‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही यामधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री अक्षया नाईक या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिने या मालिकेत लतिका हे पात्र साकारलं होतं. मालिका संपल्यावर अक्षया नाटकाकडे वळली होती. ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. नुकताच या नाटकासाठी अक्षयाला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने खास पोस्ट शेअर करत अक्षयाने जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

अक्षया नाईकची पोस्ट

‘सांस्कृतिक कलादर्पण २०२४’चा सर्वोत्कृष्ट विनोदी कलावंत हा अवॉर्ड मिळाला. गेले ४८ तास मला अनेक जुन्या गोड-कडू आठवणींचा झळाळा देऊन गेले. ज्या गोष्टीसाठी इतकी वर्ष हा सगळा अट्टहास केला त्याचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही विचार कराल, इतकी senti का? इतकं काय खास आहे या अवॉर्डमध्ये ? तर अनेक कारणं आहेत.

१. माझे नाना (आईचे वडील) गिरणी कामगार होते आणि त्याच बरोबर नाटकांमध्ये काम करायचे. त्यांना कधी भेटले नाही मी. पण जितकं ऐकलंय त्यावरुन माहितीये, की आज ते जिवंत असते तर उत्तम नट असते आणि कुठेतरी त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करतेय.

२. काही जणांनी मला “नाटक तुझ्यासाठी नाही. अभिनय तुझ्यासाठी नाही.” असं म्हटलं होतं. रंगदेवतेने त्याचा मला आज आशिर्वाद दिला.

३. Comedy हा genre अतिशय कठीण आहे आणि लोकांना हसवणं त्याहून अधिक. आपण आपले न्यूनगंड घेऊन येतो, imageचा विचार असतो, आपण कसे दिसतोय, असे अनेक विचार होते. चुकल्यावर जसा ओरडा मिळायचा तसंच चांगलं केल्यावर आमचे दिग्दर्शक @maheshdokphode कौतुकाची थाप सुद्धा द्यायचे. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी आज हे करू शकले. त्यामुळे हे श्रेय त्यांचं.

आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा – मी माझ्या महाविद्यालयासमोर हे फोटो का काढले? रामनारायण रूईया कॉलेजचं “नाट्यवलय” हा ड्रामा सर्कल अतिशय famous. ११वी मध्ये admission घेतल्यावर कॉलेजच्या याच गेटवर उभी राहून म्हणाले होते इथे येऊन खूप एकांकिका करणार, कॉलेजच्या नाटकामध्ये काम करणार. पण कॉलेजची ५ वर्ष मी “नाट्यवलय” सोडून सगळं केलं. अर्थात त्याही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. पण ती खंत नेहमी होती की “नाट्यवलय” करता नाही आलं. आपण कुठेतरी चुकलो असं नेहमी वाटायचं. पण आज छान वाटतंय की ते circle पूर्ण झालंय. कारण आमचं “चूक भूल द्यावी घ्यावी” हे नाटक दिलीप प्रभावळकर सरांनी लिहिलंय आणि ते देखील रूईया कॉलेजचे माजी विद्यार्थी होते.

ज्यांनी ज्यांनी पोस्ट पूर्ण वाचली त्यांचे मनापासून अधिक आभार

आणि तुम्हा सगळ्यांचे आभार आमचा नाटकाला इतकं भरभरून प्रेम दिलंत आणि यापुढे पण द्याल अशी आशा

हेही वाचा : प्रवीण तरडेंच्या पत्नीने पूर्ण केला वेदांचा अभ्यास! परीक्षेत मिळवले ‘एवढे’ गुण; म्हणाल्या, “स्वतःला हिंदू म्हणताना…”

हेही वाचा : Cannes मध्ये ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्काराने सन्मान! मराठमोळ्या छाया कदम यांचं सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, अक्षयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विक्रम बोडगे, लता सब्रवाल, श्वेता रंजन, योगिनी चौक, वनिता खरात, सुयश टिळक या कलाकारांनी कमेंट्स करत अक्षयाचं कौतुक केलं आहे.