संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती सत्तेची हॅटट्रिक साधणार की काँग्रेस बाजी मारणार, भाजपला किती यश मिळणार याचीच उत्सुकता उद्या मतदान होत असलेल्या तेलंगणात आहे. चंद्रशेखर राव यांना सोपी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात अवघड गेल्यानेच ११९ सदस्यीय विधानसभेत ६० चा जादुई आकडा कोण गाठते यावर सत्तेची गणिते ठरणार आहेत.

आंध्र प्रदेशचे विभाजन करून दहा वर्षांपूर्वी तेलंगणा स्वतंत्र राज्य स्थापन झाले. राज्याच्या स्थापनेपासून आधी तेलंगणा राष्ट्र समिती तर नंतर भारत राष्ट्र समिती असे नामकरण झालेला के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष सत्तेत आहे. २०१४ मध्ये ११९ पैकी ६३ जागा जिंकून चंद्रशेखर राव यांनी सत्ता काबीज केली. २०१८ मध्ये (एक वर्ष निवडणूक आधी घेण्यात आली) चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला ११९ पैकी ८८ जागा मिळाल्या होत्या. २०१४ आणि २०१९ दोन्ही वेळा निवडून आलेल्या विरोधी आमदारांना गळाला लावून चंद्रशेखर राव यांनी संख्याबळ वाढविले होते. यंदाही चंद्रशेखर राव यांना सुरुवातीला निवडणूक सोपी वाटत होती. यातूनच त्यांची राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाकांक्षा जागृत झाली. स्वत:च्या पक्षाला राष्ट्रीय ओळख देण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समितीऐवजी भारत राष्ट्र समिती असे नामकरण केले. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह विविध राज्यांचा दौरा करून राष्ट्रीय पातळीवर चाचपणी केली. पण फारसा काही उपयोग झाला नाही.

हेही वाचा… तेलंगणात निवडणुकीच्या धामधुमीत ‘फार्महाऊस’ची चर्चा; केसीआर यांचा ‘फार्महाऊस सीएम’ म्हणून उल्लेख का होतोय?

चंद्रशेखर राव यांनी आधी भाजपशी जुळवून घेतले होते. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्याने अडचणीच्या प्रसंगी भाजपला मदत केली. काँग्रेस कमकुवत झाल्याने तेलंगणात भाजपला संधी दिसू लागली. त्यातूनच भाजपने चंद्रशेखर राव यांची कोंडी करण्यास सुरुवात केली. गेल्या हंगामात तेलंगणातील भात खरेदी करण्यास केंद्राने नकार दिला. तेव्हापासून भाजप आणि चंद्रशेखर राव यांचे चांगलेच बिनसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद दौऱ्याच्या वेळी स्वागताला उपस्थित राहण्याचे चंद्रशेखर राव यांनी चार वेळा टाळले होते. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांच्या विरोधात दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने कारवाई सुरू केली होती. विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका जिंकल्या भाजपला तेलंगणात सत्तेची स्वप्ने पडू लागली. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा झाला. दक्षिण भारतात कर्नाटकनंतर तेलंगणा अशाच घोषणा भाजपकडून दिल्या जाऊ लागल्या. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करून भाजपने स्पष्ट संकेत दिले.

कर्नाटाकील काँग्रेसच्या विजयाने सारे चित्रच बदलले. कमकुवत झालेला काँग्रेस पक्ष अचानक स्पर्धेत आला. राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तेलंगणाचे प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी गटबाजीने पोखरलेल्या पक्षाला एकत्र आणण्यावर भर दिला. त्याचे परिणाम दिसू लागले. शेवटच्या टप्प्यात तर काँग्रेसने जोरदार बाजी मारली. काँग्रेसचा आधी नामोल्लेख टाळणाऱ्या चंद्रशेखर राव यांना प्रचारात काँग्रेसवरच टीका करावी लागली.

