लोकसत्ता टीम

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक भाषेत टीका केली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पहिल्यापासून काँग्रेस आणि वंचित आघाडी चर्चा सुरू होती. म्हणजे साखरपुड्यापासून चर्चा सुरू होती. परंतु आवश्यक हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने लग्न तुटले असावे, असे वडेट्टीवार म्हणाले.

महाविकास आघाडीशी अखेरपर्यंत चर्चा करीत राहू असे ॲड. प्रकाश आंबेडकर सांगत राहिले, सोबतच महाविकास आघाडीत भांडण आहेत. ते त्यांनी आधी सोडावावे मग माझ्याशी चर्चा करावे, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तरीही नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागाचा प्रस्ताव ठेवला. परंतु ॲड. आंबेडकर यांनी वराती मागून घोडे संबोधून तो प्रस्ताव फेटा‌ळला.

आणखी वाचा-भाजप नेते विजयराज शिंदेंचे बंड ठरले औट घटकेचे! म्हणाले, “अबकी बार…”साठी माघार

बहुजन वंचित आघाडी आणि महाविकास विकास आघाडी हे आता स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील होत असलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. अकोला मतदारसंघात ॲड. आंबेडकर हे उमेदवार असून येथे काँग्रेसने देखील उमेदवार दिला आहे. त्यामुळे येथे बहुजन वंचित आघाडी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.