मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री यशोधरा राजे सिंदिया यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा जाहीर सभेतून केली आहे. यशोधरा राजे यांनी जर शिवपुरी मतदारसंघातून निवडणूक लढविली नाही, तर हा मतदारसंघ त्यांचा पुतण्या आणि केंद्रीय मंत्री जोतीरादित्य सिंदिया यांच्यासाठी सोडला जाऊ शकतो, अशी अटकळ आता बांधण्यात येत आहे. गुरुवारी शिवपुरी येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना यशोधरा म्हणाल्या, “आगामी निवडणूक मी लढविणार नसल्याचे याआधीही सांगितले होते. मी तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी इथे आले आहे. आता माझी निरोप घेण्याची वेळ झाली आहे. माझी आई राजमाता राजे सिंदिया यांच्या पाऊलखुणावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आले. त्यांच्याच प्रेरणेमुळे मी हा निर्णय घेत आहे. माझ्या या निर्णयाला तुम्ही सर्व पाठिंबा द्याल, अशी मी आशा करते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे, असेही यावेळी यशोधरा सिंदिया यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यात भाजपा नेतृत्वाला पत्र लिहून यशोधरा सिंदिया यांनी यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याची इच्छा नसल्याचे कळविले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरून जाहीर केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी सांगितले की, प्रकृतीच्या कारणास्तव यशोधरा सिंदिया यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा >> सिंदिया यांच्यामुळे भाजपाचे नुकसान? आतापर्यंत भाजपाच्या चार नेत्यांनी पक्ष सोडला

भाजपातील सूत्रांनी माहिती दिल्यानुसार आता शिवपुरी विधानसभेसाठी पक्ष नवी रणनीती आखत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जनतेमध्ये रोष असल्यामुळे भाजपाकडून केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा घाट घातला जात आहे. शिवपुरी मतदारसंघातही अशाच प्रकारे काहीतरी केले जाईल, अशी अटकळ सध्यातरी बांधण्यात येत आहे. “जोतीरादित्य सिंदिया यांना यशोधरा यांचा मतदारसंघ किंवा त्याच्या शेजारी असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी दिली जाऊ शकते. राज्यातील नेत्यांना पुढच्या उमेदवार यादीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होऊ शकेल. काहीही होऊ शकते”, अशी प्रतिक्रिया राज्यातील एका भाजपा नेत्याने दिली.

जोतीरादित्य सिंदिया यांनी आजवर एकदाही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. २००२ साली त्यांचे वडील आणि काँग्रेस नेते माधवराव सिंदिया यांच्या निधनानंतर मोकळ्या झालेल्या गुना लोकसभेची पोटनिवडणूक लढवून जोतीरादित्य यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी २००२ ते २०१९ पर्यंत गुना लोकसभेतून काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. जेव्हा त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले.

यशोधरा सिंदिया यांचा शिवपुरीमधून चार वेळा विजय

यशोधरा सिंदिया चौहान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे क्रीडा, युवक कल्याण, तंत्र शक्षिण आणि कौशल्य विकास व रोजगार या मंत्रालयांचा कारभार सोपविलेला आहे. जिवाजीराव सिंदिया (ग्वाल्हेरचे शेवटचे राजे) आणि विजयाराजे सिंदिया यांच्या त्या कनिष्ठ कन्या आहेत. १९९८ साली त्यांनी राजकारणात प्रवेश घेत शिवपुरी विधानसभेतून विजय मिळवला होता. २००३ साली त्यांनी पुन्हा या मतदारसंघावर विजय मिळवल्यानंतर त्यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.

आणखी वाचा >> ज्योतिरादित्य सिंधिया यांना धक्का; एकामागून एक निकटवर्तीय नेत्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

२००७ साली यशोधरा यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर येथून निवडणूक लढविली आणि विजयही मिळविला. २०१३ साली त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात पाऊल ठेवले आणि शिवपुरी मतदारसंघातून विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. चौहान सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. २०१८ साली भाजपाचा पराभव होईपर्यंत त्या मंत्रिपदावर कायम होत्या. २०२० साली भाजपाने काँग्रेसमध्ये फूट पाडून सत्ता मिळविल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One scindia makes way for another bjp abuzz after yashodhara raje bids goodbye to shivpuri kvg