महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांनीच माझा पाश्र्वगायनाच्या कारकिर्दीचा प्रारंभ झाला आहे. काव्यातील त्यांच्या शब्दांचे सामथ्र्य, गाणाऱ्या कलाकाराचे शब्दांच्या भावनात ओथंबून निघणारे सूर जणू त्या गीतांतून चित्र डोळ्यासमोर उभे करणारे होते. अशा पर्वाच्या उत्तरार्धात ज्ञान आत्मसात करता आले आणि संगीतामध्ये अल्पसे योगदान देऊ शकले याचा आनंद आहे, अशी भावना व्यक्त करीत ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी सोमवारी आठवणींचा पट उलगडला. गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते सुमन कल्याणपूर यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका बेला शेंडे यांना विद्या प्राज्ञ पुरस्कार आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या यशपाल पाकळ याला गदिमा पारितोषिक देण्यात आले. प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर आणि कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर व्यासपीठावर होते. माझ्या माहेरचे वातावरण भक्तिपरायण होते. आम्ही भावंडं गीतरामायण ऐकण्यासाठी रेडिओभोवती जमत असू. माझ्यासाठी गीतरामायण ही कलाकृती म्हणजे वरदानच होते. अशा सुखद प्रसंगाची या निमित्ताने आठवण होते, असेही सुमन कल्याणपूर यांनी सांगितले. गदिमा यांच्याशी कधी थेट संबंध आला नसला तरी त्यांच्या गाण्यांनी खूप आनंद दिला असे सांगून प्रभा अत्रे म्हणाल्या, मला सुगम संगीत ऐकायला आवडते. विशेषत: स्वरविस्ताराला खूप वाव असल्यामुळे गजल हा काव्यप्रकार आवडतो. गीताचा आशय थेटपणे पोहोचविणारी अर्थपूर्ण शब्दनिवड आणि सौंदर्यपूर्ण बांधणी यामुळे गदिमांची गाणी लोकप्रिय झाली. सुगम संगीत गाणे अजिबात सोपे नाही. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. गदिमांनी भावगीताला एका वेगळ्या वळणावर नेले. पुरस्कारविजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तरार्धात ‘रिमझिम स्वरांची’ हा सुमन कल्याणपूर यांनी गायिलेल्या गदिमा गीतांचा कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानच्या कलाकारांनी सादर केला. प्रा. अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले.