मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे राज्याच्या गृह खात्याची जबाबदारी आहे. त्यावरुन शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. २०१४ पासून पोलिंसावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे. असेच चित्र राहिल्यास राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, असा सवालही उपस्थित केला.

राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था नेहमीच उत्तम असते. पण राज्यात पोलिसांवरील हल्ल्यांत प्रचंड वाढ झाली आहे. पोलीस ठिकठिकाणी मार खात आहेत. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून त्यांनी गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हटलंय शिवसेनेने..
* दारू तस्कराने चंद्रपूर जिह्यातील नागभीड पोलीस ठाण्याचे फौजदार छत्रपती चिडे यांच्या अंगावर वाहन चढवून चिरडून मारले. चिडे यांची हत्या दारू तस्करीच्या वादातून झाली व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकप्रियतेसाठी जिह्यात दारूबंदीची घोषणा केली; संपूर्ण विदर्भात दारूचा महापूर धोधो वाहत आहे.

* गेल्या चार वर्षांत पेलिसांना मोठय़ा प्रमाणात प्राण गमवावे लागले व पोलिसांवरील सर्वाधिक हल्ले हे विदर्भात झाल्याच्या नोंदी आहेत. सीआयडीने प्रसिद्ध केलेली आकडेवारी चिंताजनक आहे. राज्यात पोलीस सुरक्षित नाहीत व काश्मीरात ज्याप्रमाणे पोलीस व सुरक्षा दलांवर हल्ले होत आहेत तसे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत.

* सीआयडीच्या 2016 च्या गुन्हे अहवालानुसार 2015 मध्ये साधारण 370 पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. 2016 मध्ये 428 पोलिसांवर हल्ले झाले. त्यात 56 पोलिसांना मरण पत्करावे लागले. सर्वाधिक पोलीस बळी चंद्रपुरात (11) गेले व त्यासाठी लादलेली दारूबंदी व दारू तस्करी हे मुख्य कारण आहे.

* धैर्य हीच महाराष्ट्र पोलिसांची ओळख आहे. पण ती ओळख व पोलिसांचा दरारा पुसला जात असेल तर त्यासाठी राजकारणाने वर्दीवर केलेली मात जबाबदार म्हणावी लागेल. आझाद मैदानात धर्मांध दंगलखोरांनी पोलिसांवर हल्ले केले, पोलिसांची वाहने जाळली तेव्हा गदारोळ करणारा विरोधी पक्षच आज सत्ताधारी आहे व पोलीस पुनःपुन्हा मार खात आहेत.

* कायद्याला बाप व पोलीस ठाण्यांना मालक निर्माण होतात तेव्हा ते कायद्याचे राज्य नसते. गुंडांना, चोरांना राजकीय कार्यकर्ता म्हणून सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश मिळतो व पोलिसांनी ज्यांना काल गुंड म्हणून ठोकलेले असते त्या गुंडांनाच सलाम करावा लागतो.