Uttar Pradesh Loksabha Election भाजपा लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकेल आणि एनडीए ४०० पेक्षा जास्त जिंकणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हे ध्येय समोर ठेऊन भाजपा कामाला लागली आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही जागावाटपावरून मतभेद सुरूच आहेत. लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक आहेत, परंतु पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये तिकीट वाटपावरून जातीय मतभेद पाहायला मिळत आहेत. तिकीट वाटपाच्या निर्णयाने राजपूत समुदाय भाजपावर नाराज आहे. भाजपाने मुजफ्फरनगर येथून केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांना उमेदवारी दिली आहे, मात्र या उमेदवारीवर राजपूत समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेरठ येथील भाषणानंतर रार्धना गावातील राकेश सिंह म्हणाले, “राजपूत तो मेंढक है| कुएं में कुद गया तो उसे वही दुनिया लगती है| (राजपूत हे बेडकासारखे आहेत. विहिरीत पडले तर त्यांना तेच त्यांचे जग वाटू लागते). पण त्यांना बदलावे लागेल, नाहीतर समाज आपली ओळख गमावून बेसल” असे ते म्हणाले. “आम्हाला योगी आदित्यनाथांची अडचण नाही, आमचा संबंध बालियान यांच्याशी येतो”, असे ते म्हणाले.

एक लाख राजपूत मतदार भाजपा उमेदवाराच्या विरोधात

संपूर्ण राजपूत समुदाय मुझफ्फरनगरमधील भाजपाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या विरोधात आहे. मतदारसंघात येणाऱ्या २४ गावांमधील १८ लाख मतदारांपैकी अंदाजे एक लाख मतदार आणि पारंपरिकपणे भाजपा समर्थक असलेला राजपूत समुदाय बालियान यांना विरोध करत आहे. राजपूतांनी भाजपावर समुदायाला बाजूला सारत समुदायांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. भाजपाने या भागात कोणताही विकास न केल्याचा आरोपदेखील राजपूत समुदायाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : Lok Sabha Elections 2024: मोदी सरकारसाठी राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा किती परिणामकारक ठरेल? मतदारांच्या मनात काय?

सूत्रांचे म्हणणे आहे की, तिकीट वाटपावरून इथे वाद निर्माण झाला आहे. “आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे; जिथे पाच जणांना जमू दिले जात नाही, तिथे दहा ठाकूर विरोध करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थकांना बाजूला सारल्यासारखे वाटत आहे”, असे एका अंतर्गत सूत्राने सांगितले. या गावांमध्ये ठाकूर सर्वात मजबूत गट आहे, तर दुसर्‍या क्रमांकावर मुस्लीम समुदाय आहे. या गावांमध्ये जाट मतदारांची संख्या फारच कमी आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सभेआधी, सहारनपूरच्या नानौता येथे एक राजपूत महापंचायत आयोजित करण्यात आली होती; ज्यामध्ये भाजपाच्या समाजाप्रती असलेल्या राजकीय द्वेषावर टीका करण्यात आली. पश्चिम उत्तर प्रदेशमधून एकाही ठाकूरला तिकीट का दिले गेले नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. मेरठमधील एका गावात १६ एप्रिलला आणखी एक महापंचायत होणार आहे.

राजपूत समुदाय मुझफ्फरनगरमधील भाजपाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या विरोधात आहे. (छायाचित्र-पीटीआय)

जातीय समीकरण

भाजपाने २०१९ मध्ये सहारनपूरमधून राघव लखनपाल (ब्राम्हण नेता) यांना तिकीट दिले होते, मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यासह भाजपाने संजीव बालियान, प्रदीप चौधरी (गुर्जर नेते, कैराना) आणि घनश्याम सिंह लोधी (ओबीसी नेते, रामपूर) यांनाही तिकीट दिले होते; जे निवडणुकीत विजयी झाले. बिजनौर जागेवर आरएलडीचा उमेदवार निवडणूक लढवत आहे. पिलीभीतमधील उमेदवार जितिन प्रसाद ब्राह्मण आहेत. नगीना ही जागा आरक्षित आहे. मुरादाबाद येथे भाजपाचे एकमेव ठाकूर उमेदवार असलेले सर्वेश सिंह यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. सर्वेश सिंह यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला होता.

