विचारांच्या माध्यमातून होणारे परिवर्तन दीर्घकाळ टिकते. अशा परिवर्तनातूनच समाज पुढे जात असतो. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत वैचारिक भूमिका नेहमीच निर्णायक ठरते, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती तथा राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एल. थूल यांनी केले.येथील नटराज रंगमंदिरात संबोधी मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राइज इन्स्टिटय़ूशनचे राज्य उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ पद्माळकर, संबोधीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, डॉ. जिरोणीकर, डॉ. शिवाजी जवळगेकर आदी उपस्थित होते. हत्तीअंबीरे यांच्या वाढदिवसानिमित्त या मेळाव्याचे आयोजन केले होते. हत्तीअंबीरे यांनी आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून चळवळीशी इमान राखणारे कार्यकर्ते आहोत, असे सांगितले. भविष्यात चळवळ हाच आपला श्वास असेल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक सिद्धार्थ भराडे यांनी, तर सूत्रसंचालन दि. फ. लोंढे यांनी केले.