डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थानाचा परिसर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या मागणीवरून काँग्रेस पक्ष सोमवारी आक्रमक झाला. दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात बाबासाहेब आंबेडकर यांचे 'राजगृह' हे निवासस्थान आहे. याठिकाणी १४ ते १५ वर्ष आंबेडकरांचे वास्तव्य होते. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू फेरीवाल्यांच्या कचाट्यातून मुक्त करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. यापूर्वी एप्रिल महिन्यात राजगृहाचा अर्धा किलोमीटरचा परिसर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी केला. शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी याच राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत असत. वास्तविक हेच राष्ट्रीय स्मारक करण्याची मूळ योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. परंतु, अशी पवित्र ऐतिहासिक वास्तू फेरीवाल्यांच्या गराड्यातून मुक्त व्हावी, अशी मागणी गाडगीळ यांनी केली होती.