पुणे : आतापर्यंत शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे निश्चित केली जात होती. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच गृहनिर्माण सोसायटयांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे शहर, मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर येथील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहरी भागात मतदानाचा टक्का कमी असतो. महानगरांमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. या ठिकाणचे मतदान वाढावे, या मतदारांना घराजवळच मतदान केंद्र असल्यास ते मतदान करतील, या आशेने केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे, मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर येथे सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपक्रम, योजना, स्पर्धा, कल्पना राबविल्या जातात. तसेच मतदानाच्या दिवशी घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आत मतदान केंद्र निश्चित करून मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, शहरी मतदारांकडून मतदानाच्या दिवशी निरूत्साह दिसून येतो. सुशिक्षित मतदार मतदानाच्या दिवशी सुटी असल्याने बाहेर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>>माजी खासदार नीलेश राणेंचे हॉटेल महापालिकेकडून लाखबंद; ३ कोटी ७७ लाखांचा मिळकतकर थकीत

याबाबत बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘पुणे, मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांमध्ये मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच मतदान करण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. साधारणपणे एक हजारापेक्षा जास्त सदस्यसंख्या असणाऱ्या सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. राज्यात अशा प्रकारची १५० मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामध्ये मुंबईत ६१, पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी ३६, तर मुंबई उपनगरात १७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणच्या सोसायट्यांमधील सदस्यांना जागेवर मतदान करता येणार आहे.