|| रवींद्र पाथरे

‘वन्स मोअर तात्या’

नाटककार गंगाराम गवाणकर लिखित आणि रमेश रणदिवे दिग्दर्शित मच्छिंद्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’ या मालवणी नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला. या नाटकानंतर रंगभूमीवर मालवणी बोलीतील नाटकांची लाट येण्याचा चमत्कार अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला. एवढंच नव्हे तर मालवणीतलं हे नाटक साता समुद्रापार लंडनमध्येही सन्मानाने निमंत्रित केलं गेलं. मालवणी भाषा आणि खाद्यसंस्कृतीलाही या नाटकानं महानगरीय संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तोवर ‘मालवणी याडं’ म्हणून दक्षिण कोकणातील लोकांना हिणवलं जाई. मात्र, या नाटकानं मालवणी माणसाकडे पाहण्याची शहरवासीयांची दृष्टीही आमूलाग्र बदलली. आणि हा सगळा विलक्षण चमत्कार एका ‘वस्त्रहरण’ नाटकानं घडवून आणला. तद्नंतर मच्छिंद्र कांबळींनी मालवणी नटसम्राट म्हणून मराठी रंगभूमीवर अनभिषिक्तपणे राज्य केलं. त्यांच्या नाटकाची संहिता काहीही असो, ते उच्चारतील तो शब्द रसिक डोक्यावर घेत. पाच हजारांवर प्रयोग झालेल्या या नाटकाच्या मानाच्या तुऱ्यांत आणखीही बरेच बहुमान खोवले गेले. कोकणी माणसांसकट समस्त महाराष्ट्राने या नाटकावर निरतिशय प्रेम केलं. त्यानंतर ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘चाकरमानी’, ‘केला तुका झाला माका’ अशी मालवणी नाटकांची लाटच आली. पुढे गिरणी संपोत्तर काळात मालवणी नाटकांची ही लाट ओसरली, तरीही मालवणी नाटकाबद्दलची आत्मीयता अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. याचं प्रत्यंतर नुकतंच रंगमंचावर आलेल्या ‘वन्स मोअर तात्या’ या मिलिंद पेडणेकर लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित नाटकानं आलं.

हे नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’चीच पुनश्च अनुभूती होय. कथाबीजातला किंचितसा फरक सोडला तर आपण पुन्हा ‘वस्त्रहरण’च पाहतो आहोत असा भास (नव्हे सत्यच!) नाटक पाहताना होतो. प्रेक्षकही त्याच नजरेनं या नाटकाकडे पाहतात आणि पुन:प्रत्ययाचा आनंद घेतात. ‘वस्त्रहरण’मध्ये गावातल्या दहीकाल्यात घडणाऱ्या धुमशान गमतीजमती खच्चून भरलेल्या होत्या. इथे गावातल्या दोन वाड्यांमधले मुंबईकर गाववाले आणि थयच ºहवणारे गावकार यांच्यात गावच्या उत्सवात नाटक करण्यावरून झालेल्या वादावादीतून तोडगा म्हणून शेवटी दोन्ही वाडीकरांना घेऊन एक संयुक्त नाटक बसवण्याचं ठरतं. त्यातून होणाऱ्या गमतीजमती, हेवेदावे, ईष्र्या, अहंभाव यांच्यातील टकरीचं हे नाटक आहे. यातही तात्या आहेत, पण ते सरपंच नाहीत. नाटककार आहेत. ऑडिशन घेण्याच्या निमित्ताने ते नाटकात काम करू इच्छिणाऱ्यांना एकत्र बोलावतात आणि एकेकाची ऑडिशन घेतात. यातही नाटक बसवणारे धांदरट शाळामास्तर आहेत. तेही ‘वस्त्रहरणा’तल्या मास्तरांचीच कार्बन कॉपी आहेत. हयसर ‘वस्त्रहरणा’तल्या बावळट्ट गोप्याऐवजी तात्यांचो हरकामो सुन्याही आसाच. तशात नाटकात खऱ्या बाईमाणूस म्हया म्हणान् एका तमाशा कलावंतीणीक नाटकात घेतल्यार जा काय होता ता सगळा हयसरव् आसाच. फक्त नाटकाच्या शेवटाक तात्यांबद्दलच्या गैरसमजातून नाटक उधळला जाता, ह्या तेवढा वेगळा आसा. हयव् दहीकाल्यातली पात्रा ‘दौपदी वस्त्रहरणा’चाच आख्यान लावतत्. बाईचो नाच… त्यावर बाप्यामाणसांचा खुळावणा… त्येंका काबूत ठेवक् जाणारे तात्याव् तसलेच. बायलयेड्या मास्तरांचो तर आधीच कोंबो झाल्लेलो. ह्याच्यातना ज्या काय धुमशान होता ता म्हणजे ‘वन्स मोअर तात्या’!

