ऑस्ट्रेलियाकडून पहिल्याच कसोटीत पराभवाचा ‘हादरा’ बसल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाच्या पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले आहे. आमची फलंदाजी अशीच राहिली तर ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर जगातील कोणताही संघ आमचा पराभव करेन, असे त्याने म्हटले आहे. फलंदाजांवर खापर फोडणाऱ्या विराटने मात्र गोलंदाजांचे कौतुक केले. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, असे तो म्हणाला.

पुण्यातील गहुंजे येथील मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा ३३३ धावांनी दणदणीत पराभव करून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या पराभवामुळे भारताला जोरदार दणका मिळाला आहे. कर्णधार विराट कोहलीने या पराभवाचे खापर आपल्या फलंदाजांवर फोडले आहे. गेल्या दोन वर्षांतील फलंदाजांची ही सर्वात खराब कामगिरी असल्याचे तो म्हणाला. अशीच कामगिरी राहिली तर जगातील कोणताही संघ आम्हाला हरवू शकेन, अशी नाराजी त्याने व्यक्त केली. पहिला डाव १०५ धावांत आटोपला. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, फलंदाजांनी या सामन्यात खूपच खराब कामगिरी केली, असेही तो म्हणाला.

या सामन्यात मी गोलंदाजांना दोष देणार नाही. मात्र, आमच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. आमचा पहिला डाव १०५ धावांतच आटोपला. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या आव्हानांचा डोंगर पार करणे सोपे नव्हते. पण आम्ही चांगला खेळ केला नाही असेच म्हणावे लागेल, असेही विराट म्हणाला. आम्ही चांगली कामगिरी केली नाही तर पराभव होणारच, हे आम्हाला माहितच होते. या सामन्यात असेच काहीसे झाले, असेही तो म्हणाला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर बेंगळुरू कसोटीत वापसी करू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. आम्ही याआधीही केलेल्या चुकांतून धडा घेत चांगली कामगिरी केली आहे. बेंगळुरूतही चांगली कामगिरी करू. ऑस्ट्रेलिया संघावर दबाव आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे तो म्हणाला. फलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणालाही त्याने दोष दिला. एकाच सामन्यात एकाच फलंदाजाचे पाच-पाच झेल सोडल्यानंतर विजय मिळणे अशक्य आहे, असेही त्याने सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथचे पाच झेल सुटले होते. या मिळालेल्या जीवदानांचा त्याने फायदा उठवून शतक झळकावले. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजुने झुकला.