सायन-पनवेल मार्गावरील खारघर उड्डाणपुलावर वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कारचालकासह कारमघील दोनजणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणाची खारघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नील उन्नीकृष्णन नायर (३८, रा. मुंबई), अभया नितीन झवेरी (४७, रा.मीरा-भाईंदर) आणि देवानशी नितीन झवेरी (१७,रा. मीरा-भाईंदर) अशी मृतांची नावे आहेत.
रात्रीच्या वेळेस पुण्याहून त्याच्या कारमधून (एमएच-०२-सीडब्लू-३९५०) झवेरी कुटुंब मुंबईकडे निघाले होते. दीडच्या सुमारास कार खारघर उड्डाणपुलावर आली असता चालक नायर याचा कारवरील ताबा सुटला.
कार रस्तादुभाजक ओलांडत खारघरकडून पनवेलच्या दिशेला येणाऱ्या ट्रेलरवर (एमएच-०४-सीबी-८४८९) जाऊन आदळली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत तिघा जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.