शाळेत ‘माझं घर’ या विषयावर निबंध लिहावयास सांगितला की मुलं आपापल्या घरांबद्दल खूप काही लिहितात. कारण त्या वयात घर हेच त्यांचं विश्व असतं. ते घर प्रत्येक मुलाच्या मनाप्रमाणे वेगवेगळं असतं. तसंच ते घर सभोवतालच्या वातावरणाप्रमाणेपण वेगळं असतं. म्हणजे कोकणातलं घर वेगळं, तर वाळवंटात असलेलं वेगळं, जंगलातलं घर वेगळं, तर हिमालयातलं घर वेगळं. प्रत्येक ठिकाणचा निसर्ग वेगळा त्याप्रमाणे तिथल्या माणसाच्या राहण्याचा, खाण्याचा, स्वभावाचा प्रकार वेगळा. निसर्गाशी माणसाचं घट्ट नातं असतं.

अगदी प्राचीन काळी माणूस ‘आडोसा’ शोधून त्यात राहायचा, तोच ‘आडोसा’ नंतर  ‘खोपटी’ होऊन नंतर ‘घर’ झालं. आणि आधुनिक काळात तो आता एक ‘फ्लॅट’ अथवा बंगला झाला. या पूर्ण वाटचालीत निसर्गाशी त्याचं नातं घट्ट राहिलं आहे. वेगवेगळ्या निसर्गाप्रमाणे त्याने त्याचं घर वेगवेगळं बनवलं. वाळवंटातील घर त्याने जाड – ‘पोकळ’ भिंतींनी बनवलं आहे आणि छोटय़ा आकाराच्या खिडक्या ठेवल्या- जेणेकरून कडक उन्हापासून त्याला सुरक्षा मिळो. तसेच समुद्र किनारी खूप आद्र्रता असते त्यामुळे तिथली घरं जाळीदार असतात किंवा मोठमोठय़ा खिडक्यांची असतात- जेणेकरून हवा खेळती राहावी. बर्फाच्छादित प्रदेशात तर थंडीपासून सुरक्षेसाठी घरात ऊब निर्माण करायची व्यवस्था असते,  खिडक्या पूर्ण बंद ठेवाव्या लागतात. त्याबरोबर माणूस स्वत:सुद्धा निसर्गाप्रमाणे राहतो. राजस्थानातला माणूस शुभ्र पंढरा व खूप थर असलेला पेहराव घालतो, तर कोकणातला माणूस जमेल तितका उघडा, जाळीदार पेहराव घालतो. तसेच हिमालयातला माणूस जाड थराचा गडद रंगाचा पेहराव घालतो. एकूणच काय तर निसर्गाच्या वेगवेगळ्या स्वरूपाचा माणसाच्या जगण्यावर थेट प्रभाव असतो. आणि नकळत तो त्या प्रभावात  सहज जगत असतो.

कालांतराने शहरं वसली, जगणं थोडं थोडं बदलत गेलं, एका नवीन ‘घरात’ तो दिवसभर राहायला लागला, ते होते त्याचे ‘कार्यालय’! स्पर्धेचे जग सुरू झाले आणि त्यात टिकण्यासाठी तो जास्तीतजास्त वेळ कार्यालयात घालवू लागला. कालानुरूप कार्यालयांचे स्वरूप बदलले- त्यांच्या जागा छोटय़ा घरातून निघून मोठय़ा इमारतीमध्ये गेल्या. त्यातही बदल झाले आणि त्या इमारतीतून ते कार्यालय प्रचंड मोठय़ा ‘ऋऋ्रूी ूेस्र्’ी७’मध्ये गेले. सुंदर दिसणाऱ्या टोलेजंग इमारतींनी शहर सजू लागले. स्पर्धेत टिकण्यासाठी, लोकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गरज भासू लागली. त्याकरिता इमारतीमध्ये खास तांत्रिक सुविधा योजण्यात आल्या. खास सोयी करण्यात आल्या. त्या साकारण्यामध्ये पारंपरिक गोष्टींना मुरड घालावी लागली. लोकांनी फक्त काम करावं व ते करताना त्यांना कुठल्याही प्रकारचा ऊन, पाऊस, वाऱ्याचा त्रास होऊ  नये यासाठी जागा ‘वातानुकूलित’ करण्यात आली.  लोकांना ‘अनुकूल’ असा ‘वात’ तयार करण्याचं तंत्र विकसित  झालं. जो ‘वात’ सहजपणे वाहत आहे त्याला इमारतीमध्ये येण्यास जायबंदी करण्यात आलं. ‘काचे’ने कोपरान् कोपरा ‘सील’ करण्यात आला. सभोवतालच्या वातावरणाचा काहीही थेट संबंध येत कामा नये, अशी ही योजना. आतमध्ये येणाऱ्या प्रकाशाचे ‘अनुकूलन’ करण्यासाठी काचांच्या मागे वेगवेगळे पडदे लागले. निर्माण झाली एक अति सुंदर ‘स्फटिका’सारखी दिसणारी इमारत आणि त्यात कैद झालो आम्ही ‘काचबंदी’!

