अरबूल इस्लाम हे पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा जिल्ह्यातील भांगरमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा एक दशकाहून अधिक काळ चेहरा होते. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या इंडियन सेक्युलर फ्रंटच्या (आयएसएफ) कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी गुरुवारी कोलकाता पोलिसांनी अरबूल इस्लाम यांना अटक केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसची ही रणनीती असून पोलिसांची निष्पक्षता आणि विरोधी पक्षांच्या दाव्यांना खोटे ठरवण्यासाठी ही अटक करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयएसएफचा कार्यकर्ता मोहम्मद मोहिद्दीन मोल्ला याची गेल्या जूनमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोल्ला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ब्लॉक विकास कार्यालयात आला, तेव्हा त्याच ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली. भांगर मतदारसंघाचा चेहरा असलेल्या अरबूल इस्लाम यांचा दबदबा या क्षेत्रातून हळूहळू कमी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बंगालमधील मुस्लिम बहुल क्षेत्रात हिंसाचार वाढू लागला आहे. अरबूल यांच्या विरोधातील स्थानिकांच्या संतापाने तृणमूल काँग्रेसला आमदार सौकत मोल्ला यांना पुढे आणण्यास भाग पाडले. कॅनिंग पूरबाचे आमदार मोल्ला हे दक्षिण २४ परगणामधील अल्पसंख्याक समाजातील एक महत्त्वाचे नेते आहेत.

इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ)ने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम-एम) आणि भूसंपादन विरोधी समितीसोबत युती करून भांगरच्या काही भागात तृणमूल विरोधात कडवी झुंझ दिली. भांगर-२ ब्लॉकमधील १० ग्रामपंचायतींमधील २१८ जागांपैकी ८६ जागांवर तृणमूल काँग्रेसने बिनविरोध विजय मिळवला. मतदान झालेल्या १३२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने ६३, आयएसएफ ४३, जोमी जिबिका बस्तुतंत्र पोरीबेश रोका कमिटी १८, सीपीएम-एम ७ आणि एक जागा अपक्षांनी जिंकली.

तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यानुसार, लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना पक्षाला निवडणुका जिंकण्याची संधी आहे. अरबूल यांच्यामुळे ही संधी हातातून जायला नको, अशी पक्षाची अपेक्षा आहे. अरबूल यांना समीकरणातून काढून सौकत मोल्ला यांच्या हातात संपूर्ण भांगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी द्यावी, असे पक्षाने ठरवले. कारण भांगर हा जाधवपूर लोकसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा भाग आहे.

“भांगर हा जाधवपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो, सध्याचे खासदार मिमी चक्रवर्ती यांना भांगरमधून एक लाखाहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. परंतु, गेल्या पंचायत निवडणुकांची स्थिती पाहता परिस्थिती नाजूक असल्याचे पक्षश्रेष्ठींना जाणवले. भांगरचे नेतृत्व सौकत मोल्ला यांनी करावे असे पक्षश्रेष्ठींना वाटते, पण अरबूल असते तर ते अशक्य झाले नसते. यामुळेच त्यांना अटक करण्यात आली असे आम्हाला वाटते,” असे तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

अरबूल यांच्यावरील आरोप

२०१२ मध्ये भांगर कॉलेजमधील एका महिला प्राध्यापकाने अरबूल यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर पाण्याने भरलेला जग फेकल्याचा आरोप होता. या प्रकरणात अरबूल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २०१३ मध्ये अरबूल यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप होता. पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अब्दुर रज्जाक मोल्ला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणार्‍या सीपीआय (एम) समर्थकांची वाहने जाळल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. २०१४ मध्ये पक्षांतर्गत शत्रुत्वात दोन मृत्यू झाल्यामुळे टीएमसीने माजी आमदाराची हकालपट्टी केली. परंतु, दोन वर्षांनंतर त्यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले. मे २०१८ मध्ये, पंचायत निवडणुकीदरम्यान त्यांना आणखी एका हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

अरबूल यांना भांगर विधानसभा निवडणुकीचे तिकीट परत मिळवता आले नाही. २०१६ मध्ये अब्दुर रज्जाक मोल्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. पाच वर्षांनंतर पक्षाने अरबूलपेक्षा सीपीआय (एम) चे दुसरे माजी नेते डॉ. रेझौल करीम यांची निवड केली. यामुळे पक्षांतर्गत वाद सुरू झाले आणि करीम आयएसएफच्या नौशाद सिद्दीकी यांच्याकडून निवडणूक हरले.

भाजपा आणि सीपीआय (एम) ची तृणमूलवर टीका

हेही वाचा : हरियाणात काँग्रेसचे प्रमुख चेहरे लोकसभा यादीतून गायब; १० जागांसाठी काँग्रेसचे २९९ उमेदवार इच्छुक

“मतदानाच्या आधी त्यांना जामिनावर बाहेर काढले जाईल. हे सर्व नियोजनबद्ध आहे. निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच ही अटक करण्यात आली,” असे भाजपाचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. सीपीआय (एम) ने निदर्शनास आणून दिले की, माजी आमदाराला यापूर्वीही अटक करण्यात आली होती आणि टीएमसीमधून काढून टाकण्यात आले होते. परंतु, पुन्हा त्यांना पक्षात घेण्यात आले. “अरबूलसारख्या लोकांना कधी अटक केली जाईल किंवा सोडले जाईल हे सर्व दीदींच्या (ममता बॅनर्जी) इच्छेवर अवलंबून आहे,” असे सीपीआय(एम) नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले. टीएमसीने मात्र असा दावा केला की, पोलिसांनी अटक करून त्यांचा राजधर्म पाळला. ते दोषी आहेत की निर्दोष हे कायदा ठरवेल. परंतु, यावरून हे सिद्ध होते की, पोलिस सत्ताधारी पक्षातील कोणावरही कारवाई करत नाहीत हा विरोधकांचा आरोप खोटा ठरतो, असे सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trunmul congress leader arrested party wont be complaining rac