अकोला : प्रत्येकाच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी मजबूत वीट निर्मितीत आपले आयुष्य खर्ची घालणारे वीटभट्टी कामगार तप्त उन्हातही राबत आहेत.

विदर्भात सूर्य आग ओकत असून ४५ अंश सेल्सियस तापमानात अंगाची लाहीलाही होते. या तप्त वातावरणात उन्हाची तमा न बाळगता वीटभट्ट्यांभोवती कामगार घाम गाळत आहेत. त्यांची होरपळ होत असून कामाच्या ठिकाणी सुविधांची वानवा आहे. शासनाच्या योजना त्यांच्यापासून कोसो दूरच आहेत. स्थलांतरित वीटभट्टी कामगार अनेक समस्यांच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला कडाडून विरोध! नागपुरात विविध संघटना व पक्षांची बैठक

विदर्भात उष्णतेची लाट आली. तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने ३१ मेपर्यंत उष्ण वातावरणाचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षणासाठी पुरेशा सुविधा ठेवण्याचे आदेशसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वीटभट्ट्यांवर केराची टोपली दाखवण्यात आली.

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वीटभट्टी उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. या उद्योगांवर काम करण्यासाठी कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश वीटभट्ट्यांवर स्थलांतरित कामगार असतात. या वीटभट्टी कामगारांकडे सातत्याने दुर्लक्ष होते. वीटभट्टीवर काम करण्यासाठी कुटुंबच स्थलांतरित होत असल्याने त्यांची फरपट होते. विदर्भात वीटभट्टी कामगारांचे प्रश्न अधिकच गंभीर स्वरुपाचे आहेत. विदर्भात सर्वाधिक औष्णिक विद्युत प्रकल्प असल्याने त्यातून निघणारी राख वीटभट्टी उद्योगांना उपलब्ध होते. त्यामुळे वीटभट्टी हा नफ्याचा धंदा म्हणून करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, वीटभट्टी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांचे एक प्रकारे शोषणच होत आहे.

ऑक्टोबर ते मे दरम्यान कामगार आपल्या कुटुंबीयांसह वीटभट्टीवर राबतात. जून ते सप्टेंबर महिन्यांत आपल्या मूळ गावी राहून शेतमजुरी करतात. अकोला जिल्ह्यात बाळापूर, पारस, चोहट्टा बाजार, अकोट आदी भागात वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत. वीटभट्टी कामगारांना कामावर आणल्यानंतर त्यांना ठेकेदारी पद्धतीने काम दिले जाते.

हेही वाचा – ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…

जमिनी खोदणे, त्यानंतर विटा बनविण्यायोग्य माती तयार करणे, भट्टी लावणे, यात बराच वेळ जातो. हे काम करण्यासाठी संपूर्ण कुटुंब राबते. कोणतीही सुविधा न देता त्यांच्याकडून रात्रंदिवस काम करवून घेतले जात असल्याचे चित्र दिसून येते. सध्या प्रचंड उन्हाचा तडाखा असतानासुद्धा दिवसभर कामगार राबत असतात. वीटभट्टी कामगार बहुतांश दुसऱ्या जिल्ह्यातील येतात. काही मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी भागातूनही येतात. घरदार सोडून परराज्यात किंवा जिल्ह्यात कामाला आलेल्या कामगारांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय देखील नसते. भरउन्हात काम करणाऱ्या कामगारांना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झाला. वीटभट्टी कामगार दुर्लक्षित घटक असून, समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

आरोग्याचे प्रश्न गंभीर

वीटभट्टी कामगारांना दूषित पाणी प्यावे लागते. त्यामुळे त्यांना साथीचे आजार होतात. वीटभट्टीवरच आजारामुळे बळी जाणाऱ्या कामगारांचीही मोठी संख्या आहे. वीटभट्टीवर राख व कोळश्याचा वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम वीटभट्टी कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यावर होतात. त्यामुळे त्यांना विविध आजार भेडसावत असतात. दुर्दैवाने आरोग्य यंत्रणेकडून याची कुठेही दखल घेतली जात नाही.