देवनुर महादेव

काही गोष्टी मनात घर करून राहतात. त्यातलंच हे एक टिपण, मनाला सुखवणारं. पंजू गांगुली यांनी लिहिलेलं. ’देवांची तपासणी आणि डॉ. खान नावाची एक मुस्लिम देवता’ या नावाचं हृदयस्पर्शी टिपण. हे आहे छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील शेकडो आदिवासी समुदायांंच्यात रूढ असलेल्या दोन सोहळ्यांचं. त्यातून व्यक्त होणारी न्यारी धार्मिकता धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे घेऊन जाणारी आहे. आणि खुद्द देवांचे मूल्यमापन करणारी जाणीव त्यातून दिसते. या दोन सोहळ्यांची गोष्ट मला उद्बोधक वाटली. साक्षात्कार व्हावा तसं जाणवलं की यांच्यात आपलं जग उजळून टाकण्याची क्षमता आहे.

तर कथा अशी आहे: बस्तर जिल्ह्यातील विविध आदिवासी समुदायांमध्ये बंगारामदेवीला एक प्रमुख देवता मानण्यात येते. वर्षातून एकदा तिच्या स्थानी ‘भादो जत्रा’ नावाचा उत्सव भरतो. त्या दिवशी, २४० हून अधिक गावांतले आदिवासी समुदाय त्यांच्या त्यांच्या देवांना सोबत घेऊन बंगारामदेवीच्या पायापाशी आणतात. बंगारामदेवीच्या उपस्थितीत पुजारी या देवांची परीक्षा घेतात. देवांनी वर्षभरात आपल्या भक्तांच्या बरोबर केलेला व्यवहार तपासला जातो. देवांनी त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत आणि त्यांचं निराकरण केलेलं नाही असं आढळलं तर दैवी शक्तीच्या परीक्षेत नापास झालेल्या देवांचं देवत्व हिरावून घेतलं जातं. ते लाकडाचे आणि दगडाचे निव्वळ पुतळे ठरतात. या नापास देवांच्या मूर्ती मग बंगारामदेवीच्या मंदिराच्या मागल्या अंगणात नेल्या जातात आणि कोपऱ्यातल्या एका ढिगाऱ्यावर टाकून दिल्या जातात. देवत्व हरण झालेल्या त्या मूर्ती वाऱ्याचा, पावसाचा, थंडीचा आणि सूर्याच्या प्रखर उन्हाचा तडाखा सहन करत इथेतिथे पडून राहतात. त्यातले काही देव कागदाच्या कपट्यासारखे झुडुपांमध्ये अडकलेले सापडतात. काही दगड गोट्यात जुन्या झाडांच्या बुंध्यांना टेकलेले आढळतात.

हेही वाचा : फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

दुसऱ्या सोहळ्याची एक वेगळीच मनोरंजक गोष्ट आहे: बस्तरच्या केशकल टेकडीच्या शिखरावर, एक लहान मंदिर आहे. तिथे एक मातीच्या गिलाव्याचा चौथरा आहे. या चौथऱ्यावर शिवलिंगासाख्या आकाराच्या काळ्या लाकडी तुकड्याची स्थापना करण्यात आली आहे. त्या शिवलिंगसदृश तुकड्याच्या बाजूला एक मातीचा दिवा लावलेला असतो. या ठिकाणी भरणाऱ्या ‘सुरडोंगर’ जत्रेच्या वेळी मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि आसपासच्या जमातींमधले हजारो लोक या देवांचं दर्शन घेण्यासाठी येतात. असंही मानलं जातं या देवाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी, इतर देवही येतात. या देवाचं नाव आहे – डॉ. खान.

सुमारे २०० वर्षांपूर्वी, जेव्हा बस्तरमध्ये कॉलरा आणि देवीसारख्या संसर्गजन्य रोगांच्या साथी फैलावल्या होत्या तेव्हा डॉ. खान नावाचे एक मुस्लिम डॉक्टर इथे आले आणि त्यांनी अनेक लोकांना मृत्यूच्या तावडीतून वाचवलं. साथ ओसरल्यावर डॉ. खान तिथेच राहिले आणि त्यांनी परिसरातील जनतेची सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर, स्थानिक आदिवासींनी त्यांना देवपण बहाल केलं आणि या डॉ. खान देवाची पूजा सुरू झाली. अशा एकच नव्हे तर कितीतरी गोष्टी इथे आपल्याकडे आढळतात. आपल्याच देशात, आपल्याच भूमीत.

पण आपण आपल्या देवांचं मूल्यमापन करू शकतो, करावं अशी जाणीव तरी आपल्यात आहे का? देवांचं सोडा, आपणच मतदान करून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचंदेखील मूल्यमापन आपण करत नाही. त्यांना पास वा नापास ठरवणं तर दूरच राहिलं. अशा परिस्थितीत आपल्या समस्या त्यांच्याकडून सोडवल्या जातील अशी अपेक्षा तरी आपण कशी काय करू शकतो? आदिवासी समुदाय हे मुळात आपणा सर्व मनुष्यमात्रांचे पृथ्वीवरील शेष पूर्वज आहेत. त्यांच्यामध्ये आजदेखील देवांची परीक्षा घेऊन, नापास झलेल्या देवांना टाकून देण्याची जाणीव आहे. पण त्याच आदिवासींचे वंशज असलेले आपण मात्र अंधश्रद्धाळू झालो आहोत. आपली आपल्या मूळ आदिवासी पूर्वजांशी जोडणारी मुळं आपणच तोडून टाकलेली आहेत. समुदाय म्हणून आपण आपली जागरूकता हरवून बसलो आहोत. त्यामुळे पूर्वजांच्या आजही प्रस्तुत असणाऱ्या उत्तम पद्धती जतन करण्यात, वृद्धिंगत करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत.

हेही वाचा : माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…

निदान आता तरी आपण जागरूक झालं पाहिजे. सजग होऊन मतदारांच्या पायावर घालून आपल्या विद्यमान लोकप्रतिनिधींचं मूल्यमापन लोकशाहीच्या पुजाऱ्यांनी करायला हवं. जर असा पंचनामा केला, घडला तर माझी खात्री आहे की आपल्याला किमान ९०% खासदारांना संसदेतून बाहेर काढावं लागेल. आपण सावध राहायला हवं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. आगामी निवडणुकीत मूल्यमापनाची ही पंचायत आपण बसवायला हवी.

आपल्या लोकशाहीचा हा पंचनामा करताना सर्व गोष्टींची तपासणी केली पाहिजे. लोकशाही स्वातंत्र्याची मूल्यं कितपत रुजलीयत; लोकशाहीचं आरोग्य कसं आहे; न्यायव्यवस्था कशी काम करतेय; आपल्या स्वायत्त संस्थांचं सार्वभौमत्व टिकून आहे का; सत्ताधारी केंद्राकडून संघराज्याची रचना कमकुवत तर होत नाहीय ना; सामाजिक न्याय मिळतो आहे का; महिला आरक्षणाच्या नुसत्याच घोषणा होतायत की ते प्रत्यक्षात येतंय; स्वामिनाथन अहवाल अमलात आणला जातोय का; शिक्षण, आरोग्य, रोजगार… सर्वच गोष्टी तपासून घ्यायला हव्यात. जरा डोळे उघडून पंतप्रधानांची ज्यांच्यावर विशेष मेहरबानी आहे त्या भांडवलदारांच्या संपत्तीचा लेखाजोखा घेतला पाहिजे. कोविड-१९ च्या अनिश्चित काळातही ती अनेक पटीने वाढलेली आपल्याला दिसले. त्यांचे खिसे भरलेत ते त्यांना सुपूर्द केल्या गेलेल्या आपल्या मौल्यवान नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे. आणि सर्वसामान्यांचं कंबरडं ज्याने मोडलंय त्या महागाई आणि वाढत्या किमतींमुळे. ही धोरणं, हे घोटाळे, हा सारा गोलमाल थांबला पाहिजे, तरच भारत वाचेल. नाहीतर काही खरं नाही.

आपलं पुढचं पाऊल आता हे असलं पाहिजे… आगामी निवडणूक लढवणारे पक्ष आणि उमेदवार मतांसाठी आपल्याकडे मत मागायला येतील तेव्हा आपण त्यांना सांगितलं पाहिजे, “आम्ही तुमच्या शब्दांचं तसंच तुमच्या कृतींचंही मूल्यमापन करणार आहोत. तुमची पोकळ घोषणाबाजी, थापेबाजी आम्ही यापुढे चालवून घेणार नाही.” आपण खरोखर असा इशारा देऊ शकलो तर काही पावलं का होईना, देश पुढे जाऊ शकतो. आपल्यावर चालवल्या जाणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांचा प्रभावातून आपण बाहेर पडणं फार गरजेचं आहे. ही विविध शस्त्रास्त्रं आपल्यला ओळखता आली पाहिजेत – संमोहनास्त्र (सामूहिक संमोहनाचे हत्यार), द्वेषास्त्र (द्वेषाचे हत्यार), असहिष्णुतास्त्र (असहिष्णुतेचे हत्यार), व सर्वात मोठे भ्रमास्त्र (भ्रम पसरवून खरे-खोटे कळू न देणारे हत्यार). सत्ताधारी ही सर्व अस्त्रं आपण आपले खरे प्रश्न विसरून त्यांच्यासमोर मान तुकवून, डोळे झाकून त्यांना मान्यत द्यावी म्हणून वापरत आहेत. या फसव्या अस्त्रांच्या प्रभावापासून आपण स्वत:ची सुटका करून घ्यायला हवी. तरच आपल्याला वास्तवातील समस्यांनी गर्भगळित न होता आपण आपल्या प्रतिनिधींचे योग्य मूल्यमापन करू शकू.

हेही वाचा : स्वामी स्मरणानंद यांचे अनंत प्रस्थान

सर्वप्रथम, आपल्याला आपली फसवणूक करणारं, आपल्याला जाणूनबुजून भ्रमित करणारं हे भ्रमजाल ओळखलं पाहिजे. उदाहरण घ्यायचे झाल तर हिंदुत्वाचा बिगुल पद्धतशीरपणे वाजवला जातोय. आता ‘हिंदू’ या संकल्पनेवर ‘हिंदुत्व’ ही संकल्पना स्वार होताना दिसत आहे. उदाहरणार्थ: आपण सर्रास वापरत असलेला ‘मी’ हा शब्द. आपल्या स्वतःच्या ओळखीसाठी आवश्यक असलेलं द्योतक आहे. पण ‘मी-पण’ म्हणजे काय? द्योतकाच्या पलीकडे जाऊन ते माझं स्वत्व मानलं तर त्यातून इतरांवर प्रभुत्व गाजवू इच्छिणारं माझं मी-पण अशी आत्मसंतुष्ट अहंभावना त्यातून व्यक्त होते. त्याचप्रमाणे ‘हिंदू’ आणि ‘हिंदुस्थानी’ हे शब्द ओळख देणारे, ओळख पटवणारे द्योतक शब्द आहेत. पण चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे हिंदुत्व कशाचं द्योतक आहे? हे ‘मी-पणा’च्या अहंभावासारखीच एक विनाशकारी, अतिरेकी शक्ती आहे. ती शक्ती आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे फक्त ‘मी, माझे आणि स्वतःचे’ उरते – बाकी काहीच नाही. पण आपल्या पुराणांनी, इतिहासाने आणि महाकाव्यांनी दाखविल्याप्रमाणे, जिथे हे ‘मी-पण’, हा अहंभाव मर्यादा ओलांडतो, त्याचे गर्वात रूपांतर होतं, सर्व जगाला मी तुच्छ लेखू लागतो, तेव्हा प्रत्येक वेळेला त्याचे गर्वहरण होते. भीमाला त्याच्या सामर्थ्याबद्दल ‘ग’ ची बाधा झाली तेव्हा तो हनुमानाची शेपूटही हलवू शकला नाही. अती तेथे माती ही आपली शिकवण. ती सांगत असते की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट मर्यादा ओलांडते तेव्हा तिचा शेवट अटळ असतो. आणि ही संकल्पना भारताच्या सामूहिक चेतनेचा, जाणिवेचा अंगभूत स्वभाव विशेष आहे.

आता हल्ली ‘सनातन’ या कल्पनेचा प्रसार केला जातोय. त्यामुळे समाजाला जडत्व आलंय. अशा प्रसार व प्रचाराने सामाजिक सामंजस्याचं पाणी गढूळलंय. तो झालेला गाळ कोणी बसूच देत नाहीय. पण सनातन म्हणजे आहे तरी काय? ती आपल्यासोबत प्राचीन काळापासून आजपर्यंत प्रवास करत आलेली मूल्यं आहेत. त्यात चांगली आणि सदोष दोन्ही प्रकारची मूल्यं आहेत. आता बस्तरच्या समुदायांमध्ये आजही प्रस्तुत असणारी देवांची तपासणी करण्याची मूल्यं आहेत. पण त्यांची सगळीच मूल्यं चांगली असतील असं नाही. त्यामध्ये देखील काही सदोष मूल्यं असू शकतील. अशा परिस्थितीत जर कोणी ‘माझाच सनातन धर्म स्वीकारा’ असं म्हणत असतील, असा प्रचार करत असतील त्याचा सरळ अर्थ हाच असतो की डोळे मिटून माझ्या सदोष मूल्यांचाही स्वीकार करा.

तथापि, आपण जी सनातनी मूल्यं माणुसकीची आणि निरोगी असतील ती स्वीकरून रुजवायला हवीत आणि जी सदोष आहेत ती टाकून द्यायला हवीत. त्यात प्रादुर्भाव झालेल्या दोषांपासून स्वतःला मुक्त करायला पाहिजे. उदाहरणार्थ करुणा, संयम, प्रेम, सहअस्तित्व, समन्याय, किंवा ‘इतरांनी तुमच्याशी जसे वागले पाहिजे तसे तुम्ही त्यांच्यशी वागा’ या म्हणीमागे दडलेली ही सारी सनातन मूल्यं आजही आपली वाट उजळून टाकणारी आहेत. पण त्यांच्यासोबत त्याच नावाखाली चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातिभेद, असहिष्णुता, द्वेष, सनातन धर्माच्या रक्षणाच्या नावाखाली खून करणे ही सदोष मूल्यंदेखील आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. पण ही वणवा पेटवणारी आगलावी, भस्मासुरी मूल्यं आहेत. आज या चांगल्या सनातन मूल्यांमध्येे आणि या अगोचर, भस्मासुरी मूल्यांमध्ये सातत्याने संघर्ष चालू आहे. या संघर्षात गुंतलेल्यांना आपल्या निवडलेल्या लोकप्रतिनिधींचं मूल्यमापन करण्याचं भान, त्याची जाणीव नाहीय. तसं असलं तरी माझा दृढ विश्वास आहे की आपल्या देशाच्या जनतेतील सामूहिक चेतना आणि प्रेरणा आपल्याला कडेलोटापासून माघाारी आणून वाचवतील. आपल्या पिकांच्या आरोग्यासाठी आपल्या जमिनीतील गवताचे तण काढून टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगी असणाऱ्या शहाणपणाची आपल्याला गरज आहे.

हेही वाचा : निर्जळगावातलं निसर्गबेट

काही दिवसापूर्वी भारताने अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाचा उत्सव साजरा केला. या उद्घाटनाच्या सोहळ्याऐवजी खरं तर रामाची जी वचन पाळण्याबद्दलची बांधिलकी होती, ध्यास होता त्याची आवश्यकता होती. वचनपूर्ती करणाऱ्या रामाची वचनबद्धाता साजरी करायला हवी होती. दिलेल्या वचनांचा सन्मान करायला हवा होता. पण, हा वचनपूर्तीचा ध्यास रामाच्या, रामभक्तांच्या या भूमीत शोधूनदेखील सापडत नाही. उलट अन्य भागातली काही राममंदिरं ही जुगाराचे अड्डे बनली आहेत. निदान आजच्या वातावरणात रुजलेल्या जुगाराच्या राजकारणाचा संसर्ग राममंदिराला व्हायला नको होता.

असं म्हटलं जातं की रामाच्या राजवाड्याबाहेर एक “न्यायाची घंटा” टांगलेली होती. एके दिवशी, एक घोडा घंटा वाजवताना आढळला आणि रामाने त्या भुकेल्या घोड्याला न्याय दिला होता. आज भारतातील जनतेला या देशाचे नेतृत्व करण्यासाठी डोळे, कान आणि हृदय असलेल्या रामासारख्या निष्पक्ष माणसाची गरज आहे, आणि तेही लवकरात लवकर. आज प्राण प्रतिष्ठापना झालेल्या अयोध्येतील राममंदिराबाहेरही अशीच एक न्यायाची घंटा असू दे. न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या जित्याजागत्या माणसांना वाजवता येईल अशी. पण रामाची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या दिल्ली दरबाराच्या कानी ती पडेल का?

(इंग्रजी भषांतर – अमूल्य, बी. इंग्रजीवरून स्वैर रूपांतरः स्वातिजा मनोरमा व सुहास परांजपे.)