पावसाळा सुरु झाला की त्वचेच्या समस्या डोके वर काढतात. त्वचेवर रॅश येणे, संसर्ग होणे, लालसरपणा, खाज अशा समस्या निर्माण होतात आणि यापासून बचाव करण्यासाठी नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही. मात्र काही घरगुती उपायांनी या समस्येवर उपाययोजना करता येणे शक्य आहे, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक आणि चांगली राहील. काय आहेत हे उपाय जाणून घेऊया. तुळस - पावसाच्या दिवसात अनेकांना अॅलर्जी किंवा खाज येण्याची समस्या उद्भवते. तुळस ही अॅंटी- ऑक्सिडंटस आणि अॅंटी बॅक्टेरीयल असते. हवेच्या कोणत्याही बदलाशी सामना करताना तुळस उपयुक्त ठरते. आपल्याला ज्याठिकाणी त्रास झाला आहे त्याठिकाणी तुळशीचा रस किंवा पेस्ट लावल्यास फायदेशीर ठरते. या रसाने चेहरा धुतल्यास चेहऱ्याच्या सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते. हळद - आयुर्वेदात हळद हे अनेक गोष्टींवरील उपयुक्त असे औषध समजले जाते. अँटीसेप्टीक म्हणून ओळखली जाणारी हळद त्वचेच्या समस्येवरील उत्तम उपाय आहे. चेहऱ्यावर कोणताही संसर्ग किंवा अॅलर्जी आली असल्यास तो नष्ट करण्यासाठी हळद अतिशय उत्तम काम करते. कोरफड - कोरफडीचे अनेक उपयोग आपल्याला माहित आहेत. बाजारात मिळणारी अनेक क्रीममध्येही कोरफडीचा वापर केला जातो. त्वचेला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी झाली असल्यास कोरफड त्यावर उपयुक्त ठरते. त्वचेची होणारी जळजळ कोरफड लावल्याने कमी होते. जीरे - त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जीरेही अतिशय उपयुक्त असते. दिवसात ३ ते ४ वेळा पाण्याबरोबरच जीरे घेतल्यास त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जीऱ्यात ई जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचा चांगली राहते. पावसाच्या दिवसात होणारे त्वचेचे त्रास जीऱ्यामुळे कमी होतात. (ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)