उच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवून पैठणच्या नाथसागर जलाशयावरून पाणीउपसा करणाऱ्या शेतक ऱ्यांची वीज खंडित करण्यात आली. मात्र, बिअर, दारू व शीतपेयांच्या कंपन्यांना पाणीपुरवठा सुरळीत असल्याच्या निषेधार्थ जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने युनायटेड स्पिरीट, एबीडी ब्रेवरीज या कंपन्यांच्या प्रवेशद्वारापुढे निदर्शने करण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या कडा कार्यालयावरही निदर्शने करण्यात आली.
जिल्हा प्रशासन उद्योग व शेतक ऱ्यांना पाणीपुरवठा करताना दुजाभाव करीत आहे. उद्योजकांना पाण्यासाठी पायघडय़ा घातल्या जात आहेत. शेतक ऱ्यांची वीज खंडित केली जात असल्याचा आरोप जायकवाडी कृती समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला. पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असल्यामुळे शेतक ऱ्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. हाच न्याय मद्य कंपन्यांसाठीही लावावा, असे जलसंपदामंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. पाण्याची संघर्षांची स्थिती पाहता समन्वयाने वितरण केल्यास शेतक ऱ्यांच्या जळणाऱ्या मोसंबी बागा वाचू शकतील, असा दावाही करण्यात आला आहे. अधिकृत परवानगी घेऊनच शेतकरी पाणी वापरत आहेत. त्याची पाणीपट्टीही भरून घेतली जात आहे, त्यामुळे त्यास पाणी चोरी म्हणू नये, असे निवेदनात म्हटले आहे.