीकरणाच्या वेळी खूप उपयोगी पडल्याचंही सिद्धार्थने सांगितलं. ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाची कथा एकदम वेगवान अशी आहे. यातील अनेक दृश्ये ही आम्हाला एका टेकमध्ये करायची होती आणि आम्ही तशाच पद्धतीने काम केलं, असं सिद्धार्थ सांगतो. अर्थात याचं श्रेय दिग्दर्शक परितोष पेंटर यांचंही आहे, असं तो म्हणतो. या चित्रपटाचं चित्रीकरण करोनाकाळानंतर लगेचच लंडनला झालं होतं. त्यामुळे गोंधळातच काम करावं लागलं. मात्र लंडनच्या अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध अशा वातावरणात आम्ही मोकळा श्वास घेऊ शकलो आणि तिथलं खाणंही अप्रतिम होतं त्यामुळे सिद्धूने आणि मी खाण्याची चंगळ केली, असं अंकुशने सांगितलं. तर करोनाकाळात काळजी घेऊन चित्रीकरण करावं लागलं तरी आम्ही एकत्र कामाचा खूप आनंद घेतला, असं सिद्धार्थने सांगितलं. सुरेश जयराम यांच्या ‘पती सगळे उचापती’ या नाटकावर आधारित कथा असून दिग्दर्शक परितोष पेंटर स्वत: रंगभूमीवरील अभिनेते असल्याने ‘लोच्या झाला रे’सारख्या विनोदी चित्रपटात काम करताना आपल्याला त्यांच्या अभिनय-दिग्दर्शकीय अनुभवाचा फायदा झाल्याचेही अंकुशने सांगितले.