जी-२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनाकडून सहभोजनाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. मात्र, हे पत्र पाठवत असताना पत्राच्या वरच्या भागात ‘President of India’ च्या जागी ‘President of Bharat’ असा उल्लेख करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला असून भारतीय संघराज्यावर हल्ला होत असल्याची टीका केली. काँग्रेसचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट (आता एक्स) करत म्हटले, "म्हणजे बातमी खरी आहे तर. राष्ट्रपती भवनाने प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत लिहून जी-२० च्या पाहुण्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे." संविधानातील अनुच्छेद १ आता "भारत, अर्थ इंडिया, हा राज्यांचा संघ असेल", असा वाचला जाईल का? असाही प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, आपला देश १४० कोटी जनतेचा मिळून तयार झाला आहे. जर 'इंडिया' आघाडीने आघाडीतले नाव बदलून 'भारत' आघाडी ठेवले, तर मग ते (भाजपा) पुन्हा भारत नाव बदलणार का? राष्ट्रीय जनता दलाचे नेते (RJD) मनोज झा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले, "विरोधकांच्या आघाडीला काही आठवड्यांपूर्वीच 'इंडिया' असे नाव देण्यात आले आहे आणि लगेचच भाजपाकडून रिपब्लिक ऑफ इंडियाच्या ऐवजी रिपब्लिक ऑफ भारत अशा मथळ्याने निमंत्रण पत्रिका पाठवावी लागत आहे. संविधानाच्या अनुच्छेद एकमध्ये "इंडिया, अर्थात भारत" अशी स्पष्ट तरतूद केलेली आहे. तुम्ही आमच्यापासून इंडिया किंवा भारत हिरावून घेऊ शकत नाहीत." दरम्यान, भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांना भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ एएनआयशी बोलताना म्हणाले, "भारत बोलणे किंवा लिहिण्यावर एवढी अडचण का आहे? जयराम रमेश तुम्हाला यात वाईट का वाटते? आपल्या देशाला प्राचीन काळापासून भारत म्हटले जाते आणि संविधानातदेखील याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. विरोधकांकडून विनाकारण संभ्रम निर्माण केला जात आहे." हे वाचा >> ‘इंडिया’चे नाव ‘भारत’ करणे हा संघाचा अजेंडा? चार दिवसांआधी मोहन भागवत काय म्हणाले होते, वाचा चुघ पीटीआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हणाले, "भारत हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. प्रत्येक भारतीयाच्या जनुकामध्ये प्राचीन काळापासून तो अस्तित्त्वात आहे." आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटवर ट्विट करत म्हटले, रिपब्लिक ऑफ भारत. आपली सभ्यता आता अमृत काळाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भारत शब्दावर प्रश्न विचारणाऱ्यांना फटकारले. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आपल्या देशाला भारत असल्याचे तिथे म्हटले आहे. याबाबत कुणालाही शंका नाही. काँग्रेसला मात्र प्रत्येक गोष्टीत अडचण दिसते. त्रिपुरा राज्यातील टिपरा मोथा पक्षाचे नेते प्रद्योत देवबर्मा यांनी ट्विटरवर लिहिले, "भारत या नावाला कसे काय कुणी विरोध करू शकते. आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत की, भारत म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे भारत. आमचे माजी मित्र यांनी काही महिन्यांपूर्वीच 'भारत जोडो यात्रा' काढली होती, निदान त्यांनी तरी भारत या शब्दाला विरोध करू नये. कृपया नकारात्मक राजकारण करू नका, त्याचा भविष्यात तुम्हालाच त्रास होईल. विरोधात असलो म्हणजे प्रत्येक निर्णयाचा विरोधच केला पाहिजे, असे काही नाही." २८ पक्षांच्या भाजपा विरोधी आघाडीने जुलै महिन्यात इंडिया (Indian National Developmental Inclusive Alliance - I.N.D.I.A) असे नाव धारण केल्यानंतर आणखी वाचा >> आपल्या देशाला कसं मिळालं INDIA नाव? हे हटवायचं असेल तर कायदेशीर प्रक्रिया काय? हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले होते. ते म्हणाले, "आमचा सभ्यतेचा संघर्ष इंडिया आणि भारताभोवती फिरत आहे. ब्रिटिशांनी आपल्या देशाला इंडिया हे नाव दिले. वसाहतवादाच्या वारशातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आपल्या पूर्वजांनी भारतासाठी संघर्ष केला आणि आपणही तेच काम भारतासाठी करत राहू. भारतासाठी भाजपा."