आमचं प्रोफेशनच असं आहे, की जिथं २४ तास काम चालतं. आज मला बरं नाही किंवा घरात लग्नकार्य, सण-समारंभ आहे, मला चार दिवसांची सुट्टी हवी, असं आम्ही म्हणू शकत नाही. त्यामुळे आमच्या क्षेत्रात काहीही झालं तरी ‘शो मस्ट गो ऑन’ हे असतंच. म्हणूनच अनिकेतचा, माझ्या मुलाचा जन्म झाल्यावर मी माझ्या कामातून ब्रेक घेतला. ज्यामुळे मी त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकले. लग्नाआधी करिअर महत्त्वाचं होतं, पण मुलगा झाल्यावर त्याच्या वाढीसाठी, कुटुंबासाठी मी पूर्ण वेळ दिला. आता तो मोठा झाल्यावर मी पुन्हा करिअरकडे वळले आहे.

अनिकेत झाला तेव्हाही अशोकचं काम खूप जोरात चालू होतं. त्यामुळे आई-वडील दोघंही घराबाहेर असून चालणार नव्हतं. म्हणून मी अभिनय न करण्याचा निर्णय घेतला. एखादी मालिका किंवा चित्रपट करायचा म्हणजे १२-१३ तासांची शिफ्ट असते. नाटक करायचं तर नाटकाचे दौरे असतात. ‘वर्क फ्रॉम होम’ हा ऑप्शन नसतोच ना आम्हाला. पण त्याच्याच बरोबर हे फील्ड असं आहे की पुन्हा कधीही जॉइन करता येतं. त्यामुळेच अनिकेत मोठा झाल्यावर जवळपास १४ वर्षांनी मी पुन्हा अभिनयाकडे वळले. दरम्यान, घरातले सण-समारंभ, नातेवाईक, अनिकेतची शाळा, अभ्यास या सगळ्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ मला देता आला.

मुळात माझी सपोर्ट सिस्टीम खूप चांगली आहे. माझ्या घरात काम करणाऱ्या मुली, ड्रायव्हर यांच्यापासून ते माझी बहीण, भावंडं, माझी आई, दीर, जाऊ, पुतणे, नणंदा, या सगळ्यांची मुलं, आम्ही सगळे एकत्र असतो. मला कधीही काहीही गरज पडली तर ही सगळी मंडळी माझ्या मदतीला हजर असतात. त्यामुळे माझं या सगळ्यांशी छान खेळीमेळीचं, मैत्रीचं नातं आहे. आमच्या सराफ कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सगळे आपापल्या घरी अगदी सुखी आहोत. जेव्हा एकत्र यायचं असतं तेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो. पण ज्याची त्याची स्पेसही एकमेकांना देतो. त्यामुळे अशोकचं आणि माझं या सगळ्यांशी उत्तम नातं आहे. अनिकेतलाही त्यामुळे लहानपणापासून या नात्यांची ओढ आहे.

अनिकेत जरी आमचा एकुलता एक मुलगा असला तरी तो माझ्या बहिणीची मुलं, दिराची मुलं, यांच्यासोबतच लहानाचा मोठा झाला. सगळी मुलं एकत्र वाढली. त्यामुळे त्याला शेअरिंग कळलं. मला तो माझ्या आईची काळजी घेताना बघतो किंवा अशोकचं माझं नातं पाहतो, सगळ्या नातेवाईकांशी मी प्रेमाने वागते ते पाहतो. माझ्या दृष्टीने या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण तो चांगला माणूस व्हावा हाच माझा प्रयत्न आहे. आज त्यामुळेच अनिकेत आणि आमच्या दोघांमध्ये खूप चांगला संवाद आहे. त्याने त्याचं करिअर निवडतानासुद्धा आमची छान चर्चा झाली. खरं तर आम्ही दोघंही या अभिनयाच्या क्षेत्रात म्हटल्यावर आमचा मुलगाही याच क्षेत्रात येईल असं अनेकांना वाटलं होतं.

पण आम्ही त्याच्यावर कधीच दबाव टाकला नाही. त्याने बीएमएम केलं, पण नंतर त्याने शेफ व्हायचं जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही दोघंही आईवडील म्हणून ठामपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलो. कारण माझं असं मत आहे की प्रोफेशन हे ज्याचं त्यानं निवडायला हवं. ज्या कामात नेहमी आनंद मिळेल, समाधान मिळेल. जसं मला माझ्या कामातून मिळतं.

मुळात मला वाटतं, की प्रत्येक बाईचं स्वतःवर, स्वतःच्या कामावर प्रेम हवं. ते असलं ना की सगळं जग सुंदर दिसतं आणि आपल्याला मदत करणारी, आपल्याला सामावून घेणारी माणसं आपल्याला मिळत जातात. आता १४ वर्षांनी मी पुन्हा अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा ‘वाडा चिरेबंदी’सारखं ताकदीचं नाटक मला मिळालं. ‘अगं बाई सासूबाई’ किंवा आता माझी चालू असलेली ‘भाग्य दिले तू मला’ यासारखी उत्तम मालिका मिळाली. शिवाय माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांचा आणि आमचा इतका घरोबा होतो की तो माझा दुसरा परिवार होवून जातो. एकमेकांसाठी डब्बा आणण्यापासून ते एकमेकांच्या अडचणीत मदत करण्यापर्यंत आम्ही सगळे एकत्र असतो.

सध्या या आमच्या क्षेत्रात आलेल्या तरुण पिढीचं तर मला नेहमी कौतुकच वाटतं. ही सगळी मुलं खूप छान काम करतात. त्यांची एनर्जी खूप छान असते. त्यामुळे या तरुण मुलांबरोबर काम करायला खूपच आवडतं मला. मुळातच मला माणूस म्हणून जगायला आवडतं. अभिनेत्री निवेदिता सराफ ही फक्त कॅमेऱ्यासमोर असते. त्यामुळे मी आणि अशोकसुद्धा आमचं स्टारपण उंबरठ्याबाहेर ठेवून घरात वावरतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना छान समजून घेऊ शकतो. किंवा मी जेव्हा माझ्या जावेकडे, नणंदेकडे जाते तेव्हा मी सराफांची सून असते, मुलांची काकी, मामी असते. तेव्हा ॲक्ट्रेस निवेदिता सराफ नसते. त्यामुळे या नात्यांनी तुम्ही जेव्हा बांधलेले असता तेव्हा तुमचं सगळ्यांशी नातंही तसंच राहतं. याचं श्रेय अर्थातच मी आईला आणि बहिणीला देईन. कारण ज्यांनी मला सुरुवातीपासून हे सांगितलं, की तू बाहेर स्टार असशील, पण तुझी घरातली कामं, तुझी तुलाच करायची आहेत. त्यामुळे मला असं नेहमीच वाटतं, मालिका येतील जातील, चित्रपट येतील जातील, तुमचं काम असेल नसेल पण माणूस म्हणून तुम्ही ज्यांना आवडता तीच माणसं तुमच्याबरोबर टिकून राहतील आणि माझ्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे.

मला वाटतं की आपला जो प्रवास आहे, तो माझ्याकडून माझ्याकडे नाहीये, तर या प्रवासातला आपण फक्त एक भाग असतो. ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. म्हणजे सगळ्या नात्यांचा गोफ अगदी सहज आणि सुंदर विणला जातो.

शब्दांकन : उत्तरा मोने
–uttaramone18@gmail.com