भिवंडी तालुक्यातील चिराडपाडा शाळेतील प्रयोगशाळेची राज्य पातळीवर दखल

प्लॅस्टिकच्या बाटल्या, रबरी नळ्या, फुटक्या काचा, लोखंडी सळया, वापरलेले बॅटरी सेल, निरनिराळ्या आकाराचे पाईप आदी एरवी अडगळीत अथवा भंगारात काढल्या जाणाऱ्या टाकाऊवस्तूंपासून विज्ञानातील अनेक संज्ञा, संकल्पना सोप्या पद्धतीने समजून सांगणारी भिवंडी तालुक्यातील चिराडपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील अभिनव प्रयोगशाळा सध्या राज्यभर कौतुकाचा विषय ठरली आहे.

हवेचा दाब, त्याचा वातावरणावर होणारा परिणाम, ध्वनि निर्मिती, ध्वनि वहन, चुंबकीय तत्त्व, गुरूत्त्वाकर्षण, गुरूत्त्वीय बल, कुपनलिकेद्वारे पाणी कसे खचले जाते. इंजेक्शन कसे काम करते, वीज निर्मिती कशी होते, डॉक्टरांकडे असलेला हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरला जाणारा स्टेथोस्कोप नेमके कसे काम करतो, साध्या ट्रेनपेक्षा बुलेट ट्रेनचा वेग अधिक का असतो अशा अनेक वैज्ञानिक रहस्यांची उकल करणाऱ्या साध्या आणि सोप्या प्रयोगांचा समावेश भोईरसरांच्या या शाळेत आहे. त्यापैकी कोणतेही साहित्य बाहेरून विकत आणलेले नाही. रोजच्या व्यवहारातील वस्तूंपासून बनविलेल्या प्रयोगांद्वारे भोईरसर निरनिराळी वैज्ञानिक सूत्रे विद्यार्थ्यांना समजावितात आणि मग विद्यार्थीच त्यांच्याकडचे साहित्य जमवून तसा प्रयोग करून पाहतात. उदाहरणार्थ- ‘जितके

बल लावले जाते, तितके कार्य घडते’ हा एक भौतिकशास्त्रातील नियम आहे. भोईरसरांनी वायरींगसाठी वापरली जाणारी प्लास्टिकची पट्टी आणि काही गोटय़ांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे वैज्ञानिक सत्य समजावून सांगितले आहे. नदीमध्ये भवरे कसे तयार होतात. पृष्ठभागी भवऱ्याचा दाब कसा अधिक असतो. मात्र जसजसे तळाशी जावे, तसतसा हा दाब कमी होत जातो. पृथ्वीचे परिभ्रमण आणि परिवलन या दोन्ही क्रियाही प्रयोगशाळेत पाहता येतात. असे एकूण ५५ प्रयोग भोईर सरांनी तयार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक निरीक्षणे प्रयोगांद्वारे पडताळून पाहता येतात. तसेच व्यवहारात याचा नेमका उपयोग काय हेही त्यांच्या लक्षात येते.

पडघ्यापासून साडेचार किलोमिटर तर पिसे गावापासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या चिलारपाडय़ाच्या जिल्हा परिषद शाळेत आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षणाची सोय आहे. परिसरातील ११८ विद्यार्थी तिथे शिकतात. त्यातील निम्मे विद्यार्थी आदिवीसी आहेत. भोईरसरांच्या या अतिशय नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेमुळे एरवी कठीण समजला जाणारा विज्ञान विषय येथील विद्यार्थ्यांना सोपा वाटू लागला आहे. त्यांना त्या विषयाची गोडी लागली आहे. त्यातूनच त्यांनी शाळेच्या आवारात धरणाची प्रतिकृती साकारली आहे. धरणात पाणी कसे साचते. धरण भरल्यावर ओसंडून जाणारे पाणी कालव्यांद्वारे कसे शेतीला पुरविले जाते, हे त्यांनी गेल्या पावसाळ्यात प्रयोग करून पडताळून पाहिले.

शिक्षणाच्या वारीत समावेश

फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या पांडुरंग भोईर यांनी विज्ञान विषयाची आवड, जिज्ञासा आणि उत्सुकतेपोटी तयार केलेली ही प्रयोगशाळा पहायलाराज्यभरातून शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी चिराडपाडय़ात येत आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमात या प्रयोगशाळेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांना हे प्रयोग पाहता येणार आहेत.