आता या मालवणी नाटकाचा इंग्रजी नाव कित्याक ठेवलाहा हा (मिलिंद) पेडणेकरच जाणोत! बहुतेक मच्छिंद्र कांबळ्यांच्या तात्या सरपंचाक ट्रिब्युट म्हणान् ह्या नाव ठेवल्यानी आसतला. असो.

मिलिंद पेडणेकरांनी फार पूर्वी ‘गोलपिठा’सारखं एक सशक्त आशय-विषयावरचं नाटक सादर केलं होतं. त्यानंतरही ते राज्य नाट्यस्पर्धांतून सतत नाटक करत आले आहेत. ‘वन्स मोअर तात्या’मध्ये ‘वस्त्रहरण’ आणि त्यातले तात्या सरपंच- मच्छिंद्र कांबळींचा पेडणेकर यांच्यावरील जबरदस्त प्रभाव ठायी ठायी जाणवतो. त्यामुळेच संहितेपासून सादरीकरणापर्यंत ते कुठेही कमी पडलेले नाहीत. कलाकार निवडीतही कलाकारातला दशावतारी हुन्नर व त्याकरता लागणारं उपजत व्यक्तिमत्त्व हे त्यांनी निरखून पारखून घेतल्याचं लक्षात येतं. कुठलंच पात्र याला अपवाद नाही. आणि इथेच ते अर्धीअधिक लढाई जिंकले आहेत. तात्यांच्या भूमिकेत तर त्यांनी स्वत:लाच पणाला लावलं आहे. त्यामागे त्यांची मच्छिंद्र कांबळींप्रती असलेली आत्मीयता दिसून येते. तात्यांना त्यांनी शब्दश: न्याय दिला आहे. मच्छिंद्र कांबळींच्या पश्चातही ‘वस्त्रहरण’चे प्रयोग झाले असले तरी तात्या सरपंचांचा ‘आत्मा’ कुणाला गवसला नव्हता, तो पेडणेकरांना सापडला आहे. लेखक व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी ‘वस्त्रहरण’चा खोलात जाऊन अभ्यास केल्याचं दिसतं. त्याचीच परिणती म्हणजे हे नाटक! 

मिलिंद पेडणेकरांनी तात्यांच्या इरसालपणाचे यच्चयावत कंगोरे नेमकेपणी हेरले आहेत. तात्यांचा मंचीय मुक्त वावर, त्यांची गोळीबंद संवादफेक, बोलकी देहबोली… सारं सारं त्यांनी इतक्या ताकदीनं व्यक्त केलं आहे की प्रत्यक्ष मच्छिंद्र कांबळींचाच कधी कधी त्यांच्यात भास होतो. तालीम मास्तर झालेल्या तेजस घाडीगावकरांनी त्यांचं अर्कचित्र फर्मास उभं केलं आहे. गावावरून ओवाळून टाकलेला पकल्या नितीन जंगम यांनी यथातथ्य साकारला आहे. तात्यांचा निष्ठावान ‘चमचा’ सुन्या (‘वस्त्रहरणा’तला गोप्या) सुनील मळेकरांनी जोरकस वठवला आहे. नकुल (ओमकार गावडे) आणि सहदेव (अमोल तांबे) यांची जुळ्या जोडीची एकत्रित संवादोच्चारणाची गंमत मजा आणते. धर्म (नंदकुमार तळवडकर), अर्जुन (अभिमान अजित), भीम (प्रशांत सातार्डेकर), दुर्योधन (किरण तांबे), माई (रेखा गावकर) यांनी आपापली पात्रं चोख साकारली आहेत. अपेक्षा निर्मळ यांनी वैतरणेचा झणका नृत्यासह देहबोलीतूनही उत्तमरीत्या व्यक्त केला आहे.

प्रणय दरेकरांचं संगीत, अंकुश कांबळींचं नेपथ्य, शीतल तळपदेंची प्रकाशयोजना, मिलिंद कोचरेकरांची रंगभूषा, पंकज पेडणेकरांची वेशभूषा यांनी दहीकाल्यातल्या नाटकाची जिवंत पाश्र्वभूमी वास्तवदर्शीत्वानं आकारली आहे.

मालवणी नाटकाच्या चाहत्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद देणारं हे नाटक पुन्हा पुन्हा पहावंसं वाटेल यात काय शंका?