राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, छत्तीसगढ व तेलंगणा या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या निवडणुका निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळेच सर्वच पक्ष जय्यत तयारी करीत आहेत. राजस्थानमध्ये होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील अंतर्गत वादामुळे चर्चेत आहे. प्रादेशिक पक्षही आपला प्रभाव दाखवण्याच्या तयारीत असताना भारत आदिवासी पार्टी निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहे. भारत आदिवासी पार्टी राजस्थानच्या निवडणुकीत मतांचे गणित बिघडवू शकते का, आधीच्या निवडणुकांमध्ये या पार्टीचा प्रभाव किती होता, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

२०१८ मध्ये झालेल्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय ट्रायबल पार्टीने (बीटीपी) आपला प्रभाव दाखविला. दक्षिण राजस्थानमधील निवडणूक या पक्षाने लढवली होती. परंतु, या पक्षातून काही आदिवासी गटांनी फारकत घेतली आणि स्वतःची भारत आदिवासी पार्टी (बीएपी) स्थापन केली. भारतीय ट्रायबल पार्टीचे चोरासीमधील आमदार राजकुमार रोत आणि सागवारामधील आमदार रामप्रसाद दिंडोर यांनी पक्षाला राम राम ठोकत बीएपीमध्ये प्रवेश केला.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”

हेही वाचा : राजस्थान : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यास उशीर?

काँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही पक्ष समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासी लोकांनाही प्रभावीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राजस्थानमध्ये अनुसूचित जमातींची (एसटी) संख्या १३.४८ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी गटांनीच स्थापन केलेला भारत आदिवासी पार्टी हा पक्ष मतांचे गणित बदलवू शकतो. दक्षिण राजस्थानमधील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून १७ जागा लढवण्याचा या पक्षाचा विचार आहे.

हेही वाचा : समलैंगिकतेचे समर्थन, मात्र विवाहाला विरोध; रा. स्व. संघाचे धोरण असे का ?

”गुजरातमध्ये छोटूभाई वसावा आणि महेशभाई वसावा यांनी भारतीय ट्रायबल पार्टीची स्थापना केली. आम्ही त्यांना दक्षिण राजस्थानमध्ये भारतीय ट्रायबल पार्टीचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले होते. कारण- दक्षिण राजस्थानमध्ये अनेक वर्षे चळवळी, आंदोलने केल्यावर आम्हाला एका राजकीय व्यासपीठाची गरज वाटू लागली. पण काही काळाने आमच्या लक्षात आले की, भारतीय ट्रायबल पार्टीमध्ये एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. उदाहरणादाखल सांगायचे झाले, तर धारियावाड पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या स्थानिक संघटनेला मान्य नसलेला एक उमेदवार निवडला गेला. पक्षाचे नेतृत्व एकतर्फी विचार करीत असल्यामुळे पक्षाशी फारकत घेऊन भारत आदिवासी पार्टी नावाने पक्ष तयार करण्याचे आम्ही ठरवले,” असे डुंगरपूर जिल्ह्यातील चोरसी येथील आमदार राजकुमार रोत यांनी सांगितले.

हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष बिघडवणार भाजपा-काँग्रेसच्या मतांचे गणित? काय सांगते जुनी आकडेवारी?

”आम्ही त्या पोटनिवडणुकीमध्ये भारत ट्रायबल पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. कारण- तो उमेदवार स्थानिक संघटनेला मान्य नव्हता. अपक्ष म्हणून उभे असणारे उमेदवार थावरचंद डामोर यांना समर्थन दिले. त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली; तर डामोरे यांना दुसरे स्थान मिळाले. त्यानंतर भारत ट्रायबल पार्टीच्या आमदार, नेते व सरपंचांनी भारत आदिवासी पार्टीमध्ये प्रवेश केला. आताच्या निवडणुकीत आम्ही दक्षिण राजस्थानमध्ये किमान १७ जागा लढवण्याची योजना आखली आहे. जर राष्ट्रीय पक्ष आदिवासींच्या विकासाचा प्रामाणिकपणे विचार करणार असतील, तर आम्ही त्यांच्याशी युती करण्यास तयार आहोत. आदिवासींमधील भिल्ल समूहासाठी वेगळ्या राज्याची आमची मागणी आहे. दक्षिण राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी संविधानानुसार आदिवासींना असणारे हक्क-अधिकार कधीच दिले नाहीत. आताच्या निवडणुकीत आदिवासींना आरक्षण आणि हक्क मिळावेत, हा मुद्दा आम्ही उचलून धरणार आहोत, ” असेही रोत यांनी सांगितले.

९ ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात निवडणूक आयोगाने भारत आदिवासी पार्टीला हॉकी स्टिक आणि बॉलचे चिन्ह दिले असून, भारतीय ट्रायबल पार्टी ऑटोरिक्षा या चिन्हाखाली निवडणूक लढवणार आहे.

”अलीकडे दक्षिण राजस्थानमध्ये आदिवासींचा हिंदुत्ववादी संघटनांशी संघर्ष होत आहे. वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या संघटनांशी हा संघर्ष आहे. या संघटनांनी आदिवासी हिंदू असल्याचा कायम प्रचार-प्रसार केला. आमचा याच गोष्टीला विरोध आहे. आमची स्वतंत्र संस्कृती आहे. आमची संस्कृती ही हिंदू संस्कृतीशी साधर्म्य साधत नाही. आम्हाला आमचे हक्क-अधिकार हवे आहेत. आम्ही आदिवासींचा विकास केंद्रस्थानी ठेवून संघर्ष करीत आहोत. त्यामुळे आम्हाला जनतेचाही पाठिंबा आहे,” असे बीएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल रोत यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

भारत आदिवासी पार्टीच्या एका नेत्याने सांगितले, ” उदयपूर, बांसवाडा, डुंगरपूर, प्रतापगढ व सिरोही या जिल्ह्यांतील विधानसभेच्या जागा लढवण्याची पक्षाची योजना आहे; ज्यात उदयपूर ग्रामीण, झाडोल, सालुंबर, डुंगरपूर, सागवारा, चोरासी, असपूर, बांसवाडा, कुशालगड, बागडोल, प्रतापगड, धारियावाड व पिंडवाडा या मतदारसंघांचा समावेश असेल.”

या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण राजस्थानमध्ये भारत आदिवासी पार्टी मतांचे गणित बदलवणार का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.