आजूबाजूच्या निसर्गापासून स्वत:ला वेगळं करून बनल्या या काचेच्या ‘अंतर्मुखी’ इमारती!  ज्या २४ तास ऊर्जा खर्च करून जगत असतात. काय हा उपरोध!

पश्चिमेकडील थंड प्रदेशातल्या देशांमध्ये सूर्यप्रकाशाची कमी असते व तिथली थंडी  सहनशक्तीच्या बाहेर असते. त्यामुळे काचबंद इमारत करण्यामध्ये जास्तीतजास्त सूर्यप्रकाश, त्याद्वारे  ऊब व वातानुकूलन अशी योजना योग्य होते. म्हणून त्या प्रकाराचे तंत्र तिथे विकसित झाले आहे आणि त्याच्या बाजारपेठा निर्माण झाल्या. साहजिकच आपल्यासाठी मोठी बाजारपेठ ही त्यांचीच  बरोबर पश्चिम जगताच्या आकर्षण, त्यामुळे  त्या बाजारपेठेत जे मिळणार त्याचाच वापर आपल्या कामांमध्ये केला जातो व तीच प्रणाली जशीच्या तशी आपण घेऊन टाकतो.  त्याचा प्रत्यय आपल्याला या ‘काचबंदी’ संस्कृतीमध्ये बघावयास मिळतो. खरे तर भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशाला ‘काचबंद’ इमारती किती योग्य आहेत,  याला उत्तर अगदी सहजच आहे.

स्थानिक हवामानाप्रमाणे, वातावरणाप्रमाणे इमारतींचा आराखडा करणे किती गरजेचे आहे हे आपल्याला लक्षत येण्यावाचून राहणार नाही. शाश्वत विकासाचे मूळच या संकल्पनेत आहे.  आतापावेतो त्या विषयावर प्रचंड अभ्यास झाला आहे आणि प्रत्यक्षातपण काम झाले आहे. पण परिस्थिती आपल्याला दिसेल अशी बदललेली नाहीए. याचे कारण उपलब्ध बाजारपेठ आणि तंत्रज्ञान! तुमच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत असलेल्या बाजारपेठेच्या. ज्या वस्तू, तंत्र, यंत्र बाजारपेठेत मिळेल, फक्त त्यातूनच तुम्ही तुमचं काम स्वरूपात येणार. त्यामुळे संशोधित संकल्पनेच्या पूर्ततेसाठी योग्य पुरवठा बाजारपेठेतून नाही मिळाला तर तुम्ही ते काम करू शकत नाही.

याचाच अर्थ असा की स्थानिक पातळीवर शाश्वत विकासासाठी लागणारी समग्री, यंत्र, तंत्र, यांचे संशोधन करणे आणि नंतर त्याची  ‘ीू२८२३ीे’ तयार करून यांची बाजारपेठ तयार करणे या गोष्टींवर आपल्याला खूप प्रयत्नशील राहावे लागणार आहे, तरच शाश्वत विकासाचे मार्गक्रमण करता येईल.

parag.kendrekar@gmail.com’