राजपूत समुदायाचा राग शांत करण्याचा प्रयत्न

शेजारच्या गाझियाबादमधून माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत या जागेवरून अतुल गर्ग यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु भाजपाने गर्ग यांना उमेदवारी नाकारल्याने हा या भागात राजकीय चर्चेचा मुद्दा ठरत आहे. व्ही. के. सिंह २०१४ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ६१.९३ टक्के आणि ५६.५१ टक्के मतांनी विजयी झाले होते. ठाकूरांचा राग शांत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. योगी आदित्यनाथ यांच्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील १० एप्रिलला सहारनपूर आणि ३ एप्रिलला गाझियाबादमध्ये सभा घेतली होती.

योगी आदित्यनाथ यांच्या रार्धना येथील सभेत जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी ‘बालियान यांना मत द्या’ असे आवाहन केले, तेव्हा अनेकांनी हात हलवून ‘नाही’ असे सूचित केले होते. मागे उभे असलेले काही तरुण म्हणाले, “ही गर्दी बाबांसाठी (योगी आदित्यनाथ) आहे.” बालियान व्यासपीठावर असताना, त्यांनी जमावाची प्रतिक्रिया बघून योगी आदित्यनाथ यांच्याकडे माइक दिला होता. तसेच मंचावर या भागातील ठाकूर चेहरा आणि भाजपाचे दोन वेळा आमदार असलेले संगीत सिंह सोमदेखील उपस्थित होते. राजपूत समाजातील अनेकांचे असे सांगणे आहे की, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सोम यांचा सरधना जागेवरून समाजवादी पक्षाच्या अतुल प्रधान यांच्याकडून धक्कादायक पराभव झाला होता, हे बालियान यांनीच घडवून आणले होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

राहुल शर्मा नावाच्या शेतकऱ्याचा दावा आहे, “सोम हे ठाकूरांचे नेते आहेत आणि बालियान यांना कोणीही त्यांच्या वर जावे असे वाटत नाही.” आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ यांनीही सुरू असलेल्या मतभेदाकडे लक्ष वेधले, “वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून आपल्याला देशाचा विचार करावा लागेल, तुम्हाला फक्त कमळ (भाजपाचे निवडणूक चिन्ह) निवडायचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

खेरा गावातील रहिवासी महेश कुमार म्हणाले, “जेव्हा मी माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी इकडे तिकडे भटकत होतो, तेव्हा मी त्यांच्याकडे (भाजपा) मदतीसाठी गेलो होतो. परंतु, त्यांच्या लोकांनी नकार दिला. बालियान इथे मते मागायला कसे येऊ शकतात?” कुमार सांगतात ते भाजपाऐवजी नोटाला मतदान करतील. पुढे ते म्हणाले, “आमच्या लोकांच्या हक्कांसाठी लढण्याचा इतिहास आहे. त्यांनी (जाटांनी) काय केले आहे?”

मुझफ्फरनगरमध्ये २०१९ च्या निवडणुकीत दोन जाटांमध्ये लढत झाली होती. संजीव बालियान यांनी आरएलडीच्या अजित सिंह यांचा ६,५०० मतांनी पराभव केला होता. आरएलडीने सपा आणि बसपाचे मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही सिंह यांना विजय मिळवता आला नाही. आरएलडी पक्ष आता भाजपाबरोबर आहे. २०१४ मध्ये, मुझफ्फरनगर लोकसभेतून बालियान यांनी ५९ टक्के मते मिळवून चार लाखांपेक्षा जास्त फरकाने विजय मिळवला होता. बसपाचे मुस्लीम कदीर राणा २२.७७ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते, ते आता सपाबरोबर आहेत.

