नागपूर : कॉंग्रेसचे दिवंगत नेते, भारताचे माजी पंतप्रधान व देशाच्या आर्थिक सुधारणीकरणात मोलाची भूमिका पार पाडणारे पी.व्ही नरसिंह राव यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च बहुमान ‘भारत रत्न’ मरणोत्तर जाहीर केला आहे. नरसिंह राव मुळचे आंध्र प्रदेशचे असले तरी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. त्यांना जाहीर झालेल्या भारत रत्न सन्मानामुळे रामटेक पुन्हा चर्चेत आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर जिल्ह्यातील रामटेक या गावाची पुरातन काळापासूनची ओळख म्हणजे सीतामातेच्या शोधासाठी निघालेले प्रभू रामचंद्र याच ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते. महाकवी कालिदास देखील याच भागात आपली काव्य रचना करायचे असं देखील म्हणतात. पण सध्याच्या राजकारणाच्या युगात रामटेक म्हटलं की एकच गोष्ट आठवते. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचा मतदारसंघ. खरं तर नरसिंह राव मूळचे आंध्र प्रदेशचे. हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या काळापासून त्यांचं आणि महाराष्ट्राचं जिव्हाळ्याचं नातं राहिले आहे. नरसिंह राव यांचं महाविद्यालयीन शिक्षण देखील पुण्यात फर्ग्युसन कॉलेज आणि एलएलबी नागपूर विद्यापीठातून झाली. स्वतः बहुभाषा कोविद असलेले पी.व्ही. नरसिंह राव हे मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते.

हेही वाचा – गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या रावांना त्यांच्याच राज्यातून मोठा विरोध होता. त्यामुळे बराच काळ ते दिल्लीतच राजकारण सांभाळत होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याचे ते मंत्री होते. त्यांची ओळख काँग्रेसचे चाणक्य अशी बनली. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि भारताच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं. अनपेक्षित धक्क्यामुळे अननुभवी राजीव गांधी  सत्तेत आले. जेव्हा तिकीट वाटप चाललं होतं नरसिंह राव यांना त्यांच्या नेहमीच्या हनमकोंडा मतदारसंघात दगाफटका होण्याची शक्यता होती. पण राजीव गांधींना नरसिंह राव लोकसभेत आणि आपल्या मंत्रिमंडळात हवे होते. त्यांना आंध्र प्रदेशऐवजी वेगळीकडे उमेदवारी द्यायचं ठरलं. यावेळी मतदारसंघ ठरला रामटेक.

रामटेक काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ होता. निवडून येण्याची खात्री असल्यामुळे नरसिंह राव यांनी तिथून अर्ज भरला. त्यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसने शंकरराव गेडाम यांना तिकीट दिलं. पण पी. व्ही. नरसिंहराव हे १ लाख ८५ हजार ९७२ अशा विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले. राजीव गांधी यांनी नरसिंह राव यांना संरक्षण मंत्री केले. पुढे १९८९ सालच्या लोकसभा निवडणुका आल्या. बोफोर्स घोटाळा, शाहबानो प्रकरण, रामजन्मभूमी आंदोलन या गोष्टी काँग्रेसच्या विरोधात जाऊ लागल्या होत्या.

हेही वाचा – डिजिटल सहेली! जाणून घ्या पथदर्शी प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

नरसिंह राव यांना पुन्हा रामटेकमधून उभं करण्यात आलं. मागच्या वेळी प्रमाणे यंदा देखील सहज निवडून येऊ असं रावांना वाटत होतं. त्यांच्या विरोधात जनता दलाने तिकीट दिलं रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांना. पांडुरंग हजारे हे राजकारणात मोठं नाव नव्हतं पण स्थानिक पातळीवर रामटेकच्या विकासासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होतं. याचा त्यांना फायदा झाला.

आपल्या घरोघरी जाऊन केलेल्या प्रचारामुळे हजारे यांनी नरसिंहराव यांना या निवडणुकीत घाम फोडला. रामटेकमधून तेव्हा ५ लाख ८९ हजार ९७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी नरसिंहराव यांना २ लाख ५७ हजार ८०० मते मिळाली होती. तर पांडुरंग हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० मते मिळाली. नरसिंहराव यांचा ३४ हजार ४७० मतांनी निसटता विजय झाला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat ratna to narasimha rao ramtek is back in the news what is the reason cwb 76 ssb