नोकरीवरुन काढून टाकणं हे जेवढं एखाद्या कर्मचाऱ्यासाठी अपमानास्पद असतं. तेवढाच मोठा धक्का जर एखादा कर्तबगार कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्या कंपनीला बसतो. पण, अशी कोणती कारणं असतात ज्यामुळे एखाद्या चांगल्या कर्मचाऱ्याला ती नोकरी सोडावीशी वाटते?
प्रगतीः माणूस म्हटला की तो सतत पुढे जाण्याचाच विचार करत असतो. मानवी स्वभावच आहे हा. त्यामुळे दुसऱ्या कंपनी त्या कर्मचाऱ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हितकारक ठरणार असेल तर तो त्या कंपनीमध्ये जाण्याचा नक्कीच विचार करेल. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर त्याला पुढील १०-१२ वर्षात स्वतःची वाढ कंपनीमध्ये दिसत नसेल तरीही तो कर्मचारी नोकरी सोडण्याचा विचार करेल.
ताण-तणावः ताण- तणाव तर प्रत्येक नोकरीचा भागच आहे. सध्याच्या या स्पर्धात्मक युगात ताण- तणाव नसलेली नोकरी शोधूनही मिळणार नाही. पण, एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांवर वाजवीपेक्षा जास्त तणाव देण्यात येत असेल तरीही करमचारी नोकरी सोडण्याचा विचार करतो. या सगळ्या वातावरणात त्यांचे शोषण होत आहे असे सतत वाटत असते.
आव्हानंः कामात वेगवेगळी आव्हानं असतील तर काम करायलाही कर्तबगार कर्मचाऱ्यांना मजा येते. वरिष्ठांकडून दिलेले आव्हानं पूर्ण करुन त्यांची प्रशंसा संपादन करण्यात काही वेगळीच मजा असते. ही अशीच आव्हानं नोकरीमध्ये टिकून राहण्याचे महत्त्वपूर्ण काम बजावतात. पण, जर अशी कोणतीच आव्हानं नोकरीमध्ये नसतील तर नोकरी कंटाळवाणी वाटायला लागते. रोज ऑफिसला यायचा कंटाळा यायला लागतो. पर्यायाने, कर्मचारी दुसरीकडे नोकरी शोधायला लागतो.
कामाचं श्रेयः जेव्हा कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांपेक्षा आपल्या फायद्याचा अधिक विचार करते तेव्हा एका कर्तबगार कर्मचाऱ्यांसाठी हे जास्त क्लेषदायक असतं. एखाद्या व्यक्तीने संपूर्ण काम मेहनतीने केले असेल पण त्याच्या वरिष्ठांनी जर त्याच्या कामाचं श्रेय त्याला देत नसतील तर ते चांगल्या कर्मचाऱ्यासाठी अपमानास्पद असतं. म्हणून एनेकदा तो नोकरी सोडणाऱ्याचा विचार करतो.