भाजप केंद्रीय यंत्रणांद्वारे दबाव आणून अनेक पक्षांतील नेत्यांना नमवत असताना उद्धव ठाकरे मात्र या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात ठामपणे उभे ठाकले. त्यामुळे आलेल्या विमनस्कतेतून त्यांच्यावर टीका केली जात आहे, असा दावा करत ‘हा पराभवापूर्वीचा आकांत!’ या ‘पहिली बाजू’चा (लोकसत्ता २१ मे) प्रतिवाद करणारा लेख…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अॅड. हर्षल प्रधान, प्रवक्ता आणि जनसंपर्क प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

काही व्यक्ती सवंग लोकप्रियता मिळू लागली की स्वमग्न होऊ लागतात. हळूहळू त्यांची अवस्था मनोरुग्णतेकडे झुकू लागते. सोप्या मराठीत यास अहंगंडाने पछाडलेला किंवा स्वमग्न खुशमस्कारा असे म्हणतात आणि सोप्या इंग्रजीत सायको असे म्हणतात. भाजपत अलीकडे अशी व्यक्तिमत्त्वे पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल टीका करणाऱ्या भाजपमधील या व्यक्ती सध्या या सायको अवस्थेत पाहायला मिळत आहेत. आपल्या बलाढ्य पराभवाचा आर्त स्वर त्यांच्या बाळबोध वागण्या-बोलण्यातून विचारांतून-लिहिण्यातून आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निष्ठावान शिवसैनिकांनी एका शक्तिशाली, उर्मट स्वमग्न नेतृत्वाच्या नाकी नऊ आणले. त्यामुळे बाळबोध व्यक्तींकडे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक दुर्लक्ष करतात आणि त्यांना त्यांच्या मनोरुग्ण विमनस्क अवस्थेतून लवकर मुक्ती मिळो अशी प्रार्थना करतात.

पराभवाच्या भीतीने मानसिक आजार

अमर्याद सत्ता उपभोगल्यानंतर अकस्मात ती हातून निसटू लागली की त्याचे दु:ख सहन होत नाही आणि मग ती जाऊ नये म्हणून दुसऱ्याला दोष देणे, इतरांच्या नेत्यांवर टीका करणे असे प्रकार सुरू होतात. यालाच मानसिक असंतुलन असे संबोधले जाते. कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजाराने पीडित रुग्णास मनोरुग्ण असेही म्हणतात. गंभीर मानसिक आजार फक्त एक टक्का लोकांना जडत असले, तरीही संशोधन असे सूचित करते की आपल्यापैकी जवळपास ३० टक्के व्यक्तींत काही प्रमाणात मानसिक समस्या असतात. अशा व्यक्तींमध्ये सहानुभूती, पश्चात्तापाच्या भावनेचा अभाव आणि काही वेळा आक्रमक किंवा हिंसक वर्तन, खोटे बोलणे, अनुभवातून शिकण्यात अपयश अशा प्रवृत्ती दिसून येतात. भाजपच्या आणि संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्टाने आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून भाजपला सत्तेपर्यंत नेले. मात्र यामुळे एखाद्यात सत्तेचा अहंगंड निर्माण होईल, त्याच्या भोवती केवळ स्तुतिपाठक निर्माण होतील आणि आपल्याच आश्वासनांना हरताळ फासतील असे कोणाला वाटले नसावे.

हेही वाचा >>>सुनील छेत्री आम्हाला समजलाच नाही…

खोटारडे की विसरभोळे?

भाजपचे कार्यकर्ते त्यांनीच २०१४ पूर्वी दिलेली आश्वासने विसरले आहेत का, असा प्रश्न पडतो. वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, चीनबाबतचे धोरण, महागाई, अर्थव्यवस्था, पेट्रोल डिझेल दर स्थिर ठेवणे यासंदर्भातील कुठलेही आश्वासन पूर्ण करणे भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला शक्य झालेले नाही. स्वत:ची प्रतिमा उंचावणे, भाजप प्रत्येक ठिकाणी सत्तेत कसा येईल एवढेच उद्दिष्ट समोर ठेवून निर्णय घेणे आणि त्यासाठी केंद्रीय यंत्रणा कामाला लावणे, असे प्रकार सुरू आहेत.

नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था अस्थिर करण्यास मोदींनी आणि भाजप सरकारने हातभार लावला. नोटाबंदी म्हणजे देशभक्ती असा भास निर्माण केला गेला. मला ५० दिवस द्या त्यानंतर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, अशी स्वत:बाबत अतिआत्मविश्वास व्यक्त करणारी वक्तव्ये केली गेली. कालांतराने अनेक तज्ज्ञांनी नोटबंदीचे दुष्परिणाम दाखवून दिले. रोजगारांचा दुष्काळ पडला, अर्थव्यवस्था डबघाईस आली. काळापैसा, दहशतवाद काहीच संपला नाही. नोटाबंदीचा निर्णय हा केवळ अर्थव्यवस्थेस मारक ठरण्यापुरता सीमित राहिला नाही, तर रांगेत उभ्या असलेल्या मध्यमवर्गीयांच्याही जिवावर उठला. उद्याोगपतींच्या उद्याोगांना मारक ठरला, तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवणारा ठरला. भाजपचे कार्यकर्ते हे जाणून आहेत. त्यांना याचा विसर पडलेला नाही. त्यांची अवस्था अडकित्त्यातील सुपारीसारखी झाली आहे. बोलघेवडे काही कामाचे नसतात. देशाला आणि राज्याला अगदी घरालाही अर्थव्यवस्थेचे योग्य नियोजन करणारा प्रमुख मिळणे गरजेचे असते.

उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपप्रचार

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हुकूमशाहीकडे चाललेल्या आणि देशाला अराजकाकडे नेणाऱ्या मोदी- शाह आणि त्यांच्या अतिबलाढ्य भाजपला खडे बोल सुनावले. २०१४ पासून २०२४पर्यंत उद्धव ठाकरे हे एकमेव नेते होते, जे भाजपच्या या सत्तांध नेतृत्वाच्या उधळलेल्या वारूवर अंकुश ठेवून सतत जाब विचारत होते. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या एकाधिकारशाहीला जर कोणी न डगमगता सुरुंग लावला असेल तर ते केवळ उद्धव ठाकरे हेच होते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सत्य पटत होते मात्र त्यांच्या पक्षात त्यांनाच कोणी विचारेनासे झाले आहे. त्यांच्यात आपापसात भांडणे लावून एकमेकांकरवी काटा काढण्याचे कपट कारस्थानही भाजपच्याच शीर्षस्थ नेत्यांकडून केले गेले. त्यामुळे जो महाराष्ट्र भाजपच्या प्रमोद महाजन – गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे ओळखला जायचा तो आता मोदी-शहांच्या कार्यकाळात गडकरी, खडसे, दानवे यांच्यासारख्या अडगळीत पडलेल्या नेत्यांचा, तर कधी फडणवीस, गिरीश महाजन, तावडे यांच्यासारख्या नाममात्र आसनस्थ नेत्यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला.

हेही वाचा >>>राजकीय संस्कृती जपणे निवडणूक जिंकण्याएवढेच महत्त्वाचे!

मोदी- शाह यांनी महाराष्ट्रावर सतत अन्याय केला. उद्याोग पळवले, निधीची सतत अडचण निर्माण केली, करदहशतवाद निर्माण करून महाराष्ट्रातील संपत्ती ओरबाडण्याचे गुजरातला पळवण्याचे उद्याोग केले मात्र भाजपचे हे सर्व नेते अळी मिळी गुपचिळी करून बघत राहिले. या संपूर्ण कालावधीत एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मोदी- शाह यांना ठाम विरोध करत राहिले. माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर मी तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हीच गर्जना करत राहिले. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची इतकी वाताहत केली की त्यांना सतत महाराष्ट्रदर्शन करत फिरावे लागले. उद्धव ठाकरे यांचे सर्व विरोधक महायुतीत एकत्र आले आहेत. तरीही मोदी- शाह यांना सतत उद्धव ठाकरे हेच एकमेव विरोधक म्हणून दिसत होते. मोदींनी तर त्यांना ‘नकली संतान’ म्हणण्यापर्यंत मजल मारली. त्यामुळेच उद्धव ठाकरे संघाच्या आणि भाजपच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सतत विचारत होते तुम्हाला हे पटते आहे का, आज जर बाळासाहेबांच्या मुलाला हे नकली संतान म्हणतात तर उद्या तुमची काय अवस्था करतील? भाजप संघाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनाही हे पटले आहे. ज्या मोदींमुळे भाजपला सर्वोच्च विजय मिळाला होता त्याच मोदींमुळे आता आपल्याला सर्वोच्च पराजयही अनुभवावा लागणार आहे याची खात्री पटली. लोकसभेच्या देशातील पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या बलाढ्य पराभवाला सामोरे जात असताना काहींचा तोल ढळू लागला आहे. त्यांची अवस्था मनोरुग्ण स्थितीकडून ‘नमोरुग्ण’ स्थितीपर्यंत पोहोचली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार म्हणून काय विचार करावा याबाबत कुणी प्रभावीपणे भूमिका मांडत असेल व संविधानातील विचारच त्याचा आधार असेल तर त्याचा प्रचंड त्रास भाजपला होणे साहजिक आहे. हिंदुत्व ही जर एक जीवनपद्धती असेल तर मतदारांच्या जगण्याचे प्रश्न तडफेने मांडणे आणि प्रत्येक माणूस प्रतिष्ठेने जगण्यास सारखाच पात्र आहे हे सांगणे अयोग्य आहे, असे कुणी म्हणत असेल तर त्यांचे राजकारण लोकविरोधी आहे हा बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा पक्का विचार आहे. धर्म महत्त्वाचा आहेच, पण जगण्याचे प्राधान्यक्रम विसरून राजकारण करणे हे धार्मिक पातक आहे याची जाणीवच भाजपने सोडून दिल्याने उद्धव ठाकरे यांचे जनतेच्या भल्यासाठी केलेले आक्रंदन त्यांना अडचणीचे वाटणे साहजिक आहे. लोकांना आपला मुद्दा प्रभावीपणे समजावून सांगणे ही कॉग्निटिव्ह थेअरी राजकारणात सगळेच जण वापरतात. पण त्या थेअरीचा अत्यंत नकारात्मक वापर केला जात आहे.

दोन उदाहरणे घेऊया ‘५० वर्षे कुणी मंदिर बांधले नाही ते आम्ही बांधले’ असे मिरवणे पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर ते बांधण्याचा मार्ग मोकळा झाला हे न सांगणे या अर्धवटपणामधून जो उद्देश साध्य करायचा आहे तो नकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचा प्रकार आहे. दुसरे काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, असा धोशा लावणे हा कॉग्निटिव्ह थेरपीचा गैरवापर आहे. हे सारे आजच्या महागाई, बेरोजगारीकडे लक्ष वळू न देण्यासाठी केले जात आहे. खऱ्या प्रश्नांची उत्तरे भाजपचा कोणताही नेता देत नाही. उद्धव ठाकरे यांनी कॉग्निटिव्ह थेरपीचा सकारात्मक वापर केला आणि भाजपने स्वत:ला नकारात्मकतेत अडकविले इतकाच फरक आहे. खरे मोदी- शाह केवळ नकारात्मक विचार करणारे आहेत. त्यांना सध्या पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्या बेताल वक्तव्यावरून दिसते. मतदारांना प्रभावित करणे (पर्स्युएशन) आणि मतदारांच्या त्यांच्या तर्कबुद्धीवर ताबा मिळवणे (मॅन्युप्युलेशन) यात मूलभूत फरक आहे.

मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे व एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्रीपदी बसविणे लोकांना पटलेले नाही. त्यामुळेच दुर्बुद्धीने राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस व संविधानिक अनैतिकता वाढविणारे मोदी-शाह यांचा निवडणूक निकालापूर्वीच पराभव झाला आहे. माध्यमे सत्तेहाती केंद्री झालेली असताना एखाद्या राजकीय पक्षाने केवळ त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर जर जनतेचा प्रतिसाद आपल्या बाजूने वळविला असेल तर भाजपला महाराष्ट्रात निराधार वाटणे ही सत्तांतराची नांदी आहे.

उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचा सामाजिक विचार व बाळासाहेबांची आग्रही मांडणी यांची कालानुरूप सांगड घातली आहे. यात लोकशाहीभिमुख परिपक्वता दिसते. महाराष्ट्रातील भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, तुकारामाचा आहे आणि कट्टरतावादी भगवा ही वेगळीच संस्कृती आहे हे आता राज्यातील जनतेला कळले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची बाजू एवढ्या प्रभावीपणे मांडली आहे की भाजपच्या सगळ्या थेअरी स्पेशल अपयशी ठरल्या आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp uddhav thackeray against this authoritarian tendency article amy