ग्रामीण भागाबरोबरच आता शहरांमध्येही पाण्याचे संकट तीव्र होऊ लागले असून मराठवाडा- खान्देशातील तब्बल ३५ शहरांना पाणी संकटाचा मुकाबला करावा लागत आहे. त्यामुळे या शहरांना तातडीने सुमारे ४२ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 राज्यातील १५८६ गावे आणि ४,३०५ वाडयांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या सोडविताना अगोदरच सरकारची दमछाक  होत आहे. त्यातच आता शहरांमधील पाणी टंचाईची समस्याही गंभीर होऊ लागली आहे.
 बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  शहरातही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याबाबत काही मंत्र्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यावेळी शहरांमधील पाणी टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीला दिले होते.
 मदत आणि पुनर्वसन मंत्री पुनर्वसनमंत्री पंतगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत ३५ शहरांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून एप्रिल-मे अखेर या  शहरांमध्ये पाणी मिळणेही मुश्कील होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार उस्मानाबाद, औरंगाबाद, उदगीर, लातूर, चाळीसगाव, कुसेगाव, जामनेर, जळगाव, धुळे, आदी शहरांना१७ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात
आले.
 मनमाड शहराला नांदूर धरणातून  पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जलवाहिनी  व अन्य कामांसाठी २६ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.