शरीरसौष्ठव म्हटलं की बऱ्याच संघटना, त्याच्यांमधले वाद, राजकारण, कुरघोडी यामुळे खेळाचे आणि खेळाडूंचे नुकसान होत होते, त्यामुळेच गेल्या आठ वर्षांमध्ये सरकारने शरीरसौष्ठवला मान्यता दिली नव्हती, पण राष्ट्रीय स्तरावर दोन संघटना एकत्र आल्या आणि इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशनला क्रीडा मंत्रायलयाने मान्यता दिली. त्यानंतर खेळांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या मुंबईतील दोन शरीरसौष्ठव संघटना एकत्र येण्याच्या प्रयत्नात असून येत्या काही दिवसांमध्येच ही औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रामध्ये ‘हम सब एक है’चा सूर आळवला जात आहे.
आम्ही राष्ट्रीय स्तरावर एकत्र आल्यावर महाराष्ट्राबरोबरच मुंबईच्या संघटकांना एकजुटीचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच मुंबईतील दिग्गज समजले जाणारे मधुकर तळवलकर, पप्पा पाटील, विजू पेणकर, विकी गोरक्ष, तुळशीदास जाधव, सुनील शेडगे आणि अ‍ॅड. विक्रम रोठे यांच्यासह बऱ्याच जणांनी एका छत्राखाली यायचे ठरवले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर एकत्रित संघटना सर्वासमोर येणार आहे.
क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाल्यावर सर्वच संघटनांना आम्ही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. खेळाच्या प्रगतीसाठी वैयक्तिक स्वार्थ विसरून एकत्र या, तुमच्यासाठी आमच्या संघटनेचे दरवाजे सदैव खुले असतील, असे आवाहन यावेळी इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सचिव चेतन पाठारे यांनी केले.
सरकारने शरीरसौष्ठवपटूंकडे लक्ष द्यावे – संग्राम चौगुले
शरीरसौष्ठव या खेळात मध्यमवर्गातूनच जास्तीत जास्त मुलं येतात. शरीरसौष्ठवपटूला दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये एवढा खर्च येतो, तो त्याला नक्कीच परवडणारा नाही. त्यामुळे सरकारने शरीरसौष्ठपटूंकडे लक्ष द्यायला हवे. सरकाने मदत किंवा नोकरी दिल्यास आमच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल. सरकारने मदत केली तर बरेच शरीरसौष्ठवपटू या खेळाकडे वळतील आणि देशाची मान उंचावतील, असे ‘मिस्टर युनिव्हर्स’ ठरलेल्या संग्राम चौगुलेने सांगितले.