नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे काँग्रेसमधील परिवारवादचे राजकारण करणारे काही लोक बेरोजगार झाले आहे. तेच लोक सध्या स्वत:च्या बेरोजगारीचा मुद्दा देशातील तरुणांच्या बेरोजगारीशी जोडून बोंब मारत आहे, असा टोला भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी लगावला. नागपुरात ४ मार्चला आयोजित राष्ट्रीय नमो युवा संमेलनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, काँग्रेस अनेक वर्षांपासून परिवारवादावर राजकारण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे राजकारण संपवले. भाजपमध्ये युवांना प्राधान्य दिले जात असल्याने लक्षावधी युवा राजकारण, समाजकारणात आले. भाजपने देशातून परिवारवादाचे राजकारण संपवल्याने काँग्रेससह इतर काही पक्षांचे अनेक नेते बेरोजगार झाले. हे नेते स्वत:च्या बेरोजगारीचा मुद्दा देशातील तरुणांच्या बेरोजगारीशी जोडून बोंब मारत आहे. नरेंद्र मोदींना दोन वेळेला सत्ता सोपवण्यात तरुणांची महत्वाची भूमिका राहिली आहे. मोदींनीही तरुणांचे स्वप्न पूर्ण करणारे धोरण राबवून देशाची आर्थिक प्रगती साधली. त्यामुळे आज देशात सर्वात कमी बेरोजगारी आहे. भारत सर्वात गतीने विकसीत होणारी अर्थव्यवस्था आहे. मोदींनी देशातील ५० लाख नवीन तरुण मतदारांशी ऑनलाईन संपर्क साधले. त्यानंतर देशात २ लाख ठिकाणी नमो युवा चौपाल होत असून प्रत्येक ठिकाणी २०० तरुणांना गोळा करून त्यांना १० वर्षे केलेले काम सांगितले जात आहे. या प्रक्रियेतून तरुणांकडून येणाऱ्या सूचना भाजपच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जाणार आहे.

हेही वाचा : वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…

भाजप हा सामान्य तरुणांचे जन्म प्रमाणपत्र न तपासता (कौटुंबिक पार्श्वभूमी न तपासता) संधी देणारा पक्ष असल्याचेही सूर्या यांनी सांगितले. देशाचे तुकडे करणारे पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. देशाच्या विभाजनासाठी काँग्रेस जबाबदार आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नाटक करत असतांना कर्नाटकमध्ये काँग्रेसकार्यकर्ते पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत असल्याचा आरोप सुर्या यांनी केले. मार्च महिन्यात देशात आचारसंहिता लागू होऊन पूढील दोन महिन्यात निवडणूका होणार आहे. तेव्हा दक्षिण भारतासह देशभऱ्यातील राज्यात भाजपला चांगले यश मि‌ळणार असल्याचाही दावा त्यांनी केला.

हेही वाचा : राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी

नागपुरात नमो युवा संमेलन

नागपुरात ४ मार्चला राष्ट्रीय नमो युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहतील सम्मेलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील एक लाख युवा सहभागी होतील. त्यात अभियांत्रीकी, वैद्यकीयसह सगळ्याच विद्यापीठ व क्षेत्रातील युवा सहभागी होतील. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवा इन्फ्लुएनसर्सला ही आम्ही निमंत्रित करणार आहो. हे संमेलन २०२४ च्या निवडणुकांसाठी तरुणांचा हुंकार असेल, असेही सूर्या यांनी सांगितले.