पिंपरी महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बीआरटीएस नियमात केल्या जाणाऱ्या फेरबदलामुळे २८०० कोटींचे नुकसान होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी यासंदर्भात मांडलेल्या दोन उपसूचना निव्वळ धंदेवाईक असल्याचा आरोपही केला आहे.
िपपरी पालिकेने यासंदर्भात हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ९ डिसेंबरला जाहीर सूचना दिली होती. त्यानुसार, निर्धारित मुदतीत शिवसेनेने २२५ हरकती नोंदवल्या. बीआरटीएस कॉरिडॉरची व्याप्ती १०० मीटरवरून २०० मीटर केल्याने मोठय़ा प्रमाणात एफएसआयची निर्मिती होणार असून पायाभूत सुविधांवर कमालीचा ताण पडणार आहे. वाहनतळासंदर्भातील संभाव्य फेरबदल बीआरटीएसच्या मूलभूत संकल्पनेलाच हरताळ फासणारे आहे, असे सावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेने आर्थिक हिताच्या विरोधात निर्णय घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
बीआरटीस कॉरिडॉरच्या प्रचलित नियमानुसार, कॉरिडॉरच्या वाढीव हद्दीत निर्माण झालेला टीडीआर वापरण्यासाठी १२ हजार रुपये प्रतिचौरस फूट दराने अधिूमूल्य भरावे लागणार आहे. मात्र, प्रस्तावित फेरबदलात हीच किंमत पाच हजार रुपये कमी करण्यात आली आहे. शहरात ८ बीआरटीएस रस्ते असून अधिूमूल्याचा विचार करता पालिकेला २८०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. सलग्न रस्त्यांच्या दरातही कपात केल्याने नुकसानच होणार आहे, याकडे सावळे यांनी लक्ष वेधले आहे.