थायलंमधल्या चिअँग राय गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीममधील १२ मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात यश आलं. ही मुलं सुखरुप बाहेर यावी यासाठी जगभरातील लोकांनी प्रार्थना केल्या. संपूर्ण जगाचं लक्ष या बचाव मोहीमेकडे लागून राहिलं होतं. ही बचाव मोहीम सुरू असताना माई चायच्युन यांचं शेत त्यांच्या डोळ्यादेखत वाहून जात होतं. पीकांची नासाडी होत होती. जर शेतच वाचलं नाही तर पुढच्या काळात खाण्याची अबाळ होईल, आर्थिक संकट उभं राहिलं याची जाणीव त्यांना होती. मात्र मुलांच्या आयुष्यापेक्षा त्यांना काहीच महत्त्वाचं नव्हतं. बचाव मोहीम सुरू असताना गेले दोन आठवडे सतत  दर मिनिटांला हजारो लिटर पाणी गुहेतून बाहेर सोडलं जात होतं. या पाण्यामुळे माई यांच्या शेताचं मोठं नुकसान झालं. पाच एकर शेती वाहून गेली.

थोडक्यात अनर्थ टळला?, गुहेतून मुले बाहेर पडली आणि…

पण त्या हसत म्हणाल्या, ‘पीक काय पुन्हा घेता येईल. पण या मुलांचा जीव गेला तर मात्र तो परत येणार नाही. म्हणूनच पिकांपेक्षा मला या मुलांच्या जीवाची जास्त काळजी होती. मी जेव्हा शेतात आले तेव्हा दोन फुट पाणी शेतात साचलं होतं. भाताचं पिक वाहून गेलं होतं पण, ही मुलं वाचली याचं मला समाधान आहे.’ असं माई म्हणाल्या. मुलं गुहेत अडकल्याची बातमी समजताच माई हातातली कामं टाकून गुहेकडे धावत गेल्या. गेल्या दहा दिवसांपासून त्या गुहेकडेच थांबल्या होत्या. बचाव मोहीमेसाठी काम करणाऱ्या टीमसाठी आणि इतर लोकांसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली.

क्रिकेटर विरेंद्र सेहवाग यानं नुकताच माईचा फोटो ट्विट करत तिचं कौतुक केलं आहे.