शहरातील मुंबई नाका मित्र मंडळप्रणित लोकनिर्माण प्रकल्पातर्फे जनश्री विमा योजनेंतर्गत २३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी आ. वसंत गीते, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, डॉ. प्रदीप पवार, मनसे गटनेते अशोक सातभाई, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, जयंत जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ होते. आ. गीते यांनी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम लोकनिर्माण प्रकल्पाच्या वतीने केले जात असतानाच लाभार्थ्यांनीही या योजनांची माहिती इतरांना करून देण्याची गरज व्यक्त केली. साहाय्यक कामगार आयुक्त जाधव यांनी शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
महापौर अ‍ॅड. वाघ यांनीही मार्गदर्शन केले. लोकनिर्माण प्रकल्पातंर्गत जनश्री विमा योजनेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६०० रुपये शिष्यवृत्तीचे    वाटप    करण्यात  आले. सूत्रसंचालन प्रा. कैलास मोरे यांनी केले. आभार शोभा ठाकरे यांनी मानले.