बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दल हा पक्ष लोकसभेच्या २६ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवतो आहे. मात्र, त्यातील दोन मतदारसंघातील निवडणूक स्वत: लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी फार महत्त्वाची आहे. कारण मिसा भारती आणि रोहिणी आचार्य या लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची भाजपाच्या उमेदवारांशी तगडी टक्कर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सारण मतदारसंघातून रोहिणी आचार्य (४४) उभ्या आहेत. येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यामध्ये या मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे. त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांनी चारवेळा याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. लालू यांच्या ज्येष्ठ कन्या मिसा भारती (४७) पाटलीपुत्र मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. इथे भाजपाने राम कृपाल यादव यांना उमेदवारी दिली आहे. एकेकाळी ते लालू प्रसाद यादव यांचेच सहकारी होते.

हेही वाचा : पलटूराम विरुद्ध एकनिष्ठ! राजकीय हिंसाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघात चुरशीची लढत

‘किडनी देनेवाली बेटी’

मिसा भारती यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव असल्याने लालू प्रसाद यादव यांनी आपल्या दुसऱ्या मुलीच्या मतदारसंघात अधिक लक्ष घातले आहे. ते रोहिणी आचार्य यांना प्रचारामध्ये मदत करत आहेत. रोहिणी आचार्य यांची ‘किडनी देनेवाली बेटी’ म्हणून मतदारसंघामध्ये विशेष ओळख आहे. डिसेंबर २०२२ मध्ये लालू प्रसाद यादव यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तेव्हा रोहिणी यांनी आपल्या वडिलांना प्रत्यारोपणासाठी एक किडनी दिली होती. राजदचा मतदार या गोष्टीकडे अत्यंत भावनिक पद्धतीने पाहतो. त्यामुळे राजदकडूनही या गोष्टीचा वापर प्रचारासाठी करण्यात येतो आहे. रोहिणी यांचे बंधू आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या आवाहनावर आणि लालू प्रसाद यादव यांच्या लोकप्रियतेवर रोहिणी आचार्य यांच्या विजयाच्या शक्यता अवलंबून आहेत. या मतदारसंघामध्ये राजपूत आणि यादव समुदायाची ताकद जवळपास सारखीच आहे. सारणमधील १८ लाख मतदारांपैकी अंदाजे ३.५ लाख मतदार यादव, तर ३.२५ लाख मतदार राजपूत आहेत. सुमारे दोन लाख मतदार मुस्लीम आणि एक लाख बनिया आणि कुशवाह (इतर मागासवर्गीय) मतदार आहेत.

रोहिणी यांच्यासमोर भाजपाचे विद्यमान खासदार राजीव प्रताप रुडी यांचे आव्हान आहे. ते या मतदारसंघातून चार वेळा खासदार राहिले आहेत. २००९ मध्ये लालू प्रसाद यादव यांनी रुडी यांचा पराभव केला होता. मात्र, रुडी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा पराभव केला आणि २०१९ मध्येही हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. तब्येतीच्या कारणास्तव लालू प्रसाद यादव शक्यतो प्रचारामध्ये उतरणे टाळतात. मात्र, लालूंनी रोहिणी यांच्या प्रचारासाठी गेल्या पंधरा दिवसांमध्ये छपरा आणि पाटणा येथील स्थानिक राजद कार्यकर्त्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या आहेत.

“सारणमध्ये बदल व्हायला हवा. राजीव प्रताप रुडी यांनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना ऊस पिकवण्याचे आवाहन केले होते. मात्र, साखर कारखाना सुरू झालाच नाही. आता लालू प्रसाद यांची मुलगी निवडणूक लढवत असल्याने इथे चांगली लढत होणार आहे”, असे मत सारण जिल्ह्यातील मेकरचे रहिवासी मोहम्मद आलमगीर यांनी मांडले. गुरुवारी तेजस्वी यांच्याबरोबर अमनौरमध्ये प्रचार करताना रोहिणी म्हणाल्या की, “मला सारणच्या रहिवाश्यांची मुलगी व्हायचे असून मी येथे लोकांची कामे करण्यासाठी आले आहे. आम्ही इथे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत.”

तेजस्वी यादव या मतदारसंघामध्ये प्रचार करताना बहिणीने वडिलांना किडनी देण्याचा किस्सा वारंवार सांगताना दिसतात. आपल्या सत्ताकाळात तरुणांना अधिकाधिक रोजगार दिल्याचा प्रचारही ते करत आहेत. “मी तरुणांना नोकरी देण्याचे वचन सत्तेत असताना पूर्ण केले आहे. पण, पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत किती नोकऱ्या दिल्या हे त्यांना सांगता येईल का?” असा प्रश्नही त्यांनी केला.

मात्र, रोहिणी यांच्या उमेदवारीवर काही राजद कार्यकर्ते नाराज आहेत. रुडी यांच्यासारख्या मातब्बर नेत्यासमोर रोहिणी यांची उमेदवारी योग्य ठरत नसल्याचे त्यांचे मत आहे. “रोहिणी यांनी अत्यंत उत्साहाने प्रचाराला सुरुवात केली असली तरी आता त्यांचा उत्साह मावळला आहे”, असे मत पक्षाच्याच एका कार्यकर्त्याने नाव न घेण्याच्या अटीवर मांडले आहे.

मिसा भारती जिंकतील का?

मिसा यांनी मतदारसंघातील अधिकाधिक भागामध्ये जाऊन चांगला प्रचार करण्यावर भर दिला आहे. मुस्लीम-यादव या आपल्या पारंपरिक मतदारांवर त्यांची भिस्त आहे. या मतदारसंघात २०.५ लाख मतदार आहेत. त्यातील ४.२५ लाख मतदार कायस्थ, भूमिहार आणि ब्राह्मण जातीचे आहेत. आठ लाख ओबीसींमध्ये ४.२५ लाख मतदार यादव आहेत, तर तीन लाख पासवान, रविदास आणि मुशहर या अनुसूचित जातींचे मतदार आहेत.

हेही वाचा : “रा. स्व. संघाची गरज संपली, नड्डा यांनीच दिले संकेत”, उद्धव ठाकरे यांचा टोला

मिसा भारती आपल्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजपावर हल्लाबोल करत आहेत. सध्या मोदी लाट नसल्याचा दावाही त्या करत आहेत. दानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताना त्या म्हणाल्या की, “मोदी फॅक्टर कुठे आहे? त्यांनी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. महागाई वाढली आहे. लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. जर इंडिया आघाडी सत्तेत आली तर आम्ही एक कोटी नोकऱ्या देऊ.” पुढे त्या म्हणाल्या की, “२०१९ च्या निवडणुकीत बिहारमधील ४० पैकी ३९ मतदारसंघांमध्ये यश मिळूनही एनडीए आघाडी इतकी अस्वस्थ का आहे, हे मला कळत नाही. मोदींच्या मागे सगळे खासदार का लपत असतात, कोण जाणे? याचा अर्थ त्यांनी खराब कामगिरी केली आहे.”

दुसरीकडे भाजपाचे उमेदवार राम कृपाल यादव म्हणाले की, “राजद पक्ष माझ्याबद्दल काय म्हणतो, त्याकडे मी लक्ष देत नाही. मी मतदारसंघामध्ये मोठी कामे केलेली नसतीलही, पण मी अनेक लहान-सहान विकासकामे केली आहेत. नरेंद्र मोदी हा फॅक्टर बिहारच नव्हे तर संपूर्ण देशभरात महत्त्वाचा ठरतो आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2024 lalu prasad yadav campaign for daughters misa bharti rohini acharya vsh97