ठाणे येथील दिवा भागात किरकोळ वादातून एकाची चाकूने हत्या करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी घडला असून या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मारेकऱ्यास सोमवारी अटक केली आहे. निराले शेख (२२), असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो दिवा भागात राहत होता. तर जालिंदर उर्फ विकी उर्फ विवेक रामचंद्र जाधव (२३), असे यातील आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
दिवा भागात राहणारे करूण उर्फ समीर केदार गिरी (२२) हे रेल्वेमध्ये इमिटेशन दागिने विकण्याचे काम करतो. या कामामध्ये  निराले हा मदत करायचा. त्यातून त्याला काही पैसे मिळायचे. मात्र, काही महिन्यांपुर्वी समीर यांनी त्याच्या जागेवर विकीला ठेवले होते. याच कारणावरून झालेल्या भांडणातून निराले याने विकीला मारहाण केली होती. त्यामुळे याचाच राग मनात धरून शनिवारी विकी याने निराले याच्या पोटात चाकून मारून त्याची हत्या केली.
 या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात विकीला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.