शिरोमणी अकाली दल (एसएडी) ने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांचे नाव नाही. उमेदवारी मिळण्याबाबत पक्षाने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. परंतु, तरीदेखील त्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. गेल्या काही आठवड्यापासून त्या मतदारसंघातील गावांना भेटी देत आहेत, पक्ष कार्यकर्त्यांबरोबर जेवण करत आहेत आणि लोकांना आश्वासित करत आहेत. हरसिमरत कौर बादल या तीन वेळा शिरोमणी अकाली दल (एसएडी)च्या तिकिटावर भटिंडा येथून निवडून आल्या आहेत. यंदाही पक्ष त्यांना उमेदवारी देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यंदा त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

उमेदवारीबाबत आत्मविश्वास

हरसिमरत कौर बादल यांनी मात्र आपल्या उमेदवारी आणि विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे आणि त्यांनी स्वतःचा ‘सर्वोत्तम उमेदवार’ असा उल्लेख केला आहे. “जनतेसाठी मी नेहमी उपस्थित राहते. मी संसदेत त्यांचे प्रश्न उपस्थित करते. मी त्यांच्यासाठी पक्षातील एका कार्यकर्त्याप्रमाणे काम करते आहे. लोकांना माहीत आहे की, ते माझ्यावर अवलंबून राहू शकतात”, असे त्या सांगतात. माजी केंद्रीय मंत्री आणि भटिंडा येथून मागील तीन वेळा विजयी झालेल्या हरसिमरत पुढे म्हणतात, “मी नेहमी सामान्यांसाठी काम करते. काही लोक केवळ निवडणुकीच्या वेळी दिसतात.”

हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या उमेदवारी आणि विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे. (छायाचित्र-पीटीआय)

हरसिमरत यांना अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली, तरी त्यांचा दिनक्रम एखाद्या उमेदवारासारखा आहे. रविवारी (१४ एप्रिल) आंबेडकर जयंतीनिमित्त मतदारसंघातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. सोमवारी त्यांनी संपूर्ण दिवस जाहीर सभा घेतल्या.

तीन टर्म खासदार

२००९ मध्ये हरसिमरत यांचा तत्कालीन काँग्रेस नेते अमरिंदर सिंह यांचा मुलगा रणिंदर सिंह यांनी एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले त्यांचे मेहुणे मनप्रीत सिंह बादल यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये त्यांनी सध्याचे पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह राजा वॉरिंग यांचा पराभव केला.

भटिंडा येथे चौरंगी लढत

पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १ जूनला एकाच वेळी मतदान होत आहे. भटिंडा येथे चौरंगी लढत रंगणार आहे. निवडणूक रिंगणात उतरल्यास हरसिमरत यांचा सामना काँग्रेसच्या जीत मोहिंदर सिंह सिद्धू यांच्याशी होईल. त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एसएडीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आम आदमी पक्षाने (आप) राज्याचे कृषी मंत्री गुरमित सिंह खुडिया यांना उमेदवारी दिली. भाजपाने अद्याप अधिकृतपणे त्यांच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. परंतु, आतील सूत्रांनी सांगितले की, माजी आयएएस अधिकारी परमपाल कौर सिद्धू यांनी अलीकडेच आपल्या पतीसह पक्षप्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. राजकरणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतल्याचे कळते.

काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत वाद

काँग्रेसच्या सूत्रांचा दावा आहे की, त्यांच्या उमेदवाराला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण पक्षाने वॉरिंग यांच्या पत्नी अमृता यांच्याऐवजी सिद्धू यांना प्राधान्य दिले आहे. “आम्ही आता (भटिंडासाठी) स्पर्धेत नसल्याचे चित्र आहे. जिंकण्याची संधी असतानाही अमृता यांची जागा दुसर्‍याला देण्यात आली आहे. काँग्रेस कमकुवत उमेदवार उभा करून आप आणि एसएडीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.

एसएडीने अद्याप त्यांना उमेदवारी अधिकृतपणे का जाहीर केली नाही यावर हरसिमरत म्हणतात की, हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांचा आहे. ते उमेदवार घोषित करण्यासाठी योग्य वेळ निवडतील. त्यांनी भाजपाच्या संभाव्य उमेदवाराबरोबर कुठलीही स्पर्धा नसल्याचे सांगितले आहे. “लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या नजरेला नजर मिळवत नसतील तेव्हा ते मतदान करा, हे लोकांना कसे पटवून देऊ शकतील?, असे त्या एसएडी नेते आणि पंजाबचे माजी मंत्री सिकंदर सिंह मलूका यांची सून परमपाल कौर यांच्यावर टीका करत म्हणाल्या.

हेही वाचा : बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?

२००९ मध्ये भटिंडातून पहिल्यांदा खासदार झाल्यापासून मतदारसंघात मोठा बदल झाला असल्याचे हरसिमरत यांनी सांगितले. त्यांनी भाजपावर त्यांच्या कामाचे श्रेय घेतल्याचा आरोप केला. “२०२० पासून ते पंजाबला सावत्र आईसारखी वागणूक देत आहेत. एसएडी हा संसदेत पंजाबींचा आवाज उठवणारा पक्ष आहे, तर दिल्लीतील पक्ष (आप आणि काँग्रेस) फक्त त्यांच्या वरिष्ठांचे आदेश पाळतात”, असे त्यांनी सांगितले.