पुणे : केंद्र सरकारने सांख्यिकी विदा जाहीर करणे बंद केले आहे. एकेकाळी जगभरात भारताच्या सांख्यिकीबाबत आदर, विश्वास होता. मात्र आज त्यावर शंका व्यक्त केली जाते. पण सरकारला झपाट्याने विकास, प्रगती होत असल्याचे दाखवण्याची घाई झाली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय अर्थतज्ज्ञ आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनी सरकारवर केली. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगात १४३व्या स्थानी असलेला भारत २०४७ मध्ये विकसित राष्ट्र कसा होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे ‘नव्या भारताची राजकीय अर्थव्यवस्था’ या विषयावर आयोजित व्याख्यानावेळी डॉ. प्रभाकर बोलत होते. डॉ. प्रभाकर हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आहेत. देशातील बेरोजगारी, महागाई, नागरिकांनी देश सोडणे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संबंध अशा मुद्द्यांवर विविध उदाहरणे देत त्यांनी भाष्य केले. डॉ. प्रभाकर म्हणाले, की देशात रोजगाराची स्थिती गंभीर आहे. रेल्वेने बिगर तांत्रिक नोकऱ्यांच्या ३५ हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला १ कोटी २५ लाख तरुणांनी अर्ज केला होता. डाळी, भाज्या, मसाले, दूध अशा अन्नधान्याचे दर प्रचंड वाढले आहेत. देशातील महागाई, बेरोजगारी, मणिपूरमध्ये काय घडते आहे, या पेक्षा नागरिकांनी आपल्या आकांक्षा मोठ्या ठेवाव्यात असे सरकारला वाटते. २०१४मध्ये १ लाख २९ हजार भारतीयांनी देश सोडला होता, तर २०२२मध्ये २ लाख २५ हजार भारतीयांनी देश सोडला. ग्रामीण भागातील स्थिती गंभीर आहे. सरकारने उद्योगांची कर्जे निर्लेखित केली, कॉर्पोरेट कर कमी केला, उद्योगांना विनवण्या करूनही देशांतर्गत गुंतवणूक वाढत असल्याचे दिसत नाही. गेल्या आर्थिक वर्षात मनरेगासाठी केलेली तरतूद सहा महिन्यांतच संपली होती.

हेही वाचा >>>जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध चांगले नाहीत. केंद्र सरकारने अधिमूल्य, अधिभार लावून ४० लाख कोटी रुपये मिळवले. राज्य सरकारने पारित केलेली विधेयके राज्यपाल मंजूर करत नाहीत. संघराज्य व्यवस्था म्हणून पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री हे एक चमू म्हणून दिसत नाहीत. आताचे दिवस परिवाराचे आहेत, असा टोला त्यांनी हाणला. जी २०मध्ये वसुधैव कुटुम्बकम् ही संकल्पना होती. अवघे जग माझे घर म्हणताना आपल्याच देशातील मणिपूर आपले नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

नव्या भारताला प्राचीन करण्याचा प्रयत्न

वसुधैव कुटुम्बकमचा संदर्भ महोपनिषद या दुय्यम उपनिषदात आहे. संस्कृतमध्ये बोलून लोकांना सहज मूर्ख बनवता येते. संस्कृतमधील सारे काही हजार वर्षांपूर्वीचे किंवा प्राचीन नसते. पण आता यावर विश्वास ठेवायला लावला जात आहे. नव्या भारताला प्राचीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा कठोर शब्दांत प्रभाकर यांनी टीका केली.

राजकीय कथन बदलले…

देशातील राजकीय कथन मुलभूतरित्या बदलले आहे. पूर्वी प्रत्येक पक्ष आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, पण त्यांच्यासारखे नाही असे म्हणायचा. पण आता प्रत्येक पक्ष आम्ही हिंदू आहोत, पण त्यांच्यासारखे नाही असे म्हणतो. हा बदल हळूहळू घडला आहे. त्यासाठी वर्षानुवर्षं अत्यंत शांतपणे, कोणत्याही प्रसिद्धिविना काम करून हा बदल घडवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.