राम माधव

भाजपचे सरचिटणीस व ‘इंडिया फाउंडेशन’चे संचालक

स्वातंत्र्यापासून प्रदीर्घ काळ जवळपास २५ टक्के वर्ग औपचारिक अर्थव्यवस्थेच्या बाहेर होता. त्यांच्यासाठी सरकारी लाभ म्हणजे रोख स्वरूपात मिळणारी रक्कम. त्यातून भ्रष्टाचाराचे कुरणच तयार झाले. गरिबांना राजकारणी व नोकरशहांच्या कृपादृष्टीवर अवलंबून राहावे लागत होते. ‘जनधन’, ‘आधार’ व मोबाइलने चित्रच बदलून गेले. त्यामुळे गरिबांचे आर्थिक सबलीकरण तर झालेच पण त्यांना आत्मसन्मान मिळाला.

सर्वाना हा आत्मसन्मान मिळवून देणे, ही नरेंद्र मोदी यांची मोठी उद्दिष्टपूर्ती आहे..

ज्यूलिअस सीझर हा केवळ राज्यकर्ताच नव्हे तर एक कुशल योद्धा होता. नेहमी युद्धभूमीवर आघाडीवर राहून तो सैन्यासाठी प्रेरणास्रोत होता. त्यामुळे त्याच्या ज्या युद्धमोहिमा होत्या त्या कुशल नेतृत्वामुळे ओळखल्या जात होत्या. सैनिकांसाठी तो एक जिगरबाज कर्णधार होता.

एखाद्या समाजाने प्रतिमा तयार केल्याने त्यातून नेतृत्व उभे राहात नाही; तर आपल्या वैशिष्टय़पूर्ण कृतीने तसेच विश्वासार्ह अशा धोरणांतून जो आपली प्रतिमा स्वत:च निर्माण करतो तोच खरा नेता म्हणून ओळखला जातो.

कैक शतकांपूर्वी सीझरने आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. आता नरेंद्र मोदी यांनी समाजमनावर छाप उमटवली आहे.

मोदींची सर्वात मोठी ताकद म्हणजे एखादे लक्ष्य निर्धारित करून त्याच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहणे. त्यांनी एकाग्रपणे, यश मिळवण्याचेच उद्दिष्ट ठेवले. त्यापासून कोणीही त्यांना विचलित करू शकत नाही. त्यांच्या या कामाच्या धडाक्यामुळे त्यांची एक उत्तुंग प्रतिमा तयार झाली आहे त्यातून त्यांना हरविणे कठीण आहे.

प्रशियातील (जर्मन साम्राज्यातील) रणनीतीकार व महान योद्धा कार्ल व्होन क्लॉजव्हीट्झ यांनी ‘नेहमी बलवान असणे हीच उत्तम रणनीती’ असल्याचे सांगितले आहे. इतर वेळीदेखील तसेच निर्णायक क्षणी ती कामी येते. एकदा लक्ष्य निर्धारित केले की मग रणनीतीमध्ये लवचीकपणा उपयोगाचा नाही. थोडक्यात काय तर एकाग्रतेने केलेली कृती महत्त्वाची ठरते.

विरोधकांच्या नेतृत्वाच्या तुलनेत मोदींनी नेहमीच लक्ष्य निर्धारित करून ध्येयाकडे वाटचाल केली. त्यांची ‘चौकीदार’ मोहीम हीदेखील अशाच वैशिष्टय़पूर्ण नेतृत्वगुणाची झलक होती. विरोधकांच्याच दृष्टीने पाहिल्यास, ते एक नाटक किंवा भावनिक आवाहन वाटेल. मोदींसाठी मात्र उद्दिष्टपूर्तीसाठी केलेली ती वाटचाल आहे.

महात्मा गांधी यांचा उद्घोष मोदी जेव्हा जेव्हा करतात, तेव्हा त्यात तोंडदेखलेपणा असू शकत नाही. गांधीजींनीही उद्दिष्टपूर्तीसाठी नावीन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण मार्गाचा अवलंब केला. मग सत्याग्रह असो किंवा अहिंसा चळवळ असो वा पददलितांच्या हक्कांसाठीचा संघर्ष; यांतून महात्माजींनी ब्रिटिश सत्तेला वठणीवर आणले. मोदींवरही महात्माजींच्या विचारांचा प्रभाव आहे आणि गांधीचरित्रापासून त्यांनी प्रेरणाही घेतली आहे.

‘समाजातील शेवटच्या व्यक्तीला सन्मान मिळाला पाहिजे’ या महात्माजींच्या शिकवणुकीच्या आधारावरच मोदींच्या प्रचाराची दिशा केंद्रित आहे. माओ व मार्क्‍स यांनी समाजवादी समाजरचनेत सर्व नागरिक समान असतील हे स्वप्न पाहिले. मात्र ते अपयशी ठरले. मोदींनी मात्र वेगळ्या पद्धतीने आपले हे धोरण सादर केले.

त्यांची जी चौकीदार मोहीम आहे तिचा सर्वसाधारण अर्थ असाच आहे की, कोणतेही काम कमी दर्जाचे नाही. त्यातून दोन उद्दिष्टे साध्य झाली, एक म्हणजे विरोधकांना त्याचा प्रतिवाद करणे अशक्य झाले आणि दुसरे म्हणजे डॉक्टर, अभियंते, उद्योजक यांनीदेखील या मोहिमेशी स्वत:ला जोडून घेतले. त्यातून या कामाला प्रतिष्ठा मिळाली, ही दुसरी महत्त्वाची उद्दिष्टपूर्ती. त्यामुळे आज एखादा छोटा कर्मचारी असो वा अन्य कोठली सेवा देणारा, त्याचा सन्मान वाढला आहे.

गेल्या पाचही वर्षांत, सामान्य माणसाची प्रतिष्ठा ही मोदी सरकारच्या दृष्टीने अग्रक्रमाची बाब होती. प्रधानमंत्री जनधन योजनेपासून ते स्वच्छ भारत चळवळीपर्यंत साऱ्याचा गाभा सामान्य व्यक्तीला मान-सन्मान देणे हाच राहिला आहे.

स्वातंत्र्यानंतर बराच काळ समाजातील पंचवीस टक्के वर्ग हा औपचारिक अर्थव्यवस्थेच्या बाहेर राहिला आहे. सरकारी लाभ म्हणजे त्यांच्या दृष्टीने रोख रक्कम पदरात पडणे. मात्र त्यातून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी व्यवस्था तयार झाली. गरिबांना मदतीसाठी नोकरशहा व राजकारण्यांच्या दयेवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र जनधन, आधार व मोबाइलने हे सारे चित्रच बदलून गेले. यातून गरिबांचे केवळ आर्थिक सबलीकरणच झाले असे नाही तर त्यांचा सन्मानही वाढला.

स्वच्छ भारत अभियानाबाबतही असेच म्हटले पाहिजे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी साठ टक्के ग्रामीण घरांमध्ये शौचालये नव्हती. त्याचा फटका महिलांना बसत होता. रोगराई, शिक्षणाच्या संधी हुकणे या गोष्टी घडत होत्या. घरात आणि शाळांमध्ये शौचालये नसल्याने या समस्या होत्या. स्वच्छ भारत योजनेमुळे चित्र बदलले. शौचालये ही केवळ स्वच्छतेची नव्हे तर महिलांच्या सन्मानाची प्रतीके ठरली.

उत्तम संवादकौशल्याचा लाभ मोदींना होतो असा टीकाकारांचा आक्षेप असतो. मात्र उत्तम काम केल्याशिवाय, केवळ संवादकौशल्याच्या जोरावर ते जनतेची मने कसे जिंकू शकतील? हा विचार विरोधक विसरतात. भारतीय मतदार हा एका पातळीवर प्रगल्भ आहे तितकाच तो कठोरदेखील आहे. यापूर्वी अनेक वेळा प्रचारात आणि नंतर हे दिसून आले आहे. जनतेने अशा नेत्यांना जागा दाखविली आहे.

मोदींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वचनपूर्तीबरोबरच उत्तम संभाषणकौशल्याने ते जनतेचे लाडके नेते बनले आहेत. खऱ्या मुद्दय़ांभोवती निवडणूक केंद्रित व्हायला हवी. उदाहरणार्थ मोदींची भ्रष्टाचाराविरोधातील लढाई, विकासावर भर तसेच सामान्य व्यक्तीचे जीवनमान उंचावणे या बाबी पुढे येणे महत्त्वाचे आहे.

मोदींची ‘सबका साथ सबका विकास’ ही केवळ एक घोषणा नव्हती तर ज्या देशवासीयांना ते कुटुंब मानतात त्या १३० कोटी भारतीयांसाठी ही आश्वासने त्यांनी वास्तवात उतरवली.

धर्म किंवा इतर मुद्दे काढून निवडणूक वळवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अल्पसंख्याक सरसकट मोदींचा द्वेष करतात असे मानण्याचे कारण नाही. त्यांच्या योजनांचा गेल्या पाच वर्षांत अल्पसंख्याकांनाही फायदा झाला आहे.

मोदींनी देशात अभूतपूर्व असा बदल घडविला तसेच त्यांची प्रतिमा गेल्या काही वर्षांत बदलली आहे.

समग्र विकासाचे ध्येय बाळगून पुढे जाणारा एक खंबीर नेता, त्यातही देशाच्या संस्कृतीत त्यांची मुळे घट्ट रुजलेली आहेत ही मोदींची जगभरात प्रतिमा आहे. देशवासीयांची मने तर त्यांनी जिंकलीच, पण जगभरातील मानसन्मानही त्यांना मिळाले. हीच गोष्ट त्यांना निवडणूकही जिंकून देणार आहे.