अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. दिड महिन्यांपासून मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र अद्याप कुठलेही धारेदोरे त्यांना सापडलेले नाहीत. उलट बिहार पोलिसांचं आगमन होताच या प्रकरणाला कमीचा वेग आला. मात्र बिहार पोलिसांच्या या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हतं. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं.” असं म्हणत त्यांनी बिहार पोलिसांवर उपरोधिक टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांची स्तुती करत बिहार पोलिसांवर उपरोधिक टीका केली आहे. “सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळं या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे. पण दरम्यानच्या काळात सुशांत सिंहच्या वडलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले. वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हतं. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही. पण असो. खरंच ते इतके कर्तव्यदक्ष असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं आणि यामुळं बिहारमधील गुन्हेगारीचं प्रमाणही कमी होईल, अशी अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही. मात्र एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे.” अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे.