विश्वंभर धर्मा गायकवाड

अलीकडच्या काळात वर्तमानपत्रे, माध्यमे, सभा किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सावकरवादी मंडळी सावरकरांचे विचार मांडताना दिसत आहेत. त्या सर्वांचा रोख सावरकर कसे द्रष्टे किंवा विज्ञानवादी, पुरोगामी राष्ट्रभक्त होते हा सांगण्याचा आहे. हिंदूवादी सुद्धा सावरकर कसे अस्पृश्यताविरोधी, जातीभेदविरोधी किंवा विज्ञानवादी होते हेही सांगताना दिसून येतात. पण सावरकरांच्या विचारांचे मात्र कोणीही तटस्थ, वस्तुनिष्ठ आकलन करताना दिसत नाही. प्रस्तुत लेखात सावकरांच्या समाजसुधारणा व धर्मसुधारणा विचारांचा किंवा कार्याचा आढावा घेतलेला आहे.

Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Fali Nariman
फली नरीमन ‘हिंदू-धर्माधारित राज्या’बद्दल काय म्हणाले होते?
Marathi Kirtankar Bharti Tai Adsul
इन्फ्लुअन्सर नव्हे, किर्तनकार! तरुणांना अध्यात्माची गोडी लावणाऱ्या २४ वर्षीय भारतीताई आडसूळ कोण?

स्वातंत्र्यापूर्व काळात टिळकोत्तर युगीन महाराष्ट्रात दोनच वैचारिक ध्रुव होते. एक सावरकरवादी व दुसरे गांधीवादी. गांधीवादात टिळक, रानडे, आगरकर, गोखले या सर्व विचारांचे मिश्रण आहे. पण सावकर हे टिळकवादी, क्रांतिकारी व ‘हिंदुत्व’वादी होते. सावरकर व त्यांची सर्व भावंडे व कुटुंब कट्टर देशभक्त होते यात वाद नाहीच पण सावकरांच्या इतिहासात दोन भूमिका दिसतात. ज्याप्रमाणे टिळकांच्या विचारांचे दोन स्थित्यंतरे दिसतात. मंडालेपूर्वीचे टिळक आणि मंडालेनंतरचे टिळक तसेच सावरकर ही १९१० पूर्वीचे सावरकर आणि १९२३ नंतरचे सावरकर. १९१० पूर्वीचे सावरकर हे राष्ट्रभक्त व ब्रिटिशांविरोधी सावरकर दिसतात. या काळात हिंदू-मुस्लिम असा ते भेद करत नाहीत. म्हणून तर ते १८५७ च्या युद्धास ‘स्वातंत्र्यसमर’ असे संबोधतात आणि त्याविषयीच्या १९०९ सालच्या पुस्तकात, या स्वातंत्र्यसमरातील मुस्लिम, शीख शिपायांचा गौरव करताना दिसतात. उदा: नानासाहेब पेशव्यांचे मित्र अजीमुल्ला, बेगम हजरत महल, मौलवी महंमदशहा इ. म्हणजेच या देशातील ब्रिटिश निघून गेले पाहिजेत यासाठी लंडनमधील भारत भवनात असताना मुस्लिम सहका-याची व मित्राची ते मदत घेताना दिसतात. उदा: आर.एम. खान, मिर्झा अब्बास इ. पण गांधीचा मार्ग मात्र त्यांना सुरूवातीपासून शेवटपर्यंत मान्य नव्हता.

१९१० नंतरचे सावरकर राष्ट्रभक्त तर होतेच पण या काळात ते कट्टर हिंदूवादी व गांधीमार्ग विरोधी बनले. अनंत कान्हेरेंनी केलेल्या जॅक्सनच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या कारणावरून सावरकरांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येऊन त्यांची रवानगी अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात राजकीय कैदी म्हणून करण्यात आली. सावरकर हे १९१० ते १९२३ अशी तेरा वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात असताना ब्रिटिशांनी त्यांचा अनन्वित छळ केला. या छळाला ते घाबरले तर नाहीतच पण या तुरुंगात असताना ब्रिटिशांची हिंदू-मुस्लिम कैद्यांसोबत असणारी वर्तणूक व मुस्लिम कैद्यांची दादागिरी व धर्मांतराचे प्रयत्न पाहून मात्र त्यांच्या मुस्लिमांबद्दलच्या दृष्टिकोनात पूर्णतः बदल झाला. याच काळात खिलाफत चळवळ, केरळचे मोपल्याचे बंड इत्यादी घटना पाहता सावरकर या निष्कर्षाला येतात की, ‘देशाला स्वातंत्र्य उशीरा मिळाले तरी चालेल; पहिले हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे.’ म्हणून ते हिंदूंच्या सैनिकीकरणाचा, अस्पृश्यता निवारणाचा, हिंदूंच्या कर्मकांडांना विरोध, हिंदूंचे शुद्धीकरण, विज्ञानाचा पुरस्कार इत्यादी धोरणाचा स्वीकार करतात.

सन १९२४ ला सावरकरांची सशर्त सुटका होते. राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर त्यांना रत्नागिरीस नजरकैदेत ठेवले जाते. या काळात १९२४ ते १९३७ अशी तेरा वर्षे ते विजनवासात होते. राजकीय कृती करण्यास मुभा नव्हती. मात्र अंदमानातील तुरुंगातला अनुभव स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून ते आपले ध्येय म्हणजे हिंदूंचे संघटन किंवा ऐक्य यासाठी अस्पृश्यता निवारणावर जास्त भर देतात. अस्पृश्यता हा हिंदू संघटनाच्या मार्गातील धोंड आहे, ती नष्ट करण्यासाठी व हिंदूच्या उत्कर्षाच्या आड येणा-या सात बेड्या तोडण्याचा त्यांनी निकराने प्रयत्न करतात. त्यासाठी बुद्धीवाद आणि विज्ञाननिष्ठा पणाला लावतात.

अस्पृश्यता निवारणाची भूमिका

सावरकरांनी जातीनिर्मूलन किंवा अस्पृश्यता निवारण हे धोरण म्हणून स्वीकारले, मूल्य म्हणून नाही… किंवा असे म्हणता येईल की ‘सर्व माणसे समान आहेत’ हे तत्त्व त्यांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यक्रमाला प्रेरणा देत होते असे म्हणण्यापेक्षा ‘या कार्यामुळे एकसंघ व प्रबळ हिंदू राष्ट्र निर्माण होईल,’ हा त्यांचा विश्वास होता. ते कार्य त्यांच्या मुस्लिमविरोधी राजकारणातील धोरणात्मक डावपेचाचा भाग होता. तुरुंगातून सुटून रत्नागिरीला जाण्यापूर्वी ते नाशिकला गेले. येवला या ठिकाणी भाषण देताना ते म्हणतात, ‘अस्पृश्योद्धार हे आपले महत्त्वाचे कार्य आहे.’ रत्नागिरीला ते पतित पावन मंदिराची स्थापना करतात. महाड सत्याग्रह, पर्वती व काळाराम सत्याग्रह यास ते पाठिंबा देतात. हे सर्व करत असताना ते धोरण म्हणून करतात. कारण सावकारांचे अनुयायी व चरित्रकार बाळाराम सावकर असे निष्कर्षप्राय विधान करतात की, ‘एखादी कृती करावी की नाही हे ठरवताना ती गोष्ट हिंदू हिताची आहे असे वाटले तर ती करीत. तिने काही हित होणार नाही किंवा अहित होणार आहे असे वाटले तर ती गोष्ट ती करत नसत, करू नका असे सांगत.’

यावरून आपण पुढले उदाहरण पाहू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अस्पृश्यताबंदीची तरतूद घटनेत करतात तेव्हा सावरकर त्यांचा ‘स्मृतीकार’ म्हणून गौरव करतात. त्यासोबतच ते ‘जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्यूलेख’ लिहितात. पण बाबासाहेब जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारतात तेव्हा एकदम संतापून जातात. त्यासाठी ते असे म्हणतात की, ‘गोमीचे दोन पाय गळले तरी गोम लंगडी होत नाही. पण गळून गेलेले पाय मात्र निर्जीव होऊन गळून पडतात.’ ‘शेळ्यात लंगडी गाय प्रधान. तसेच बऱ्याच अशिक्षित नि मागासलेल्या लोकांना आंबेडकर दाखवतील तेच बौद्ध धर्माचे स्वरूप आहे असे वाटणे साहजिक आहे.’ आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तरी बौद्ध धर्म हा आपण केलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येनुसार हिंदू धर्माचाच एक भाग ठरत असल्याने आंबेडकरांचे कृत्य निरर्थक असल्याचे ते सांगतात. ‘आंबेडकरांनी सीमोल्लंघन केले; पण हिंदुत्वाच्या सीमाक्षेत्रातच.’ सावरकरांनी अस्पृश्यांविषयी जितकेे भरभरून व तळमळीने लिहिले त्या तुलनेत ब्राम्हणेतरांविषयी त्यांचे लिखाण नगण्य आहे. कारण ते म्हणतात की, ‘मुळात अस्पृश्यांची हिंदू धर्म सोडून मुसलमान होण्याची शक्यता जितकी होती तिच्या तुलनेत ब्राम्हणेतरांनी तसे करण्याची शक्यता ही नगण्यच होती.’

थोडक्यात रत्नागिरीत असतानाच फक्त तेरा वर्षे ते अस्पृश्यतासंबंधी विचार करताना दिसतात. १९३७ ला बिनशर्त मुक्तता झाल्यावर त्यांनी आपले समाजसुधारणेचे कार्य थांबवले. केवळ तेरा वर्षाचे ते समाजसुधारक बनलेले होते. यावरून सावकारांच्या अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमापाठीमागे दोन प्रश्न उपस्थित होतात. (१) अंदमानातील त्यांना आलेला मुस्लिम कैद्यांचा अनुभव आणि (२) तुरुंगातून सुटल्यावर त्यांच्या कार्यावर ब्रिटिशांनी घातलेली बंदी. ही दोन कारणे जर घडली नसती तर सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले असते का? म्हणून तर असे म्हटले जाते की, सावरकर मनःस्थितीने नव्हे तर परिस्थितीने समाजसुधारक झाले. १९१० पूर्वी व १९३७ नंतर अस्पृश्यता निवारणासंबंधीचे ठोस कोणतेच कार्य सावरकरांकडून झाले नाही असे दिसते.

हिंदू धर्म सुधारणेची भूमिका

सावकरांचा हिंदू धर्म सुधारण्यापाठीमागची प्रेरणा ही अंदमानातील आलेला अनुभव हीच होती. ‘स्वातंत्र्यासाठी संघटन यापेक्षा हिंदूंचे संघटन, हिंदू धर्मियांचे संघटन’ हे ध्येय ते ठरवतात. त्यासाठी हिंदूचे सैनिकीकरण, हिंदूंच्या कर्मकांडांना विरोध, हिंदू धर्मांतरितांसाठीची शुद्धीकरणाची चळवळ, विज्ञानाचा पुरस्कार, भाषा शुद्धी इत्यादी धोरणाचा ते स्वीकार करतात. बाबाराव सावरकर रत्नागिरीबाहेर हिंदू संघटनेचे काम करत होते तर त्यावेळी सावरकर रत्नागिरीत हिंदू संघटन मजबूत करण्यासाठी अस्पृश्यता व जातीभेदाविरुद्ध काम करत होते तसेच दुस-या बाजूला हिंदुत्वाची तात्त्विक बैठक आणि हिंदूकेंद्रित इतिहासाची मांडणी करीत होते. सावकरांनी हिंदू धर्माची राजकीय व्याख्या केली. टिळकांप्रमाणे ते धार्मिक व्याख्या करत नाहीत. टिळकांची धार्मिक व्याख्या न करता हिंदूंचे संघटन व ऐक्य यासाठी ते राजकीय व्याख्या करतात. कारण टिळकांच्या व्याख्येनुसार वेदप्रामाण्यामुळे जैन, बौद्ध, शीख व लिंगायत अशा वेदबाह्य संप्रदायातील लोक वगळले जातात. म्हणून त्यांनी वेदप्रामाण्याला फाटा दिला व ‘पुण्यभू’ व ‘पितृभू’ या अटी घालून ते बौद्ध, जैन, शीख यांचे समावेशन व मुस्लिम-ख्रिस्ती यांचे वर्जन अशी संकल्पना मांडतात. ‘पुण्यभू’ म्हणजे सर्व धर्मियांचे संस्थापक भारताला पुण्यभूमी मानतात. ‘पितृभू’ म्हणजे ‘पीतर’ यामध्ये आई व वडील यांचा समावेश होतो. म्हणजेच आई व वडील या देशाचे असले पाहिजे. मातृभूमीत फक्त आई स्वदेशाची असते. म्हणून ‘मातृभूमी’ हा शब्द वापरलेला नाही. सावरकरांना हिंदुत्वाची तात्त्विक व्याख्या केल्यानंतर त्यांच्या राजकीय अंमलबजावणीकडे वळले. त्यासाठी त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागले. म्हणून ते ‘हिंदूपदपातशाही’ (१९२५) हा ग्रंथ लिहितात.