मुझफ्फरनगरमध्ये २०१९ च्या निवडणुकीत दोन जाटांमध्ये लढत झाली होती; ज्यात संजीव बालियान विजयी झाले होते. (छायाचित्र-पीटीआय)

राजपूत समुदायाला समजावण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रयत्न

भाजपाचे मेरठ येथील जिल्हाध्यक्ष शिवकुमार राणा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित केली होती. ते रार्धना गावातील आहेत. राणा म्हणतात की, पक्ष नेतृत्व नेत्यांना सामावून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. “आमचे पश्चिम उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राजपूत आहेत, मी राजपूत आहे, आमचा मुरादाबादचा उमेदवार ठाकूर आहे. मला व्यक्तिशः वाटतं की, आमच्या परिसरातील लोकसंख्या पाहता, अजून एक ठाकूर उमेदवार असू शकतो, पण कधी कधी काही गोष्टीत आपल्याला समाधान मानावं लागतं हेही खरं आहे. याआधी आम्हाला आमच्या संख्येपेक्षा जास्त पदे मिळाली आहेत”, असे राणा यांनी सांगितले. राणा म्हणाले की, ते राजपूत समुदायाशी बोलत आहेत, त्यांच्याशी संवाद प्रस्थापित करत आहेत.

भाजपावरील राजपूत समुदायाच्या नाराजीचा इंडिया आघाडीला फायदा?

काँग्रेसबरोबर युती केलेल्या सपाने मुझफ्फरनगरमधून जाट नेते हरेंद्र सिंह मलिक यांना उमेदवारी दिली आहे. सपाचे मुझफ्फरनगर अध्यक्ष झिया चौधरी म्हणतात की, ते ठाकूरांच्या रागाचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. “मी असे म्हणणार नाही की, सर्व मते आम्हाला मिळतील. परंतु, आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन लोकांशी बोलत आहेत आणि मला आशा आहे की, ४० टक्के ठाकूर आम्हाला मतदान करतील”, असे चौधरी म्हणाले.

मुळात जाट पक्ष असणार्‍या आरएलडीचे म्हणणे आहे की, ठाकूरांच्या नाराजीसाठी भाजपाबरोबरच्या युतीला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे. आरएलडीचे जिल्हाध्यक्ष संदीप मलिक म्हणतात, “सामान्य मतदार आमच्याबरोबर आहेत. ठाकूर आणि जाट एकत्र आहेत. वातावरण बिघडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

हेही वाचा : इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?

परंतु, भरत राणा या स्थानिक तरुणाने समुदायाच्या तक्रारी खऱ्या असल्याचे सांगितले. आम्ही अशिक्षित नाही. आम्हाला आमचे हक्क समजतात, असे तो म्हणाला. जनक सिंह या शेतकर्‍यानेदेखील मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या नसल्याचे सांगितले. आयुष्मान कार्ड घेण्यासाठी ते लाच देऊ शकले नाही, असा दावाही त्यांनी केला. “हा भ्रष्टाचार नाही का? तुम्ही हायवे आणि एक्स्प्रेस वे तयार केले आहेत, पण त्याचे पैसे कोण देत आहेत? दर काही महिन्यांनी टोल टॅक्स वाढवला जात आहे”, असा आरोप त्यांनी केला. जनक म्हणाले, ठाकूरदेखील आता निराश झाले आहेत, कारण ते दीर्घकाळापासून भाजपाचे मूळ मतदार राहिले आहेत. “या भागात अजूनही भाजपा सरकार आहे, पण आमच्याकडे कोणता पर्याय आहे? मोफत रेशन वगळता आम्हाला कोणताही लाभ मिळत नाही”, असे त्यांनी सांगितले.