scorecardresearch

वसई किल्ल्याची पडझड; बुरूज, तटबंदी ढासळण्यास सुरुवात; संवर्धनासाठी शंभर कोटींची तरतूद करण्याची मागणी

किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले असून तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला ११० एकर परिसरात उभा आहे.

वसई किल्ल्याची पडझड; बुरूज, तटबंदी ढासळण्यास सुरुवात; संवर्धनासाठी शंभर कोटींची तरतूद करण्याची मागणी
ऐतिहासिक वसई किल्ल्याची दिवसेंदिवस पडझड होत चालली आहे.

वसई : ऐतिहासिक वसई किल्ल्याची दिवसेंदिवस पडझड होत चालली आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळू लागले असून तटबंदीचे दगड निखळून पडत असल्याचे दिसत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास किल्ला नामशेष होईल अशी  भीती दुर्गप्रेमी, पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. या किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी दुर्गप्रेमीसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

व्यापाराच्या दृष्टीने वसईचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी सन १५३६  मध्ये वसईचा किल्ला बांधला होता. किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले असून तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला ११० एकर परिसरात उभा आहे. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. किल्ल्याला चारही बाजूंनी ३० फुटांची तटबंदी आहे. आता ही तटबंदी ठिकठिकाणी कोसळू लागली आहे. तटबंदीवर जंगली झाडे उगवली असून त्याची मुळे खोलवर रुतली आहेत. डागडुजी होत नसल्याने तटबंदी आणि बुरूज ढासळू लागले आहे. त्यामुळे किल्ल्यात येणारे दुर्गप्रेमी, र्पयटक आणि अभ्यासक हळहळ व्यक्त करत आहे. वसईचा किल्ला हे वसईकरांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. मात्र त्याची डागडुजी होत नसल्याने किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. एकेक करून हा समृद्ध वारसा नष्ट होत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते नितीन म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. किल्ल्याचा एकूण विकास करण्यासाठी केंद्राने शंभर कोटींच्या निधीची तरतूद करून किल्ला वाचवला पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. या वसई किल्ल्याचे संवर्धन झाल्यास ते महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आम्ही किल्ल्याची नियमित साफसफाई आणि डागडुजी करत असतो अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक कैलास शिंदे यांनी सांगितले. काही ठिकाणी झाडे उगवल्यामुळे तटबंदीतील दगड निखळले आहेत मात्र बुरूज ढासळले नसून तटबंदी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षांत वसई किल्ल्यातील चर्चचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. किल्ल्याचे संवर्धन करून त्याचा विकास कऱण्याची योजना असून त्यावर टप्प्याटप्प्याने काम सुरू असल्याची माहिती अधीक्षक शिंदे यांनी दिली.

किल्ल्याची रचना

१७८० मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांबरोबर युद्ध करून वसईचा किल्ला जिंकला होता. वसईच्या किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राचे पाणी आहे.  गडावर जाण्यासाठी एका बाजूला जमीन असल्यामुळे ती वापरता येते. किल्ला अतिशय सुरक्षित होता. वसईच्या किल्ल्याला दहा बुरुज असून  प्रत्येक बुरुजाला नाव दिले आहे. बुरुजांची लांबी सुमारे एक किलोमीटर आहे. किल्ल्याची तटबंदी ३० फूट उंच आणि ५ फूट रुंद असल्यामुळे अतिशय मजबूत आहे. आता हे बुरूज ढासळू लागले आहेत. किल्ल्याच्या आतील पुरातन विहिरी बुजू लागल्या असून किल्ल्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने किल्ल्याचे ऐश्वर्य लयाला जाऊ  लागले आहे. केंद्र सरकारने या किल्ल्याला १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. तेव्हापासून तो पुरातत्त्व खात्याकडे आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 12:55 IST