सात वर्षांच्या बालिकेचे अपहरण करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना मावळातील एका गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. खुनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) याला अटक करण्यात आली. खून झालेली बालिका पवन मावळातील एका गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीत शिकत होती. मंगळवारी (२ ऑगस्ट) दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घराच्या परिसरातून बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासास सुरूवात करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते, लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी गावात भेट दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहायकक पोलीस निरीक्षक आकाश पवार, नेताजी गंधारे, बावकर, चौधरी यांनी तपास सुरू केला. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमागे बालिका मृतावस्थेत सापडली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तेजस दळवी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दळवी याने बालिकेचे अपहरण करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर बालिकेचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबतची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखा आणि कामशेत पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून २४ तासात गुन्हा उघडकीस आणला.