जिल्ह्य़ात सध्या तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास असून रखरखत्या उन्हाचा व जंगलांना लागलेल्या वणव्यांचा फटका जंगलातील पक्ष्यांना बसत आहे. वनविभागाच्या खामतलाव व शेंडा वनपरिक्षेत्रात उष्माघाताने शेकडो प्रजातीचे पक्षी मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांना शोधण्याच्या कामाला लागले आहेत. जिल्ह्य़ातील देवरी तालुक्यातील खामतलाव शेंडा येथे वनविभागाचे राखीव जंगल आहे. उन्हाळयात पशुपक्ष्यांना पाणी मिळावे याकरिता दोन कृत्रिम पानवठेही तयार करण्यात आले आहेत. मात्र, या जंगलामध्ये ठिकठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी मृतावस्थेत आढळून आले. मात्र याची माहिती वनविभागालाच नव्हती. वाईल्ड लाईफ टॅस्ट ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अनिलकुमार नायर हे चमूसह जंगल सफारीवर गेले असता त्यांना शेंडा व खामतलाव जंगल परिसरात ठिकठिकाणी पक्षी मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यांनी मृत पक्ष्यांना गोळा करून एकत्रित ठेवले. मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांमध्ये व्हाईट ब्लिलेड, डॉन्गो,रफस टिपी, कॉमन हॉक,कुक्कु, ब्लॉक नेपेड मोनार्च, जीआरटी डोन्गो, जंगल बबलर्स, श्शामा,आरव्ही बुलबुल, इंडियन स्कॉप ओव्हेल, जंगलओव्हलेट यांचा समावेश आहे. मागील चार पाच दिवसाअगोदर याच जंगलात आग लागली होती. उष्माघाताने या पक्षांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून लावला जात आहे. मागील चार-पाच दिवसात या खामतलाव व शेंडा वनपरिक्षेत्रात वणवा लागला होता. त्या वणव्याच्या धुरामुळे या पक्ष्यांचा मृत्यु झाला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्युमुखी पडलेले पक्षी दुर्मीळ प्रजातीचे असून हे पक्षी नागझिरा-नवेगावबांध राखीव वनक्षेत्रात आढळून येत असल्याचे वाईल्डलाईफ टॅस्ट ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अनिलकुमार नायर यांनी सांगितले. पक्षांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा कारण मागील २० दिवसांपासून या जंगलात वणवा लागल्याच्या घटना घडलेल्या असल्याचे खामतलाव बिटचे वनरक्षक एन. एस. पाथोडे यांनी सांगितले.