२४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित; ठाणे महापालिकेचा प्रस्ताव मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक या मार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाण्यातील तीन हात नाका परिसरातील उड्डाणपुलावर आणखी एका उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २४० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी निधी मिळावा, असे प्रयत्न केले जात आहेत. तीन हात नाका येथे सद्य:स्थितीत उभा असलेला उड्डाणपूल वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेता कालबाह्य झाला आहे. त्यामुळे भविष्यातील नियोजनासाठी आणखी एका उड्डाणपुलाशिवाय पर्याय नाही, असा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला. ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गामुळे अंतर्गत वाहतुकीचे नियोजन कोलमडून जाऊ नये यासाठी महामार्गावर तीन हात नाका, नितीन कंपनी जंक्शन आणि कापूरबावडी नाका येथे तीन उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, मुंबई-ठाणे-नाशिक या मार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतुकीचा भार मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. तीन हात नाका येथील उड्डाणपूल हा भार पेलवणार नाही. त्यामुळे पुढील काही वर्षांत येथे कोंडी होईल, असा पालिकेचा दावा आहे. तीन हात नाका, लालबहादूर शास्त्री मार्ग, तीन हात नाका ते मुलुंड चेकनाका या वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक पुनर्नियोजनाचा प्रस्ताव महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने तयार केला. या मार्गावर तीन हात नाका ते ठाणे शहरातील हरी निवास चौक येथे भूमिगत मार्गिका उभारण्याचा प्राथमिक आराखडा यापूर्वी तयार होता. मात्र, ठाणे वाहतूक पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर वाहनांसाठी भूमिगत मार्किकेचा प्रस्ताव मागे घेऊन उड्डाणपुलांची मांडणी झाली. * पुलाच्या मार्गिका लालबहादूर शास्त्री मार्गावर इटर्निटी मॉल ते मुलुंड चेकनाका आणि ठाणे शहरात हरिनिवास चौकापर्यंत. * महामार्गावरून प्रवास करू इच्छिणाऱ्यांना नितीन कंपनी चौकातील उड्डाणपुलापर्यंत विस्तारित मार्गिका. * शहरातील अंतर्गत व महामार्गावरील वाहने एकाच रस्त्यावर येणे शक्यतो टाळतील . * केंद्राकडून या प्रकल्पास मान्यता मिळाली नाही, तर महापालिकेच्या निधीतून खर्च करण्याची प्रशासनाची तयारी.