scorecardresearch

आत्महत्या Videos

स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य म्हणजे आत्महत्या होय. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपले जीवन निरर्थक किंवा नीरस वाटते तेव्हा त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे (Subside) विचार येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनामध्ये सतत येणारं अपयश, आर्थिक संकटे, नातेसंबंधांतील गुंतागुत अशी आत्महत्येमागील कारणे असण्याची शक्यता असते. काही वेळेस मानसिक आजारांमुळेही आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येत असतात. मानसिक त्रास, असहाय्यता संपवण्याच्या उद्देशाने लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आकडेवारीनुसार, जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीमध्ये आत्महत्या हे तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे.


ब्रिटीश काळातील भारतीय दंड संहिता १८६० मध्ये असलेल्या कलम ३०९ नुसार आत्महत्या करणे हे कायद्याने गुन्हा आहे असे नमूद करण्यात आले होते. या कलमानुसार, “जो कुणी आत्महत्येचा प्रयत्न करील आणि असा अपराध घडण्याच्या दृष्टीने कोणतीही कृती करील त्याला एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील” हे कलम जुनाट असून त्यावर अनेकदा टीका झाली. १९७१ मध्ये हे कलम रद्द करण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले गेले. पुढे अनेकदा त्यावर चर्चा झाल्या. २००८ मध्ये विधी आयोगाच्या २१० व्या अहवालामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय आणि मनोरुग्ण उपचारांची गरज आहे, शिक्षेची नाही. असे नमूद करण्यात आले. पुढे २०१७ मध्ये याविशयी विधेयक आणून २०१८ मध्ये ते अमलात आले.


मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (१) मध्ये म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ व्याख्येनुसार काहीही असले तरी आत्महत्येचा प्रयत्न करणारी कोणतीही व्यक्ती, गंभीर ताणतणावात असल्याचे गृहित धरले जाईल आणि या संहितेमनुसार सदर व्यक्तीविरोधात खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही.मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (२) नुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा अशा प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करू नये किंवा तसा धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित सरकारने अशा व्यक्तीची काळजी घेणे, त्याला उपचार देणे आणि त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सरकारचे हे कर्तव्य आहे.


या व्यतिरिक्त आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे हा भारतामध्ये मोठा गुन्हा मानला जातो. कलम १०६ नुसार, “एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास अशा आत्महत्येस जर कुणी प्रवृत्त केले असेल तर त्याला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच द्रवदंडांची शिक्षाही ठोठावली जाऊ शकते.” तर कलम १०५ नुसार “१८ वर्षांखालील कोणतीही व्यक्ती, मानसिक आजार असलेली कोणतीही व्यक्ती, कोणतीही भ्रमिष्ट व्यक्ती किंवा नशेच्या अमलाखाली असलेली व्यक्ती आत्महत्या करेल आणि अशा व्यक्तीच्या आत्महत्येसाठी जर कुणी जबाबदार असेल तर त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते.”


प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास, दु:ख, वेदना असतात. प्रत्येकजण संकटांचा सामना करत असतो. तेव्हा अपयशाने खचून न जाता सतत संघर्ष करणे आवश्यक असते. आत्महत्या करणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्यास तुम्ही जवळच्या व्यक्तीची मदत घेऊन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करु शकता. शासनही त्यामध्ये मदत करते. सरकारच्या अनेक हेल्पलाइन्स मानसिकदृष्टा खचलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी तत्पर असतात.


Read More

ताज्या बातम्या