Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. पुढील टप्प्यांसाठी प्रत्येक पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला माजी न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, अजित ए.पी. शहा आणि एन. राम यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित निवडणुकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी आमंत्रित केले होते. राहुल गांधी यांनी सार्वजनिक चर्चेच्या पुढाकाराचे कौतुक करत चर्चेत भाग घेण्यास आनंद होईल, असे सांगितले. मी किंवा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सार्वजनिक चर्चा करू इच्छितात, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, यावर पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष (BJYM) तेजस्वी सूर्या यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संभाव्य चर्चेसाठी युवा विंगचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांची निवड केली. तेजस्वी सूर्या यांनी आधी मोदींना दिलेल्या आव्हानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, काँग्रेस नेते पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत. मात्र, आता दोन प्रतिस्पर्धी पक्षांमधील सार्वजनिक चर्चेचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

भाजपाच्या युवा विंगचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश (छायाचित्र-इनस्टाग्राम/अभिनव प्रकाश)

हेही वाचा : महाराष्ट्रातील दलित समुदाय घेतोय संविधान रक्षणाचा संकल्प; राजकारणातील संविधानाच्या दाव्या-प्रतिदाव्यांवर त्यांचे मत काय?

कोण आहेत अभिनव प्रकाश?

भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हे गांधी घराण्याच्या पारंपरिक क्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथील आहेत. “ते केवळ आमच्या युवा शाखेचे एक प्रतिष्ठित नेते नाहीत, तर ते सरकारद्वारे लागू केलेल्या धोरणांचे आणि सुधारणांचे स्पष्ट प्रवक्ते आहेत,” असे सूर्या यांनी ‘एक्स’वर लिहिले. ३० वर्षीय अभिनव प्रकाश दलित समुदायातील पासी जातीतून येतात. रायबरेलीमध्ये दलित समुदायाची संख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे. या मतदारसंघातून यंदा राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

अभिनव प्रकाश सध्या दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे सहायक प्राध्यापक आहेत. ते जवाहरलाल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. देशातील सर्वात प्रतिष्ठित वाणिज्य महाविद्यालयांपैकी एक असलेल्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मध्ये त्यांनी अध्यापन केले आहे. यामुळे त्यांना देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांचा सखोल अभ्यास आहे. तेजस्वी सूर्या म्हणाले, राहुल गांधींबरोबर चर्चा करण्यासाठी भाजयुमोचा एक प्रवक्ता पुरेसा आहे.

चर्चेचा मुद्दा नक्की आला कुठून?

निवृत्त न्यायमूर्तींचे संघटन आणि एका पत्रकाराने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना राजकीय चर्चेसाठी पत्र लिहिले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए. पी. शाह आणि ‘द हिंदू’चे माजी संपादक एन. राम यांनी गांधी आणि मोदींना एकाच व्यासपीठावर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगावी संविधानाच्या मुद्यावरून राजकारण केल्याबद्दल दलितांमध्ये नाराजी, मुस्लिमही भीतीच्या छायेत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींविरुद्ध चर्चेचे आव्हान स्वीकारल्याची घोषणा केली. या चर्चेत पंतप्रधानांनी सहभाग घ्यावा असे सांगून ते म्हणाले की, “मोठ्या पक्षांसाठी एका व्यासपीठावरून देशासमोर त्यांचा दृष्टिकोन मांडणे हा सुदृढ लोकशाहीसाठी एक सकारात्मक उपक्रम असेल.” परंतु, भाजपाने चर्चेचे आमंत्रण नाकारले. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत किंवा ते पंतप्रधान पदाचे उमेदवारही नाहीत आणि म्हणूनच पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले. आता राहुल गांधी अभिनव प्रकाश यांच्याशी चर्चेसाठी तयार होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp abhinav prakash debate with rahul gandhi rac