मुंबई : हेल्मेट न घालता दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे दोन तरूणांच्या जीवावर बेतले. या अपघातात एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी नुकताच निष्काळजीपणाने भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जखमी तरुणावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहीम येथील तुळशी पाईप रोडवर सोमवारी पहाटे हा अपघात घडला. सरस्वती मंदिर शाळेजवळ घडलेल्या या अपघातानंतर पादचाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने स्थानिक माहीम पोलिसांना याबाबतची मााहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यावेळी दुचाकीच्या शेजारी तिघे जखमी गंभीर अवस्थेत पडलेले पोलिसांना दिसले. प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी केली असता दुचाकीने बसला धडक दिल्याचे पोलिसांना समजले.

हेही वाचा : धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार

जखमींना पोलिसांनी तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल केले. अपघातात गंभीर जखमी झालेले निलेश ईश्‍वर पाटील आणि भावेश अशोक धोरणे या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर विकास नंदराज सोनावणे याच्यावर उपचार सुरू आहेत. निलेश हा दुचाकी चालवत होता. त्यावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. तसेच तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करीत होता. निलेश भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. अचानक त्यांच्या दुचाकीने एका बसला धडक दिली आणि हा अपघात झाला. याप्रकरणी निलेशविरोधात माहीम पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करीत आहेत.