-अपर्णा देशपांडे
हॅलो मैत्रिणींनो, मी आहे आर.जे. ढिंच्याक आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे, चिल मार! मैत्रिणींनो, आपण स्त्रिया शिकलो, आपल्या पायावर उभ्या राहिलो तरीही अनेक स्त्रिया आपला आत्मसन्मान पणाला लावतात. शरणागती पत्करतात. यातील एक गोष्ट म्हणजे घरातील पुरुष मंडळींकडून विनाकारण होणारा अपमान. तो सहन नसेल करायचा तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते.

अनेकदा आपल्या मैत्रिणी त्यांची काहीही चूक नसताना त्यांच्या बॉयफ्रेंडकडून होणारा अपमान सहन करत असतात, नवऱ्याकडून होणारी मानहानी आणि चक्क मारहाण सहन करतात. असं का होत असेल? स्त्रिया कमजोर असतात का? माझं म्हणणं आहे, की अजिबात नाही. उलट स्त्रिया फार चिवट, लढाऊ आणि कष्टाळू असतात. मग त्या नको तितक्या सहनशील असतात का, जेणे करून जाचक आणि घुसमट नात्यातही त्या सगळं मुकाट सहन करत नातं टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहतात. या ‘का’ चं उत्तर शोधण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत, महिला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या रजनीताई यांच्याशी.

नमस्कार ताई. आपला या क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे. अनेक स्त्रियांना तुम्ही त्यांच्यावरच्या अन्याय अत्याचारातून बाहेर काढलं आहे. तुमचा काय अनुभव आहे? स्त्रिया जाचक नात्यातून सुटका करून घेण्यासाठी हिरीरीने पुढे का येत नाहीत? का अन्याय सहन करत राहतात? आणि अशा स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे का?

आणखी वाचा-अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार

या प्रश्नाचं उत्तर देताना आपण मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांचा विचार करू. त्यांचा अनुभव साधारण सारखा असतो. अतिशय त्रासदायक नात्यातूनही स्त्री बाहेर पडताना वेळ घेते याचं पहिलं बहुतांशी कारण म्हणजे तिचा भाबडा आशावाद. तिला आशा असते, की आपला नवरा आज ना उद्या सुधारेल. त्याचा राग शांत होईल, तो वयानुसार थोडा अधिक समंजस होईल, आणि आपल्याला थोडे बरे दिवस येतील. दुसरं असं, की तिला असं वाटत असतं, की काहीही झालं तरी आपल्या बॉयफ्रेंडचं किंवा नवऱ्याचं आपल्यावर फार प्रेम आहे. त्या प्रेमापायी ती त्याचे हजार गुन्हे माफ करत जाते आणि तो अधिक शिरजोर होत जातो. त्याला सुधारण्याच्या नादात इतका कालावधी जातो की तिच्यामते तिच्यासाठी परतीचा रस्ता बंद झाला असतो. आता माघार नाही, असं म्हणत ती आहे ती परिस्थिती मान्य करून जगू लागते.

बऱ्याच स्त्रिया अशाही आहेत ज्यांना नवऱ्यापेक्षा जास्त पगार आहे. उदाहरण द्यायचं तर एक तरुणी, वंदना माझ्याकडे आली होती. ती एका कंपनीत मॅनेजर होती, भरपूर पगार होता. तिचा अत्यंत तापट आणि संशयी नवरा रोज तिच्याशी भांडायचा आणि भांडण विकोपाला गेलं की वाट्टेल तसा मारायचा. तिला दोन लहान बहिणी होत्या. तिला वाटायचं, की आपण माहेरी तक्रार केली तर आई-वडील घटस्फोट घ्यायला लावतील आणि आपल्यामुळे आपल्या लहान बहिणींची लग्न होणार नाहीत. असल्या निर्थक विचारात तिनं बराच वेळ घालवला. त्याच दरम्यान तिला मुलगी झाली. मग तर ती आणखीनच गरीब गाय झाली. एक दिवस तिच्या बहिणीच्या लक्षात तिची परिस्थिती आली आणि तिनं सगळं घरी सांगितलं. अर्थातच घरच्यांनी तिला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा ती माझ्याकडे आली.

आणखी वाचा-शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान

तिला तिच्या मुलीची काळजी वाटत होती. तिला सोशल सिक्युरिटी हवी होती. मी तिला समजावलं. प्रथम तिच्यातला आत्मविश्वास जागा केला. तिला आत्मसन्मान म्हणजे काय, आणि तू स्वतंत्र कशी छान आनंदात जगू शकतेस, त्याला धडा शिकवणं कसं आवश्यक आहे हे सगळं समजावून सांगितलं. मुख्य म्हणजे तिच्यामुळे बहिणींची लग्न होणार नाहीत, हा डोक्यातला भ्रम काढायला सांगितलं. मोकळा श्वास घेणं म्हणजे काय हे तिला तो पर्यंत माहीत नव्हतं. आजच्या काळातही अशा तरुणी आहेत याचं फार आश्चर्य वाटतं, पण ते दुदैवाने सत्य आहे. तिला घटस्फोट घेण्यासाठी आम्ही मदत केली आणि आता ती आनंदानं जगत आहे. मला एक सांगावंसं वाटतं, मुलींनो, आपल्या आनंदाची गुरुकिल्ली आपण दुसऱ्याच्या हातात का द्यायची? एक स्त्री म्हणून तुम्हालाही ठामपणे जगता यायला हवं. खरं तर तुमच्यावर हात उगारताना त्याला भीती वाटली पाहिजे. अन्याय सहन करणं केव्हाही वाईट. त्याबद्दल आपल्या माणसांशी बोलायला हवं. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मानाने जगण्याचा तुमचा अधिकार आहे. त्यासाठी तुम्ही सामाजिक संस्थांची, पोलिसांची, महिला आधार केंद्राची मदत घेऊ शकता.

खूप खूप धन्यवाद ताई. या विषयावर बरंच काही बोलता येईल, पण सध्या आपण इथेच थांबू. या नंतर कुठल्याही तरुण मुलीला किंवा विवाहित स्त्रीला पुरुषाच्या अत्याचाराचा बळी पडण्याची वेळ येऊ नये ही इच्छा व्यक्त करूया. भेटूया आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये, तोपर्यंत मजेत राहा, आनंदी राहा.

adaparnadeshpande@gmail.com