जयेश सामंत, लोकसत्ता

नवी मुंबई: ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून नवी मुंबईची ओळख बनवणाऱ्या फ्लेमिंगोंच्या अधिवासावरच माती टाकण्याची पुरेपूर तयारी नवी मुंबई महापालिकेने केली आहे. पामबिच मार्गावर नेरुळ-सीवूड परिसरातील खाडीकिनारी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाणथळींच्या जमिनी निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय महापालिकेच्या अंतिम विकास आराखड्यात जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या पाणथळींवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या फ्लेमिंगोंचा अधिवास पूर्णपणे नष्ट होणार आहे तर, या खाडीकिनारी बंगले-इमारतींची रांग उभी राहिलेली दिसणार आहे.

हेही वाचा >>> पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

नवी मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला सादर केलेल्या विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बिल्डरधार्जिण्या बदलांवरून नाराजीचा सूर उमटत आहे. अडवली, भुतवली, बोरिवली या गावांतील शेकडो एकरचा हरितपट्टा निवासी संकुलांसाठी खुला करून देणाऱ्या पालिकेने सीवूड्स येथील पाणथळींवरही नांगर फिरवल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. ऑगस्ट २०२२मध्ये महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप विकास आराखड्यात पाम बिच मार्गालगत असलेल्या या जागांवर पाणथळ जागांची नोंद करण्यात आली होती. राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या आराखड्यात मात्र या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. सीवूड्स येथील या परिसरात एनआरआय कॉलनीसह अनेक उच्चभ्रूंच्या वसाहती आहेत. याच भागातील एका पाणथळ जमिनीवर भराव करून सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पाचा वाद सुरू असतानाच त्याच्याही पुढे खाडीला खेटून असलेल्या पाणथळ भागांवर बांधकामांना मोकळे रान देण्यात आले आहे. याच जमिनीवर आलिशान बंगल्यांची उभारणी करण्यासाठी एक अब्जाधीश उद्याोगपती प्रयत्नशील असल्याची चर्चा पूर्वी सुरू होती. त्यामुळे विकास आराखड्यातील बदलांचा लाभार्थी हा उद्योगपतीच असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

फ्लेमिंगोंच्या घरट्यांवर बुलडोझर

पामबिच मार्गावर असलेल्या दिल्ली पब्लिक स्कुलच्या बाजूस नेरुळ सेक्टर ५२ (ए) भागातील पाणथळ क्षेत्र निवासी संकुलांसाठी खुले करण्यात आले आहे. तेथून पुढेच काही अंतरावर टी. एस. चाणक्य शिक्षणसंस्ऋोच्या मागील बाजूस ‘पॉकेट ए’म्हणून नोंद असलेले पाणथळ क्षेत्रही खुले करण्यात आले आहे. त्याचवेळी चाणक्य संकुलालगतच्या रस्त्याची रुंदी १५ मीटरवरून ३० मीटर करण्याचाही आराखड्यात प्रस्ताव आहे. त्यानुसार भविष्यात खाडीकिनारी उभ्या राहणाऱ्या आलिशान वसाहतींना ‘राजमार्ग’ तयार करून दिला जाईल, असे सांगण्यात येते. सध्या या परिसरात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो वास्तव्यास येतात. या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी पर्यावरणप्रेमींची झुंबड उडते. मात्र, भविष्यात हे चित्र बदलणार आहे.

एनआरआय संकुलालगत बांधकामांची रांग ?

एनआरआय संकुलालगतचा एक मोठा भूखंड मध्यंतरी देशातील एका बहुचर्चित उद्योगपतीच्या प्रकल्पासाठी खुला करण्यात आला आहे. या जागेवर या समूहाकडून बांधकाम सुरु असून नवी मुंबई महापालिका हद्दीत मोडत असूनही या संपूर्ण प्रकल्पासाठी विशेष नियोजनाचे अधिकार सिडकोला बहाल करण्यात आले आहेत. याच प्रकल्पास लागूनच नेरुळ पाॅकेट ६० (बी) मधील पाणथळीचे मोठे क्षेत्रही निवासी संकुलासाठी खुले करण्यात आले आहे.

खाडीकिनारा गिळंकृत?

नवी मुंबईतील पाम बिच मार्गावरील जमिनींना सोन्याचा भाव मिळतो असा आजवरचा अनुभव आहे. या मार्गावरील उपनगरांकडील जवळपास ९० टक्के भुखंडांची विक्रि यापुर्वीच करण्यात आली आहे. सागरी किनारा नियमन क्षेत्रातील नियमांमुळे खाडीकडील क्षेत्रात बांधकामांवर निर्बंध होते. सीआरझेडचे क्षेत्र मध्यंतरी केंद्र सरकारने शिथील केल्याने खाडी किनाऱ्यावरील बहुतांश क्षेत्र हे सीआरझेड-२ म्हणजेच परवानगी क्षेत्रात मोडू लागले आहे. या भागात पाणथळ क्षेत्र तसेच त्यावर पक्ष्यांचा असलेला अधिवास लक्षात घेता येथे बांधकामांना परवानगी देऊ नये असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. असे असताना विकास आराखड्यात पाणथळ क्षेत्राना वगळण्यात आल्याने खाडी किनाऱ्यापर्यतच्या जमिनीवर डोळा ठेवून असणाऱ्या बिल्डर, उद्योगपतींची आता चंगळ होईल असा अंदाज बांधला जात आहे.

“हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे स्पष्ट उल्लंघन आहे. २०११ मध्ये तयार करण्यात आलेल्या नॅशनल वेटलँड्स अॅटलासनुसार दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राच्या पाणथळींना संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये सीवूड्स येथील पाणथळींचाही समावेश आहे. याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने या परिसरात गोल्फ कोर्स उभारण्याचा प्रस्ताव रद्द ठरवला होता. पालिकेच्या आराखड्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.” – सुनील अगरवाल, संस्थापक, सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्मेंट