महापालिकेने महालक्ष्मी रेसकोर्स येथे जलवाहिन्यांसंबंधी काम हाती घेतल्यामुळे बुधवार, ५ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ६ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत ग्रॅन्ट रोड, वरळी, दादर, प्रभादेवी, माटुंगा येथील काही विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेने जलबोगदा प्रकल्पाअंतर्गत १२०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीला महालक्ष्मी रेसकोर्स येथे जलजोडणीचे व दोन झडप बसविण्याचे काम बुधवारी सकाळी ७ वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम ६ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज पालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून ६ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत ताडदेव, तुळशीवाडी, नाना चौक, वरळी डेअरी, वरळी कोळीवाडा, सर पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, दादरमधील बीबीडी चाळ, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालय, दुर्गादेवी टाकी, एम. पी. मिल कम्पाऊण्ड, दादर, प्रभादेवी, माटुंगा इत्यादी विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेशा पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.