हेही वाचा… दारूबंदीचा काय फायदा झाला? जातनिहाय सर्व्हेनंतर बिहार पुन्हा एकदा सर्व्हे घेणार

‘रयतु बंधू’,‘दलित बंधू’ या चंद्रशेखर राव यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांची चर्चा बरीच झाली. पण प्रचारात या योजनेत शेतकऱ्यांना कसे पैसे मिळाले नाही यावर काँग्रेसवर जोर दिला. कर्नाटकप्रमाणे सर्व समाज घटकांना खुश करणारी पाच आश्वासने देण्यात आली व त्याची पहिल्याच मंत्रििमंडळाच्या बैठकीत पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले. काँग्रेस सत्तेत येईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपने आधी हवा तयार केली होती. पण कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने चित्र बदलले. भाजपकडे येणारा नेतेमंडळींचा ओघ काँग्रेसकडे गेला. राज्यभर यात्रा काढून तेलंगणात भाजपला अनुकूल वातावरण तयार करणारे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय यांचे निवडणुकीच्या तोंडावर पंख कापण्यात आले. त्यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. संजय हे चंद्रशेखर राव यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोधैऱ्य खचले. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात लढायचे की मदत करायची याचा संभ्रम निर्माण झाला. आधी भाजप सत्तेच्या जवळ जाईल, असे चित्र रंगविले गेले. पण अखेरच्या टप्प्यात भाजप फार काही झेप घेईल, असे चित्र वाटत नाही. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास भाजपचे महत्त्व वाढू शकते. या दृष्टीनेच भाजपचा प्रयत्न आहे.

हेही वाचा… सत्ताधारी भाजपविषयी जनतेत राग अधिक, युवा संघर्ष यात्रेत आमदार रोहित पवार यांचे निरीक्षण

के. चंद्रशेखर राव यांनी दहा वर्षांत सिंचन क्षेत्रात भरीव काम करीत सिंचनाचे क्षेत्र वाढविले. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. तांदळाचे उत्पादन वाढले. पण चंद्रशेखर राव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. पुत्र रामाराव हे मंत्री असून, तेच सरकारचा कारभार चालवितात, अशी टीका केली जाते. भाचे हरिश राव हे वित्त आणि आरोग्यमंत्री आहेत. मुलगी कविता या लोकसबेला पराभूत झाल्यावर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली. अन्य नात्यागोत्यातील महत्त्वाच्या पदांवर आहेत. भाजप आणि काँग्रेसने चंद्रशेखर राव यांच्या दहा वर्षातील भ्रष्ट कारभार आणि घराणेशाहीवरच आरोप केले आहेत. सरकारच्या विरोधातील नाराजीचा त्यांना फटका बसू शकतो.

एमआयएमचे असाउद्दिन ओवेसी यांचा हैदराबाद हा बालेकिल्ला. शहरातील मुस्लीमबहुल भागातील सात जागांवर गेल्या वेळी एमआयएमने विजय प्राप्त केला होता. यंदा काँग्रेसने एमआयएम समोर आव्हान उभे केले आहे. कर्नाटकात एकगठ्ठा मुस्लीम मते काँग्रेसला मिळाली होती. हैदराबादमध्ये मुस्लीम मतदार कोणती भूमिका घेतात यावर ओवेसी यांचे राजकीय भतिवव्य अवलंबून असेल. भाजपने हैदराबादवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका निवडणुकीतील यशामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजपचे वादग्रस्त विद्यमान आमदार टी. राजा सिंह यांच्यामार्फत भाजपने मतांच्या ध्रूवीकरणाचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा… तमिळनाडूत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण, अखिलेश यादव यांची उपस्थिती; विरोधकांचा ओबीसी राजकारणावर भर!

एकूणच तेलंगणा आधी सोपी वाटणारी निवडणूक मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासाठी आव्हानात्मक ठरली. साम, दाम सारे प्रकार करून सत्तेत कायम राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दक्षिणकडील राज्यात एखाद्या पक्षाच्या बाजूने लाट येते. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात विरोधी वातावरण तयार झाल्यास त्यांना सत्ता कायम राखणे कठीण जाऊ शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will win in telangana assembly election print politics news asj