सावरकरांनी हिंदू धर्माची चिकित्सा शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे. त्यांनी हिंदूंच्या देवभाळेपणा, धर्मभोळेपणापर टीका केली. यामुळेच तर देशाला पारतंत्र्यात जाण्याची वेळ आली. उदा: राष्ट्राहून राष्ट्रातील एक पशु श्रेष्ठ, राष्टस्वातंत्र्य पडले तरी चिंता नाही. एक देऊळ पडण्याची चिंता. दहा देवळे, मूठभर ब्राम्हण, दहा-पाच गाई मारण्याचे पाप टाळावे यावरच राष्ट्र मरू दिले. हिंदूंच्या गायीच्या पवित्र संकल्पनेमुळे युद्धात शत्रूकडून गायी सोडून हिंदूंचा पराभव केला गेला म्हणून गाय पवित्र नसून ते गायीला उपयुक्त पशू समजतात. ते गायीऐवजी ‘नृसिंह’ पुजला पाहिजे असे सांगतात. राष्ट्राचे हिंदूत्व राखायचे असेल तर हिंदूंचे हिंदूत्व शिथील करायला हवे. राष्ट्राचे हिंदूत्व गमावण्यापेक्षा हिंदूंचेच हिंदूत्व पातळ होऊ देणे अधिक श्रेयस्कर. ही एक अटळ तडतोड आहे म्हणून ते अस्पृश्य जातींना बरोबरीचे स्थान द्यायला सांगतात. सावरकर भाषाशुद्धीचेही काम हाती घेतात. गांधींच्या ‘उर्दूनिष्ठ हिंदी’ ऐवजी त्यांना ‘संस्कृतनिष्ठ हिंदी’ हवी होती. हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ ते हाती घेतात. ही प्रेरणा त्यांना आर्य समाजाच्या भाई श्रद्धानंद, परमानंद इत्यादींकडून घेतली. शुद्धीकरणामुळे हिंदूंची संख्या वाढेल. हिंदू धर्मात हा मार्ग बंद होता पण सावरकरांनी तो धोरण म्हणून स्वीकारला. हिंदूंचे सैनिकीकरण इत्यादी सर्व विचार हे सावकरांचे धोरणात्मक विचारविश्व होते. यासाठी त्यांना कर्मठ हिंदू व गांधीवाद्याकडून विरोध झाला.

१९३७ नंतर रत्नागिरीहून कायमचे मुक्त झाल्यावर, उघड-उघड हिंदूंचे संघटन हाच त्यांचा कार्यक्रम बनला. त्यासाठी ते म्हणत, ‘स्वराज्य नको पण मुसलमानांना आवरा’ अशा भूमिकेचे राजकारण सावरकरांनी उत्तरार्धात केलेले दिसून येते.

येथे फक्त त्यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा दृष्टिकोनाचे वस्तुनिष्ठ आकलन केलेले आहे. प्रत्येक कृती व विचारामागे विशिष्ट हेतू होता हे आपण तटस्थपणे ओळखले पाहिजे. कारण सावरकरांचे विचार व कृती तेव्हाच्या, तत्कालीन परिस्थितीची गरज होती. आता सावरकरांचे तेव्हाचे धारणात्मक विचार स्वतंत्र भारतात मांडणे अप्रस्तुत होईल. राष्ट्रभक्त म्हणून ते व त्यांचे कुटुंब हे आजच्या पिढीला आदर्श कसे राहू शकतात व राष्ट्रासाठी त्याग काय असतो ते नव्या पिढीला सांगितला पाहिजे. सांप्रदायिक हेतूसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी सावरकरांचे धोरणात्मक व परिस्थितीजन्य विचार यांचे उदात्तीकरण करणे आजच्या परिस्थितीत त्याज्यच मानले पाहिजे. जसे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आपण देशभक्त म्हणून पाहतो तसे सावरकरांकडे पाहिले पाहिजे.

सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा इतिहास प्रत्येक पक्षाच्या विचारपीठावरून सांगितला गेला पाहिजे. मग ते काँग्रेस, कम्युनिस्ट किंवा प्रादेशिक पक्ष असो. केवळ भाजपने सांगितला म्हणून संशय घेण्याचे काहीच कारण नाही. पण हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या तेव्हाच्या परिस्थितीजन्य विचारांचे भांडवल आज करू नये. आपल्या सोयीप्रमाणे सावरकर ओढून-ताणून मांडू नयेत हीच अपेक्षा.

लेखक उदगीर (जि. लातूर) येथील शिवाजी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. vishwambar10@gmail.com